पाचवीला पूजलेल्या दुष्काळामुळे मराठवाड्यात यंदा पुन्हा एकदा पाणीटंचाईचे मोठे गंभीर संकट उभे राहिले आहे. विभागातील सर्वच ७६ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये २५५ दशलक्ष घनमीटर (११.७५ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. महिन्याभरामध्ये पाण्याची पातळी ७ टक्क्यांनी घसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून परळी औष्णिक केंद्राला ९०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाचा पाराही चांगलाच वाढला. त्यामुळे जायकवाडीतील पाण्याच्या बाष्पीभवनामध्येही वाढ होऊन पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. २ मार्च रोजी जायकवाडीमध्ये ४०२ दशलक्ष घनमीटर (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पाराही ३५ अंशापेक्षा पुढे गेला होता. याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला. ९ फेब्रुवारी रोजी जायकवाडीमध्ये ५३१ दशलक्ष घनमीटर (२४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता, मात्र मार्च व एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बाष्पीभवन वाढले व त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी झाली.
मे महिन्यात तळ ?
जायकवाडीमध्ये झपाट्याने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच अशी अवस्था असल्यामुळे मे महिन्यामध्ये पाण्याची अवस्था आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे. पाणी कमी होण्याचा असाच वेग असेल तर मेमध्ये जायकवाडीतील पाणी तळ गाठण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट