म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या आदेशामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी जगमित्र साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती. पूस (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील जुने सर्वेक्षण क्रमांक २४, २५ आणि इतर ही शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी हे होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही, मात्र मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमत करून परस्पर स्वतःच्या नावे नोंदवून घेतली; तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतःच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. ही सर्व जमीन नंतर धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे खरेदी केली आणि त्यांचे अकृषक (एन.ए.) केले. फड यांनी यासंदर्भात बर्दापूर पोलिस ठाण्यात दिली मात्र, राजकीय दबावामुळे या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यावर तक्रारदार राजाभाऊ फड यांनी गेल्यावर्षी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. यात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदी १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती.
सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. उच्च न्यायालयाने दाखल कागदपत्रांची तपासणी करून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याने याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल.
- डी. आर. काळे, सहाय्यक सरकारी वकील
या जमिनीसंदर्भात महंत हे ट्रस्टी आणि पुजारी यांच्यात वाद होता. हा दावा न्यायालयात गेला आणि डिक्रीच्या आधारे देशमुख हे या जमिनीचे मालक ठरले. २०१२मध्ये देशमुख यांच्याकडून मुंडे यांनी ५० लाख रुपयांचा व्यवहार करून ही जमीन खरेदी केली. रेकॉर्डवर शासनाची जमीन असल्याची कोणतीही नोंद नव्हती. या जमिनीची खरेदी कायदेशीर मार्गानेच करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
- सिद्धेश्वर ठोंबरे ,धनंजय मुंडे यांचे वकील
ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून फसवणूक करून तिची परस्पर विल्हेवाट लावली आणि तशा नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये; तसेच या शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने कलम ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा. इनामी जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसतानाही पदाचा गैरवापर करुन ही जमीन खरेदी केली.
- व्ही. डी. सपकाळ, याचिकाकर्त्याचे वकील
- बेलखंडी मठाची जमीन : १७ एकर ३४ गुंठे
- मुंडेंनी खरेदी केलेली जमीन : ७ एकर ३२ गुंठे
- जमिनीचा खरेदी व्यवहार : ५० लाख रुपये