म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माणसाने केवळ यशस्वी न होता समाधानी व्हावे, असा सूर 'वेध भविष्याचा' या कार्यक्रमातून शनिवारी व्यक्त झाला. यशस्वी आणि समाधानी होण्यासाठीची गुरुकिल्ली मान्यवरांनी गुणवंतांच्या हाती दिली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या मनातील प्रश्न, शंका मोकळेपणाने विचारल्या. त्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही मिळाली.
सरस्वती भुवन आणि शारदा मंदिर शाळा या दोन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स. भु. शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. शिल्पा सातारकर, सीए रेणुका देशपांडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी आणि कवी दासू वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची त्रिसूत्री दिली.
डॉ. शिल्पा सातारकर म्हणाल्या, 'आपण जे काम करतो, ते खूप मन लावून केले पाहिजे. दहावी होईपर्यंत कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे मी ठरवले नव्हते. गुणवंत म्हणून आपला फोटो पेपरमध्ये प्रसिद्ध झाला पाहिजे हेच ध्येय होते. त्यादृष्टीने अभ्यास केला. अभ्यास करताना मला काय समजले ते मी स्वत:च्या भाषेत लिहून काढले. त्यामुळे अभ्यास पक्का झाला. प्रत्येक विद्यार्थ्याने नोटस् काढाव्यात. त्यातून आपली त्या विषयाबद्दलची समज पक्की होते. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. नियोजन करून अभ्यास कराव. केवळ नियोजन करून चालणार नाही तर, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील करावी,' असे आवाहन त्यांनी केले. दासू वैद्य म्हणाले, 'आपल्याला आपला शोध लागला पाहिजे. मी कोण आहे हे कळाले पाहिजे. नवीन विचार करता आला पाहिजेत. आपल्यात कल्पकता असावी आणि जिज्ञासा देखील पाहिजे.' यासाठी त्यांनी स्वत:चीच काही उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली. रेणुका देशपांडे यांनी 'कनसिव्ह, बिलिव्ह, अचिव्ह' ही यशाची त्रिसूत्री सांगितली. 'एखाद्या क्षेत्रात यश मिळवण्याची स्वत:च्या मनात इच्छा असावी. स्वत:वर विश्वास ठेवावा आणि मनात ठरवलेली गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायची तयारी पाहिजे, तर यश नक्की मिळेल,' असा उल्लेख त्यांनी केला.
मुकुंद कुलकर्णी यांनी ध्येय निश्चितीबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. 'स्वत:चे ध्येय निश्चित असले पाहिजे. डोळे बंद करून बघितले जाते ते स्वप्न आणि स्वत:च्या हिंमतीवर साध्य केले जाते ते ध्येय. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ स्मार्टनेस असून चालत नाही, आत्मविश्वास असलाच पाहिजे. असेल तर आपला स्मार्टनेस निभावून जाऊ शकतो,' असे ते म्हणाले. चारही मान्यवरांच्या मनोगतानंतर विद्यार्थी - विद्यार्थिनींनी त्यांना विविध प्रश्न विचारून आपल्या यशाचा मार्ग आखून घेण्यास सुरुवात केली. माजी विद्यार्थी संघटनेच्या सचिव बिजली देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष उमेश दाशरथी यांनी प्रास्ताविक, तर संघटनेचे संचालक प्रसाद कोकीळ यांनी मान्यवरांच्या मुलाखतीच्या सत्राचे सूत्रसंचालन केले. संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद माने यांनी आभार मानले.