उन्हाळा सुरू झाल्याने बाजार समिती व जुन्या मोंढ्यात वार्षिक धान्य खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे यावर्षी धान्याचे भाव चढे असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व धान्याचे भाव प्रति किलो सरासरी १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत.
उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिक वर्षभराचे धान्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जुना मोंढा आणि जाधववाडीतील व्यापाऱ्यांनी गेल्या महिन्यात भरविलेल्या तांदूळ महोत्सवात विक्रमी विक्री झाली. त्यापाठोपाठ आता वार्षिक खरेदीला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपासून दररोज सरासरी २२५ क्विंटल गहू, २५० क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगाव व सोलापूर जिल्ह्यातून ज्वारीची आवक होत आहे. बाजरीची आवक घटली असून दररोज सरासरी सुमारे ४० ते ५० क्विंटल बाजरी येत आहे. गव्हाची आवक मराठवाडा, इंदूर, राजस्थान, आणि गुजरातमधून होत आहे.
गहू सुमारे १४५० ते २८०० रुपये क्विंटल या दरम्यान विकले जात आहे. तूर डाळ ४६०० रूपये ते ५४०० रूपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजार समितीत विकली जात आहे. हरभरा ३२०० रुपये क्विंटल ते ३६०० रुपये क्विंटल या दराने विकले जात आहे. बाजारीचे दर १२४० ते १४५० या दरम्यान आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणारे ग्राहक हैराण झाले आहेत.
राजस्थानी आडत्यांची भूमिका महत्वाची
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जुन्या मोंढ्यातील खरेदी-विक्रीत राजस्थानचे आडते महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर गव्हाची आवक आहे. परंतु, ग्राहकांची मागणी मध्यप्रदेशाच्या गव्हाला आहे. सध्या दहापेक्षा जास्त प्रकारचे गहू उपलब्ध आहेत. लोकवन, शरबती, सिहोर या गव्हाला अधिक मागणी आहे. या गव्हाचे दर साधारणत: २८ ते ३८ रुपये किलो दरम्यान आहेत.
गहू २८ ते ३५ रुपये किलो
तांदूळ ३८ ते ६० रुपये किलो
ज्वारी १६ ते २३ रुपये किलो
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट