म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
१२ लाखांच्या औरंगाबादमध्ये 'स्वाइन फ्लू'चा जंतुसंसर्ग एक लाख व्यक्तींना झाल्यास, त्यांच्यापासून केवळ दीड ते दोन हजार व्यक्तींमध्येच 'स्वाइन फ्लू'ची लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यातील ५०० ते १००० लोकांनाच दाखल करण्याची वेळ येऊ शकते. यातील मोजक्याच लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे भीती सोडा आणि काळजी घ्या, असे आवाहन शहरातील वैद्यकतज्ज्ञांनी केले.
एमआयटी हॉस्पिटलच्या वतीने 'स्वाइन फ्लू'बाबत 'धोका सर्वांना, जबाबदारी सर्वांची' या विषयावर रविवारी हॉस्पिटलमध्ये चर्चासत्र झाले. या प्रसंगी एमआयटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. जगन्नाथ दीक्षित, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय गायकवाड, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी नागरिकांना 'स्वाइन फ्लू'विषयी शास्त्रीय माहिती दिली.
डॉ. गायकवाड म्हणाले, 'या आजाराचा संसर्ग हा 'स्वाइन फ्लू'बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकल्यातून, थुंकण्यातून होऊ शकतो. दोन ते तीन फुटांपर्यंत हे विषाणू खोकल्यातून जाऊ शकतात. त्यामुळे बाधित व्यक्तींनी किंवा संशयित रुग्णांनी किंवा या काळात सर्दी-खोकला होणाऱ्या रुग्णांनी रूमाल अथवा मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच अशा रुग्णांपासून नागरिकांनी दूर राहणे आणि रुग्णांनी स्वतःहून गर्दीपासून शक्यतो दूर राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी अनेकांना जंतुसंसर्ग होऊनही त्याची कुठलीही लक्षणे किंवा त्रास होत नसतो; परंतु त्यांच्यापासून इतरांना जंतुसंसर्ग होत राहतो. अशांना 'सब-क्लिनिकल केसेस' म्हटले जाते आणि त्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. रोग प्रतिकारशक्तीमुळेच बहुतेकांना याचा त्रास होत नाही, तर काहींना याचा त्रास होता. आजाराची तीव्र लक्षणे दिसल्यानंतरच किंवा इतर आजारांमुळे 'स्वाइन फ्लू' होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांना 'टॅमी फ्लू' औषधी सुरू केली जाते. यामध्ये ६५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक, पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले, गर्भवती यांनाही जंतुसंर्गाचा जास्त धोका असतो,' असेही डॉ. गायकवाड म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट