म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कोट्यवधी रुपयांची हानी करणाऱ्या राजाबाजार नवाबपुरा येथील दंगलीला ११ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या दंगलग्रस्तांना वर्षभरानंतरही कोणतीही नुकसान भरपाई दिली नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेली ही दंगल सुमारे सात तास सुरू होती. या दंगलीत दोघांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले होते. ११ मे २०१८ रोजी किरकोळ कारणावरून सुरुवातीला मोतीकारंजा भागात दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या तणावाचे लोण काही वेळातच राजाबाजार, नवाबपुरा भागात पोहचले. यानंतर दोन गटात यावेळी तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. या दगडफेकीत पेट्रोल बाँबचा देखील वापर करण्यात आला. जमावाने या दंगलीत अनेक दुकानांना आग लावत लक्ष्य केले. या दंगलीत सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. शहागंज चमन येथील चप्पल मार्केट या दंगलीत पूर्ण पेटवण्यात आले होते. पोलिसांच्या कमतरतेमुळे ही दंगल रात्रभर आटोक्यात आली नव्हती. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, श्रीपाद परोपकारी या दंगलीत जखमी झाले होते. जमावाने एका घराला पेटवल्यामुळे तेथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. तसेच पोलिसांनी केलेल्या फायबर बुलेटच्या गोळीबारात एक तरुण ठार झाला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पहाटे मुंबईवरून परतल्यानंतर कौशल्याने ही दंगल आटोक्यात आणली होती. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष पथकाने या दंगलीप्रकरणी नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लच्छु पहेलवान, एमआयएमचा नगरसेवक फिरोजखान यांच्यासह इतरांना अटक केली होती. वर्ष उलटल्यानंतरही या दंगलीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट