म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद अमरावती-पुणे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या पाच कुटुंबांची रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी आरोपी माधव उर्फ महेश दत्ताराव कदम याच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (१७ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी रविवारी (१४ जुलै) दिले. या प्रकरणी शालिनी राकेश खंडेलवाल (३५, रा. वरुड, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३ जून २०१९ रोजी फिर्यादी हा अमरावती-पुणे एक्सप्रेसच्या कोच एस २ बर्थमध्ये कुटुंबासह प्रवास करीत होता. उखळी ते परळीदरम्यान बर्थमधील सर्व लोक झोपी गेल्याची संधी साधत आरोपीने फिर्यादीसह माधुरी रविंद्र ढेपे, फुलचंद नामदेवराव कहार, निलिमा अनिल वडगावकर व अश्विनी गिरीश मेश्राम यांचे मोबाईल, रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चैन असा सुमारे १ लाख १२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात परळी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान आरोपी माधव उर्फ महेश दत्ताराव कदम (२६, रा. फुटाणा, ता. कळमनुरी जि. हिंगोली) याला बुधवारी (१० जुलै) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने चोरलेल्या ऐवजापैकी मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, उर्वरित चोरीचा ऐवज आरोपीने त्याचा साथीदार प्रकाश आश्रोबा नागरगोजे याच्याकडे दिला असल्याने त्याचा शोध घेऊन त्याला अटक करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट