लोगो - चर्चा तर होणारच म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद काँग्रेससोबत असलेली जिल्हा परिषदेतील अभ्रद युती शिवसेनेने दिलेल्या वचनाप्रमाणे लवकर तोडावी, अशी मागणी भाजपने पुन्हा एकदा केली आहे. याबाबत आठवड्याभरात सेनेसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी 'मटा'शी बोलताना दिला. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या काही सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीपासूनच ही आघाडी शिवसेनेने तोडावी, असा आग्रह भाजपकडून केला जात आहे. महापौर बंगल्यावर युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचा हात सोडणार, असा शब्दही दिला होता. लोकसभेसाठी जिल्ह्यात मतदान झाले असून आतातरी शिवसेनेने दिलेला शब्द पाळावा व त्यानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी 'मटा'शी बोलताना केली. जिल्हा परिषदेत भाजप व शिवसेनेचे संख्याबळ अधिक असून सत्ता स्थापन करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असे सांगत त्यांनी येत्या आठ दिवसांत सेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती दिली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याबाबत 'मटा'शी बोलवाता पहिली अडीच वर्षाची टर्म पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असून त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल, असे नमूद केले. दरम्यान, एकीकडे या हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार समर्थक सदस्यांनी वेगळा गट स्थापनेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सत्तार समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव तायडे यांनी याबाबत बोलताना सुमारे दहा सदस्य सोबत असल्याचा दावा केला. आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार असून साधारणत: सप्टेंबर महिन्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईल, त्यावेळी आमदार सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे हा तायडे व समर्थक सदस्य नेमकी काय भूमिका घेता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट