मित्राच्या नातेवाईक तरुणीचे लग्न मोडण्यासाठी दोन हजार रुपयांची सुपारी घेणे नांदेडच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणीच्या भावी पतीने मित्राच्या साह्याने त्याला रेल्वेस्टेशनवर चांगलाच चोप दिला. लग्न मोडण्याची सुपारी घेणाऱ्यास उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
नांदेड येथील दीपक ठाकूर या तरुणाचे नात्यातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. तिच्या पालकांनी तिचे लग्न पैठण तालुक्यातील एका तरुणासोबत ठरवले. हे लग्न मोडण्याची जबाबदारी दीपकने त्याचा मित्र अभय गंगाधर पैतवाल (वय २५, रा. गाडीपुरा, नांदेड) याच्यावर सोपवली. त्यासाठी दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले. अभय पैतवाल तरुणीच्या भावी पतीला फोन करून तिच्याबद्दल खोटी माहिती देत होता. तिचे व दीपकचे फोटो आहे, असे त्याने सांगितले होते, तसेच लग्न न करण्याबद्दल धमकी देत होता. त्याने औरंगाबादला बुधवारी (२५ मार्च) येऊन फोटो दाखविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता अभय रेल्वे स्टेशनवर पोहचला, परंतु भावी पती व त्याच्या मित्रांनी अभयच्या स्वागताची चांगलीच तयारी केली होती. अभय समोर येताचा त्याला चोप देण्यास सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या मारामारीबद्दल नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर स्टेशनजवळ असलेले क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी अभयला सोडवून उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी अभयविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेशनवर अफवा
रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण होत असल्याने नेमके काय झाले याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी पकडली, तरुणाचे अपहरण केले, आदी अफवा पसरल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात प्रकरण वेगळेच निघाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट