म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद रोजगाराभिमूख कौशल्य नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले. केवळ, पदवी उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीला सामोरे गेले पण, एकाही क्षेत्रातील कौशल्य अंगी नसल्याने अनेकांची निवड होऊ शकली नाही. संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक माहितीचा अभाव आणि रोजगाराभिमूख शिक्षण नसल्याने हे विदारक चित्र दिसले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन, नॅशनल करिअर सर्व्हिसेसतर्फे विवेकानंद कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित २६ कंपन्यांनी सहभाग घेतला. एक हजार २६९ पदांसाठी कंपन्यांनी विविध टप्प्यांत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. बहुतांशी अतांत्रिक पदांसाठीची भरती असल्याने बारावी, विविध पारंपारिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासह डिप्लोमा, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. तीन हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दोन हजार ५९६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विविध कंपन्यांमधील मनुष्यबळ विकास विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. उमेदवारांना संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक माहितीसह समूह चर्चा, प्रात्यक्षिकांच्या आधारावर विद्यार्थ्यांची पारख करण्यात आली. अनेकांनी मुलाखतीचा पहिला टप्पात पूर्ण करता आला नाही. यामध्ये बायोडेटा तयार करण्याबरोबर संभाषण कौशल्य, तांत्रिक माहितीचा अभाव असल्याचे समोर आले. प्राथमिक निवड यादीतून अनेकांनी अंतिम निवड करताना मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली. सायंकाळपर्यंत १५९ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. प्रारंभी उद्घाटन सोहळ्याला प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक समन्वयक एन. एन. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. \Bकौशल्याचा अभाव\B मेळाव्यात सेल्स ऑफिसर, कॉल सेंटर एक्झिकेटिव्ह, बँक ऑफिसर एक्झिकेटिव्ह, ईपीपी ट्रेनी, प्लेसमेंट एक्झिकेटिव्ह, सेल्स ऑफिसर, मार्केटिंग एक्झिकेटिव्ह, प्रोजेक्ट कोऑडिनेटर, एटीएम ऑपरेटर, ज्युनिअर अकाउंटंट, सर्व्हिस इंजिनीअर, बिझनेस डेव्हलपेंट एक्झिकेटिव्ह अशा विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी अभियांत्रिकी पदवीसह एमटेक पदव्युत्तर, बीसीए, एमए, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम अशा अभ्यासक्रमाचे पदवी, पदव्युत्तरधारक उपस्थित होते. अनेकांमध्ये कौशल्याचा अभाव होता. काहींना मुलाखतीला सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञानाची माहिती नव्हती. अभ्यासक्रमातील बारकावे माहिती नसल्याच्या नोंदी यावेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी एमए......................१४७ बीकॉम....................४१८ एमकॉम...................७६ अभियांत्रिकी पदवी.....१३० एमएस्सी.................२६९ बीसीएस.................४३४ बीबीए....................१५१ एमसीए...................७० आयटीआय..............१३० पॉलिटेक्निक.............२१६ एमसीव्हीसी..............३४ एमटेक......................२ ऑनलाइन नोंदणी : ३६७५ प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित : २५९६ प्राथमिक निवड : ३७३ अंतिम निवड : १५९ कंपन्यांचा सहभाग : २६ भरतीसाठी जागा : १२४० मुलाखतीमध्ये उमेदवारांना संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात आहेत की नाही, हे पाहिले जाते. आजच्या मुलाखतीदरम्यान आम्ही पाहिले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. चार-पाच वर्षे तयारी केलेली आहे मात्र, कौशल्यांचा अभावामुळे संधी मिळू शकली नाही. - डॉ. अनिल जाधव, समन्वयक, नॅशनल करियर सर्व्हिस. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासह आपल्यातील कौशल्य विकसित करण्यावर भर द्यायला हवे. अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रमाणे मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. विविध टप्प्यातून अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली. काही प्राथमिक निवड झाली असून, बुधवारी पुढची प्रक्रिया होणार आहे. - डॉ. अशोक गायकवाड, कम्प्युटर सायन्स, विभागप्रमुख, विवेकांनद कॉलेज.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट