धनंजय लांबे
'जया अंगी नगरसेवकपण तया यातना कठीण' याची प्रचीती देणारे असंख्य किस्से गेल्या पाच वर्षांत घडले. नगरसेवकांनी आपले दु:ख वेगवेगळ्या व्यासपीठांवर बोलून दाखविले, तरीही निवडणूक येताच नगरसेवक होण्याचा हव्यास कोणालाही सोडवत नाही. या निवडणुकीतही दोनेक हजार लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांचे उद्देश काय आहेत, हे मतदारांपासूनही लपून राहिलेले नाही. यापैकी बरीच मंडळी 'अर्थपूर्ण' माघार घेतील, तर काही लोक केवळ आपल्या नावाची चर्चा व्हावी म्हणून माघार घेणार नाहीत. नावासाठी लोक बरंच काही करतात, पण निवडणूक हा चर्चेत येण्याचा, कमी खर्चाचा राजमार्ग आहे.
आपल्या महापालिकेची तिजोरी कायम रिकामी. त्यामुळे विकासकामे मिळवण्यासाठी नगरसेवकांची स्पर्धा लागते. अनेकदा केलेल्या कामांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून कंत्राटदार कामे अपूर्ण ठेवतात आणि नागरिक नगरसेवकांनाच दोष देतात. सकाळी वेळेवर पाणी आले नाही की नगरसेवकाचा फोन खणखणतोच, पण कचरागाडी आली नाही किंवा संध्याकाळी रस्त्यावरील दिवे लागले नाहीत तरी लोकांना नगरसेवकच आठवतो. मुळात इतकी कटकट असूनही निवडणुकीत हे पद मिळविण्यासाठी चढाओढ चालते. यामागे नक्कीच काहीतरी गूढ असावे. पक्षाचे तिकीट मिळविण्याचे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्येक मतदाराचे घर गाठून हात जोडायचे. त्याने गेल्या वेळी मत दिलेले नाही हे ठाऊक असताना 'तुमच्यामुळेच मी निवडून आलो, यावेळीही आशीर्वाद द्या,' अशी आर्जवं करायची, उधार-पाधार करून, कर्ज काढून किंवा एखादा प्लॉट विकून काही लाख रुपये उभे करायचे आणि एवढे सगळे करूनही निवडणुकीत पराभव पत्कराला लागला की सर्वकाही विसरून पुढील निवडणुकीची तयारी करायची...
नगरसेवकांचे हे शल्य असले, तरी निवडणुकीत रंग भरतोच. याची कारणे अनेक आहेत. शहरातील बहुसंख्य नागरिक कामकरी आहेत. सकाळी कामावर किंवा व्यवसायावर जाऊन संध्याकाळी घरी परतणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. जे कामकरी नाहीत, त्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी आहेत. ते आपापल्या अभ्यासात, मौजमजेत मग्न, तर गृहिणीदेखील दिवसभर आपल्या घरकामात रमलेल्या असतात. त्यामुळे सहसा कोणी नगरसेवकाची आठवण काढत नाही. वॉर्डाच्या ज्या भागातून कायम तक्रारी येतात, तेथील व्यवस्था चोख ठेवली तर फारसा त्रास होत नाही, याची कल्पना नव्या नगरसेवकाला वर्षभरातच येते. एखादे काम होतच नसेल तर त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडून तो मोकळा होतो. लोक खूपच तक्रारी करत असतील तर फोन बंद करून ठेवणारे किंवा आपला फोन एखाद्या आज्ञाधारक कार्यकर्त्याच्या हाती सोपवणारे नगरसेवक गेल्या महापालिकेत तरी बरेच होते. पाणी, स्वच्छता, वीज, रस्ते या क्रमाने तक्रारींचे प्रमाण असते. उच्चशिक्षित मतदार एखाद्या कामासाठी एक-दोन वेळा फोन करतात आणि ते होत नसेल तर पिच्छा सोडून देतात. पाणी वगळता एखाद्या विकासप्रश्नावर नगरसेवकाला नागरिकांनी घेराव घातल्याची किती उदाहरणे गेल्या २५ वर्षांत सापडतात?
आपण ज्या नगरसेवकाला निवडून दिले, त्याने आपल्या वॉर्डात नागरी सुविधा पालिकेच्या खर्चाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याचेच भान बहुसंख्य मतदारांना नसते. पाच वर्षांतून एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण झाले, अशीच बहुतेकांची धारणा आहे. त्यांना नगरसेवकाचे घर किंवा फोन नंबरही ठाऊक नसतो. जे वॉर्डाच्या विकासाबद्दल जागरुक आहेत, ते नगरसेवकाला क्षणाचीही उसंत घेऊ देत नाहीत. नवनवीन कल्पना सांगून ते भंडावून सोडतात, पण असे वॉर्ड अत्यल्प आहेत. तेथे एकही समस्या शोधून सापडत नाही.
शहरातील काही वॉर्डांमधील निवडक वसाहती अशा आहेत, जेथे किमान तीन तास पाणी सोडले जाते. रस्त्यावरील एकही दिवा बंद दिसत नाही आणि कचरा नियमितपणे उचलला जातो. नगरसेवकाच्या कार्यकुशलतेचा हा परिणाम आहे. बहुतेक वॉर्ड असे आहेत, जेथील मतदारांना नगरसेवक निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीतच दिसतो. अर्थात, नगरसेवकांकडून अपेक्षा आहेत आणि शहराबद्दल आस्था आहे म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडतात. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न क्वचितच काही वॉर्डांमध्ये दिसून येतो. एरवी महापालिकेत निवडणूकवीरांचेच प्रमाण मोठे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट