म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदार यादीत नावे समाविष्ठ करून मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या संचालकांना स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार द्यावा, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका बाजार समितीचे संचालक राधाकिसन पठाडे यांनी खंडपीठात याचिका सादर केली. भारतीय राज्यघटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आमदाराची निवड करून विधान परिषदेवर पाठविण्यात येतो. या निवडणुकीत जिल्हा परिषद, महापालिका सदस्य आणि नगर पालिकेचे सदस्य मतदान करतात. 'एपीएमसी कायदा १९६३ कलम १२/२'नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुद्धा स्थानिक स्वाराज्य संस्था आहे. त्यामुळे निवडून आलेल्या संचालकाना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडणार आहेत. या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट