म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'पाणीपट्टीत दरवर्षी केली जाणारी दहा टक्के दरवाढ रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. मात्र, या निर्णयाविरोधात जावून पाणीपट्टी वाढ रद्द न करण्याचे अधिकाऱ्यांनी काढलेले पत्र संतापजनक व खोडसाळपणाचे आहे. त्यामुळे ही वाढ रद्द केल्याचे शुद्धीपत्रक तत्काळ काढा,' असे आदेश शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, हा निर्णय गतवर्षी सर्वसाधारण सभेत रद्द करण्याचे ठरविण्यात आले. तसा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्या ठरावाची प्रत अंमलबजावणीसाठी प्रशासनाला दिली, पण प्रशासनाने त्यावर काहीच अंमलबजावणी केली नाही. उलट शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कार्यकारी अभियंता व वॉर्ड अधिकारी यांच्या नावे पत्र पाठवून दहा टक्के वाढीनुसारच पाणीपट्टी वसुलीचे आदेश दिले व तसे नियोजन सादर करण्यास सांगितले. 'मटा' ने या संदर्भात सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शहर अभियंत्यांच्या पत्राचा आणि प्रशासनाच्या एकूणच कार्यवाहीचा अंदाज महापौरांनी घेतला आणि दहा टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करण्याबद्दल त्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा केली. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शुद्धीपत्र काढण्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी देखील ते मान्य केले. याच संदर्भात महापौरांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत निवेदन केले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना उद्देशून महापौर म्हणाले, 'पाणीपट्टी वाढ रद्द करण्याचा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय अंमलात आणण्याबद्दल आयुक्तांशी चर्चा झाली आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणीपट्टी वाढ रद्द करण्यात आल्याचे शुद्धीपत्र काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे तत्काळ शुध्दीपत्र काढून पाणीपट्टी वाढ रद्द केल्याचे जनतेला कळवा. जनतेच्या भावनांशी खेळू नका. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही मर्यादा आलेल्या आहेत. आचारसंहिता संपल्यावर या संदर्भात आणखी निर्णय घेऊ. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाविरोधात पत्र काढणे हा अधिकाऱ्याचा खोडसाळपणा आहे. हे कृत्य संतापजनक आहे,' असा उल्लेखही महापौरांनी केला. \Bगैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस \Bशनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, उपायुक्त मंजुषा मुथा, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शेख खमर, उपअभियंता के. डी. देशमुख, सहाय्यक आयुक्त करणसिंह चव्हाण, विधीसल्लागार अपर्णा थेटे उपस्थित होते. गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त होती. या सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट