विभागात परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे रब्बीची पेरणी उशीरा झाली. जानेवारी महिन्यांपर्यंत मराठवाड्यात रब्बीची ६१.२८ टक्के पेरणी झाली; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीत पिकांची प्रचंड वाताहत झाली आहे. प्रत्यक्ष क्षेत्र अधिक असले तरी रब्बीचे उत्पादन नगण्य आहे. सर्व पिकांच्या सरासरी उत्पादनात घट झाली असून यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी भयावह ठरले आहे.
तब्बल दोन महिने पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा फायदा झाला नाही. ऑगस्ट महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटले. कापूस, तूर आणि मका या पिकांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार दिला; मात्र दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पादन प्रचंड घटल्यामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही. पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची लागवड झाली नाही. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा केंद्रीत झाल्या होत्या. शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाची वाट पहावी लागली. जेमतेम पावसानंतर रब्बीची पेरणी झाली; मात्र अनेक भागात रब्बी पिकांची उगवण झाली नाही. ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांचे उत्पादन घटले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत मराठवाड्यात रब्बीची पेरणी करण्यात आली. जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यात कालव्याला पाणी सोडल्यानंतर रब्बीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. रब्बी तीळ, करडई, सूर्यफूल आणि इतर गळीतधान्याचे क्षेत्र वाढले आहे. सद्यस्थितीत विभागात रब्बीचे एकूण ६१.२८ टक्के क्षेत्र आहे. पहिल्या टप्प्यात जेमतेम १८ टक्के क्षेत्र होते. सध्या प्रत्यक्ष क्षेत्र जास्त असले तरी नैसर्गिक संकटांनी रब्बीची वाताहत झाली आहे. पावसाच्या फटक्यात ज्वारी आणि गहू पीक आडवे पडले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पावसाने उत्पादनात ४० टक्के घट होईल. तसेच धान्याचे रंग उडाल्यामुळे बाजारपेठेत कमी भाव मिळेल असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्याचे नगदी पीक असलेल्या कापसाचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी हेक्टरी ८ ते १० क्विंटल निघणारा कापूस यावर्षी अडीच ते तीन क्विंटल झाला आहे. तसेच कापसाला फक्त ३,२०० रुपये भाव मिळाला आहे. बुधवारी (११ मार्च) पडलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत.
पुन्हा पावसाची भीती
जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शनिवारी (१४ मार्च) पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे फळांची गळ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी हवामान विभागाने केले आहे. सध्या आंब्याचा प्रचंड मोहोर पावसाळी वातावरणात गळण्याची भीती आहे. या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
रब्बी हंगामात पिके चांगली आली होती; पण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. दुष्काळी मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. - जनार्दन जाधव, विभागीय कृषी सहसंचालक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट