म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठा आरक्षणानिमित्त क्रांतिदिनी नऊ ऑगस्ट २०१८ रोजी पुकारलेल्या बंदमध्ये समाजकंटकांनी घुसून वाळूज एमआयडीसी परिसरातील ५० कंपन्यांची तोडफोड करत ६० कोटींपेक्षा जास्त नुकसान केले. अवघ्या चार महिन्यांत या भळभळत्या वेदनेवर मात करत उद्योगांनी फिनिक्स भरारी घेत तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
गेल्या वर्षी क्रांतिदिनी शहरात शांततेत बंद सुरू असताना दुपारनंतर अचानक तरुणांच्या काही जमावांनी वाळूज एमआयडीसीमध्ये कंपन्यांना लक्ष्य केले. कंपन्यामध्ये शिरत मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत ही दंगल आटोक्यात आली नव्हती. पोलिसांनी दंगलीच्या विविध सात गुन्ह्यामध्ये अडीच हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले होते. मोठ्या प्रमाणावर धरपकड केली होती. या घटनेने उद्योग क्षेत्राचे अक्षरश: कंबरडे मोडले होते. मात्र, या संकटाला मोठा धैर्याने तोंड देत उद्योजकांनी वाटचाल केली. याबाबत उद्योजक राम भोगले 'मटा'शी बोलताना म्हणाले, 'पोषक वातावरण असेल तरच गुंतवणूकदार येतात पण, या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्राची प्रतिमा डागाळली. त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, या संकटावर उद्योजकांच्या एकजूटमुळे मात करता आली.
नकारात्मक विचार न करता सकारात्मक दृष्टीने पुढे जात येथील उद्योगक्षेत्राचा कसा विकास होईल, यासाठी सातत्याने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच घटनेनंतर अवघ्या चार महिन्यांत संबंधित उद्योजकांनी १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. उद्योग वाढीसाठी हा काळा दिवस नव्हे तर, उद्योग संकल्प दिन म्हणून साजरा केला जात आहे,' असे ते म्हणाले. भोगले म्हणाले, 'शेंद्रा आदी भागात काही नवीन उद्योग निश्चित आले. मात्र, येथील काही उद्योजकांनी प्रकल्प विस्तार केला असे फारसे घडले नाही. एका वर्षापूर्वी घडलेल्या घटनेमुळे असे झाले असे म्हणता येणार नाही तर, हवाई वाहतूक नसणे, वाहन क्षेत्राबाबत जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना, दुष्काळी परिस्थिती यासह अन्य कारणेही यामागे असू शकतात. उद्योग वाढीसाठी अधिक पोषक वातावरण निर्मितीसाठी सर्वांचे संघटित प्रयत्न सुरू आहेत. त्यात शासनानेही अधिक पुढाकार घ्यावा, पायाभूत सुविधा द्याव्यात,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक नितीन देशमुख म्हणाले, 'नऊ ऑगस्ट २०१८ रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी झालेले आंदोलन हे लोकशाही पद्धतीने केले. त्यावेळी वाळूज एमआयडीसीत जो हिंसाचार झाला यात आंदोलकांचा सहभाग नव्हता. काही समाजकंटकांनी त्यांच्या फायद्यासाठी तसेच 'एमआयडीसी' विस्कळीत करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले होते. त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते त्यातील काही मागण्या काही अंशी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलनातील काही जणांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने ते त्वरित मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. त्यानंतर वर्षभरात कुठेही हिंसाचाराचे पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे कामगार किंवा मराठा मोर्चा आंदोलनाचा यात सहभाग नव्हता यावरून हेच यावरून सिद्ध होते.'\B
\B
\Bदंगलीचा आंदोलनाशी संबंध नाही
\Bदंगलीचा आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा काही सबंध नाही, हे त्याच वेळी पेालिस प्रशासनाने स्पष्ट केले होते. दरम्यान, या दंगलीमागे अनेक वेगवेगळी कारणे असल्याचे तपासात समोर आले. यामध्ये कंपनीच्या युनियनमधील वाद, कंपन्यातून कमी केलेले कामगार, कंत्राटी कामगार आदी कारणांचा समावेश होता. दंगलीनंतर वाळूज एमआयडीसी परिसरात आणखी एक पोलिस ठाणे उघडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, एका नविन पोलिस चौकीची सुरुवात 'एमआयडीसी'त करण्यात आली. वर्ष उलटले तरी नवीन पोलिस ठाण्याची चर्चा तशीच राहिली.
दंगलीच्या घटनेतून बाहेर पडत सर्वांनी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केले. काय होऊ नये, त्यासाठी काय केले पाहिजे, हेच त्या घटनेतून शिकलो. म्हणूनच नऊ ऑगस्ट हा दिन उद्योगवाढीसाठी, पोषक वातावरणसाठी उद्योग संकल्प दिन साजरा केला जात आहे.
-राम भोगले, उद्योजक
--
त्या दिवशी जे काही घडले ते कोणत्याही औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी चांगली बाब नाही. अशा घटनेचा मोठा विपरित परिणाम त्या औद्योगिक क्षेत्रावर होतो. मात्र, सर्वांच्या प्रयत्नामुळे आज येथील औद्योगिक क्षेत्रातील वातावरण खूपच पोषक असे झाले आहे.
-प्रसाद कोकीळ, उद्योजक
--
तोडफोडीची घटना औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत वाईट होती. अनेक उद्योगांचे मोठे नुकसान झाले. मालमत्तेची नासधूस झाली होती. स्वखर्च करत उद्योजकांनी पुन्हा नव्या उमेदीने कंपन्या उभारल्या आहेत. येथील औद्योगिक क्षेत्राची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहे.
- ज्ञानदेव राजळे, उद्योजक
----