म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महापालिकेची आर्थिकस्थिती सुधारावी याकरिता आयोजित मालमत्ता कर विशेष वसुली मोहिमेत महापालिकेचेच प्रशासन गाफील असल्याचा अनुभव पहिल्याच दिवशी आला. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोचलीच नाही; त्यामुळे नागरिकांकडून फारच कमी प्रतिसाद मिळाला. गुरुवारी दिवसभरात सुमारे तीन लाख रुपयांची वसुली झाली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेऊन मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिमेची घोषणा केली. ही मोहीम ११ ते २२ जुलै दरम्यान राबवली जाईल, असे त्यांनी आठ दिवसआधी जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी ११ जुलै रोजी सातारा भागातून मोहिमेला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले होते. मोहिमेसाठी आवश्यक सर्व नियोजन करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारचे नियोजन केले नाही. विशेष वसुली मोहिमेची माहिती जाहिराती, रिक्षांमधून घोषणा याद्वारे नागरिकांना करून देणे गरजेचे होते. यापैकी प्रशासनाने काहीच केले नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी विशेष मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. सातारा वॉर्डाबरोबरच झोन क्रमांक १ मध्ये देखील ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून दिवसभरात सुमारे तीन लाख रुपये जमा झाले. या मोहिमेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल. जे कर्मचारी कामात कुचराई करतील त्यांना कमी केले जाईल. महापालिकेचे कायमस्वरुपी अधिकारी, कर्मचारी देखील या मोहिमेत आहेत. त्यांची कामगिरीही तपासली जाईल. कामात कुचराई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आयुक्तांकडे शिफारस केली जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली. \Bमहापौरांकडून खंत \B विशेष वसुली मोहिमेची प्रशासनाकडून कोणतीच तयारी नसल्याबद्दल महापौर घोडेले यांनी नाराजी व्यक्त केली. मोहिमेच्या माध्यमातून मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली व्हावी, कर आकारणी न झालेल्या मालमत्तांना कर आकारणी केली जावी, कर आकारणीनंतर तत्काळ वसुली व्हावी याकरिता ही मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे, असे महापौर म्हणाले. मोहिमेसाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट