म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगभरातील शंभर देशांमध्ये डेंगीचा फैलाव असल्याचे स्पष्ट झाले असतानाच, डेंगीचा फटका बसलेले ७५ टक्के नागरिक हे आशियायी देशांमध्ये वास्तव्यास असल्याचेही पुरते उघड झाले आहे. अर्थातच, भारतात, महाराष्ट्रात व अगदी औरंगाबादसारख्या शहरांना डेंगीचा किमान एक ते दोन दशकापासून विळखा कायम आहे. एकीकडे डेंगी ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे सरकारी आरोग्य यंत्रणांच्या उपाययोजना परिणामकारक नसल्याने डेंगी प्रत्येक वर्षी जवळजवळ तितक्याच ताकदीने डोके वर काढत आहे. तिसरीकडे डेंगीचे सरकारी पातळीवर चक्क 'अंडर रिपोर्टिंग' होत आहे, तर डेंगीविषयी नागरिकांमध्ये अनाठायी भीती व गैरसमजांचे पिक दरवर्षीच येत असल्याची चौथी बाजूही राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त समोर येत आहे.
देशभर डेंगीचा फैलाव वाढत असल्यानेच या आजाराविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या हेतुने १६ मे रोजी राष्ट्रीय डेंगी दिन पाळला जातो. काही दशकांपूर्वीपर्यंत डासांमुळे होणाऱ्या मलेरियाशिवाय इतर कोणत्याही आजारांची नावे लोकांच्या कानावर आदळत नव्हती. मात्र गेल्या एक ते दीड दशकापासून चिकनगुन्या व डेंगीची जणू दहशत निर्माण झाली आहे. त्यातही सुरुवातीची काही वर्षे केवळ पावसाळ्यामध्ये दिसणारा डेंगी आता जवळजवळ बारा महिने दिसू लागला आहे आणि प्रत्येक शहरात डेंगीच्या शेकडो केसेस ढळढळीतपणे दिसून येत आहेत. तरीही डेंगीचे सरकारी आकडे फार कमी दाखवले जात आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नोंदीनुसार, औरंगाबाद शहर व जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांत ३८४ डेंगी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे, तर औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये ६१६ डेंगी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. वस्तुत: या चार जिल्ह्यांच्या एकूण आकड्यांपेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आकडे हे एकट्या शहराचे असू शकतात, अशी एकंदर परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मुळात डेंगीचे सरकारी पातळीवर 'अंडर रिपोर्टिंग' होते, असा स्पष्ट आक्षेप वैद्यकतज्ज्ञांकडून घेतला जातो. डेंगीच्या पहिल्या तीन दिवसांत 'एनएस-१' चाचणीद्वारे निदान होऊ शकते; परंतु ही चाचणी सरकारी पातळीवर ग्राह्य धरली जात नाही आणि डेंगीच्या चौथ्या ते सातव्या दिवसादरम्यान कोणत्याही चाचणीद्वारे डेंगीचे निदान होऊ शकत नाही. या चाचण्यांच्या मर्यादा एकीकडे आहेत, तर दुसरीकडे डेंगीची लक्षणे दिसताच आधी चाचणी करण्यापेक्षा आधी उपचारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त केसेसमध्ये डेंगीच्या चाचण्या केल्या जात नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे डेंगीने मृत्यू झाला तरी 'डेंगी'ऐवजी वेगळ्या वैद्यकीय नावाने मृत्युची नोंद होते; किंबहुना तशी नोंद करण्यास भाग पाडले जाते, जेणेकरुन डेंगीमुळे मृत्युचा गाजावाजा होणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
\Bप्राथमिक चाचणी सरकारला अमान्य
\Bया संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, निम्म्या किंवा त्यापेक्षा जास्त केसेसमध्ये डेंगीची तपासणी न होता थेट उपचार होतात. तसेच आजाराच्या प्राथमिक अवस्थेत स्थानिक पातळीवर केली जाणारी तपासणी सरकारी यंत्रणेकडून ग्राह्य धरली जात नाही आणि फार कमी केसेसमध्ये सरकारी यंत्रणेला अपेक्षित लॅबकडून डेंगीची मुख्य चाचणी होते. त्यातही उपचार सुरू झाला असल्यास ही चाचणी 'निगेटिव्ह' येऊ शकते मात्र, याचा अर्थ असा नाही की संबंधित रुग्णाला डेंगी नव्हताच, असेही डॉ. सावळेश्वरकर म्हणाले. फिजिशियन व इन्टेसिव्हिस्ट डॉ. आनंद निकाळजे म्हणाले, 'फॉल्स निगेटिव्ह' असा प्रकार असतो, ज्यात रुग्णाला डेंगी असला तरी किंवा होऊन गेला असला तरी ती चाचणी 'पॉझिटिव्ह' न येता 'निगेटिव्ह' येते. त्यामुळेच डेंगीचे प्रमाण खूप जास्त असताना त्याचे सरकारी पातळीवर 'अंडर रिपोर्टिंग' होते. त्याचवेळी डेंगीच्या निर्मूलन-नियंत्रणासाठी मिळणारा निधी, मनुष्यबळ व व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे आणि अपयशामुळेच डेंगी सतत वाढत आहे. नागरिकांमध्ये डेंगीविषयी अनेक गैरसमज आहेत. एखादे फळ खाल्याने प्लेटलेट वाढतात, एखादे फळ डेंगीसाठी उपयुक्त ठरते, असाही गैरसमज आहे. मुळात अशा कोणत्याही बाबींना शास्त्रीय आधार नाही, असेही डॉ. निकाळजे यांनी स्पष्ट केले.
\Bरक्तस्त्रावाशिवाय प्लेटलेट नकोत
\Bडेंगी हा दहा दिवसांचा आजार आहे. औषधे देऊनही चार ते पाच दिवस कायम राहणारा तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यापाठीमागे असह्य वेदना होणे, पूरळ येणे अशी काही डेंगीची लक्षणे असतात. संबंधित डेंगीच्या रुग्णाला पाच ते सहा दिवस ताप राहू शकतो. त्यानंतर अचानक ताप कमी होतो व याच काळात रुग्णामध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. या काळात शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे खूप महत्वाचे ठरते. त्याचवेळी जोपर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रुग्णाला प्लेटलेट देण्याची गरज नसते. उलट गरज नसताना प्लेटलेट दिल्यास प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या टप्प्यांवर तज्ज्ञांचा सल्ला; तसेच निरीक्षण आवश्यक असते. मुळात डेंगीच्या केवळ पाच ते दहा टक्के केसेस गंभीर स्वरुपाच्या असतात. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.