औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाघाडी येथील पोलिस पाटील किशोर घटे यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध दाखल अॅट्रॉसिटीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी रद्द केला. सिंधुबाई दादासाहेब कांबळे यांनी चार आरोपींविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, तिला शासकीय योजनेतंर्गत गावात घरकुल मंजूर करण्यात आले होते. जागा नसल्यामुळे ती गायरान जमिनीवर घर बांधण्यासाठी जागा तयार करीत होती. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपींनी तिला मारहाण केली. तसेच संध्याकाळी जातीवाचक शिवीगाळ केली. गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी खंडपीठात धाव घेतली होती. सदर गुन्हा पाच दिवस उशीराने दाखल केला असून, फिर्यादी मुलीने जबाबात आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे कोठेही म्हटलेले नाही, असा युक्तीवाद आरोपीचे वकील सुदर्शन साळुंके यांनी केला. आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा दुरुपयोग असल्याचे मत खंडपीठाने नोंदविले. सुनावणी अंती खंडपीठाने सदर गुन्हा रद्द केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट