म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पगार मिळाला नाही म्हणून पी. गोपानाथ रेड्डी या कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन केले. यामुळे तीन - चार तास कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद होते. कामगार वारंवार काम बंद आंदोलन करीत असल्यामुळे महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे. कचऱ्याच्या संकलन व वाहतुकीचे काम खासगीकरणातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन महिन्यापूर्वी या कंपनीने काम सुरू केले. तीनच महिन्यात कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला. पगार वेळेवर होत नाहीत, कामाचे तास ठरलेले नाहीत. जास्तीचे काम करावे लागते हे मुद्दे कामगारांकडून वारंवार उपस्थित केले जात होते. आता कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. सोमवारी झोन क्रमांक तीनच्या कामगारांनी चार तास काम बंद आंदोलन केले. पगार मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. मंगळवारी झोन क्रमांक दोन आणि नऊ मधील कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे या दोन्हीही झोन कार्यालयाच्या क्षेत्रात कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद होते. पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचे दीड कोटी रुपये महापालिकेकडे थकले आहेत. थकीत रकमेपोटी पालिकेने कंपनीला साठ लाख रुपयांचे पेमेंट केले आहे. त्यानंतरही कामगारांचे आंदोलन होत असल्यामुळे सोमवारी सायंकाळी आणखी पंचेवीस लाख रुपयांचे पेमेंट कंपनीला केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. महापालिकेकडून पेमेंट मिळो किंवा न मिळो, कामगारांचा पगार कंपनीने करावा असा उल्लेख करारात आहे. असे असताना कामगार वारंवार आंदोलन का करतात, अशी विचारणा करणारी नोटीस महापालिकेने रेड्डी कंपनीला बजावल्याचे महापौर म्हणाले. कामगारांचे आंदोलन वारंवार होत असेल तर पालिकेला पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असा उल्लेख महापौरांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट