म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'लोकसभा निवडणूक निकालानंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेच्या मनात भीती निर्माण करत आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते जनतेला घाबरवून त्यांच्यापासून दूर गेलेल्या मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 'जिल्ह्यात शांतता राखून विकासासाठी प्रयत्न करेन, याकरिता गरज पडल्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मार्गदर्शन घेण्यास कचरणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात सोमवारी (२७ मे) सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद येथून विमान व रेल्वे सेवा वाढविणे, कौशल्य विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी विजयी झाल्यापासून अनेक अफवा पसरवून नागरिकांना घाबरविले जात आहे. पुढील निवडणुकीत मतदारांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना विकासाबाबत विचारणा करू नये यासाठी आतापासून असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थितीत करून भीती निर्माण केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 'एआयएमआयएम'कडून मदत झाली नसल्याच्या आरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले, स्वत:चा प्रचार सोडून खासदार ओवेसी यांनी सोलापूर येथे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी १० मे रोजी प्रचार केला. या सभेला मोठी गर्दी झाली होती. मात्र, मुंबई येथील काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन 'वंचितां'विरोधात प्रचार केल्याची माहिती कळाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून वंचित बहुजन आघाडी आणि 'एआयएमआयएम' चा समर्थ पर्याय मतदारांपुढे उभा केला जाईल, ही आघाडी राज्यात नवीन बदल घडवेल, असे ते म्हणाले. \Bसर्व समाज घटकांचा पाठिंबा \B मला मिळालेला कौल हा मुस्लिम आणि दलित समाजाची मते जास्त असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रत्येक भागातून मला जास्त मते मिळाली आहे. समाजातील प्रत्येक घटकांमधून मला पाठिंबा मिळाला, असा दावा त्यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट