म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्था व अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण घटक असतात. भारतीय मानसिकता आजही वसाहतवादी प्रभावातून मुक्त नसल्याने आजच्या शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आली आहे. आजच्या काळात शिक्षणामध्ये शिक्षकांची तटस्थता, अज्ञान, जागरूकतेचा अभाव या मोठ्या समस्या झाल्या आहेत. या दूर होऊन शिक्षकाला राष्ट्र निर्मात्याची भूमिका बजावावी लागेल,' असे आवाहन प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले. विवेकानंद महाविद्यालय आणि भारतीय शिक्षण मंडळ, देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 'नवभारत निर्मितीत उच्च शिक्षणाची भूमिका' या विषयावर एक मंगळवारी विवेकानंद महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयटी तज्ज्ञ प्रशांत पोळ यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे उपस्थित होते. उद्घाटकीय भाषणात पोळ म्हणाले, 'भारतातील शिक्षण परंपरा या अत्यंत भव्य आणि गौरवशाली होत्या. शिक्षणातून समृद्धी भारतामध्ये अनुभवास येत होती. प्राचीन काळात शैक्षणिक प्रगतीमुळेच भारत विश्व व्यापारामध्ये नेतृत्व करीत होता.' जे. नंदकुमार म्हणाले, 'आजच्या काळात शिक्षणामध्ये शिक्षकांची तटस्थता, अज्ञान, जागरूकतेचा अभाव मोठ्या समस्या झाल्या आहेत. या दूर होऊन शिक्षकाला राष्ट्र निर्मात्याची भूमिका बजावावी लागेल असे सांगत शिक्षकांनी तटस्थ राहू नये,' असे आवाहन केले. समारोप सत्रात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी 'भारतीय शिक्षण पाश्चात्त्य प्रभावाने बळी पडत आहे. आज घडीला भारतीय शिक्षणामध्ये सामाजिक प्रासंगिकता, गौरवशाली सांस्कृतिक वर्षाचा अभ्यास, प्रादेशिक गरजांशी पूर्तता, कौशल्य आधारित आणि मानवतावादाचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. येणारे नवीन शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षण व संशोधनावर भर देणारे असल्याचे,' त्यांनी नमूद केले. यावेळी श्रीमंतराव शिसोदे, प्रभाकर मोरे, कार्यशाळेचे संयोजक डॉ. अशोक गायकवाड, निमंत्रक प्रो. मकरंद पैठणकर, डॉ. योगेश भादे, डॉ. गोपाल बल्लोज, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य श्याम शिरसाठ यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट