म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यभर दमदार पाऊस पडत असताना मराठवाड्यात पुरसे पाऊस पडलेला नाही. अपेक्षित सरासरीच्या तुलनेमध्ये विभागातील ७६ पैकी तब्बल ४० तालुक्यांमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात यंदा पूर्वमोसमी पावसाने दगा दिल्याने मान्सूनच्या पावसावरच पेरण्यांची मदार होती. गेल्या दोन आठवड्यांपासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस काही मंडळामध्येच पडत आहे. मराठवाड्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७९९ मिलीमिटर पावसाची सरासरी आहे. जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६७.३४ मिमी (३६.४ टक्के) पाऊस झाला आहे. सध्या केवळ औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री व सोयगाव तालुक्यानेच अपेक्षित सरासरी गाठली असून उर्वरित एकाही तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झालेला नाही. निम्माही पाऊस न झालेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक १४ तालुके नांदेड जिल्ह्यातील आहेत. निम्माही पाऊस न झालेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, कन्नड, खुलताबाद, जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफ्राबाद, अंबड, परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत व औंढा नागनाथ या तालुक्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव व मुखेड, बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, अंबाजोगाई, परळी, लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, चाकूर, जळकोट तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यातही सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट