महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र द्यावेच लागणार आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधतेचे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी न देता पुढील सहा महिन्यात उमेदवाराला सादर करता येईल असा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने जाहीर केला, पण तसे लेखी आदेश अजून मिळाले नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला. उमेदवारी अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र जोडण्याची व जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. निवडणूक झाल्यावर पुढील सहा महिन्यात संबंधित उमेदवाराने हे प्रमाणपत्र जमा करावे असे या निर्णयात म्हटले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, 'शासनाचा निर्णय झालेला असला तरी तसे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जुन्या आदेशानुसारच उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवाराला जमा करावे लागेल.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सर्व प्रकारच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना व महिलांना २,५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारी अर्जाची किंमत दहा रुपये असून या अर्जाच्या सोबत तीन शपथपत्रांचे नमुने उमेदवारांना दिले जाणार आहेत.'
अर्ज ऑनलाईन भरावा लागणार
उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. अर्जासोबत जोडायचे प्रमाणपत्र मात्र उमेदवारांना समक्ष द्यावे लागणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवून दिली आहे. पूर्वी एका उमेदवाराला तीन लाख रुपये खर्चाची मर्यादा होती, आता ही मर्यादा एक लाख रुपयांनी वाढवून चार लाख रुपये केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट