टीम मटा, औरंगाबाद
अवकाळी पाऊस राज्याची पाठ काही सोडताना दिसत नाही. अवकाळी पावसाच्या तडाख्याने शनिवारी मराठवाड्यासह नाशिक, कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहदमदनगर औरंगाबाद, नांदेड, जालना व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर झाड पडल्याने १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्याने झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जालना जिल्ह्यात मोठया प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
बीडमध्ये वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, जालन्यात भोकरदन, जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीने थैमान घातले. सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नांदेड जिल्ह्याला सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने रब्बी पिकासह जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. तर एका महिलेचा वीज पडल्याने मृत्यू झाला.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. भूम, परंडा तालुक्यातील काही भागात वाळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात पाऊस झाला. यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील बऱ्याच गावात गारपीट झाली.
नाशिक जिल्ह्यालाही शनिवारी पावसाने झोडपले. येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगावसह जिल्ह्यातील इतर भागात अवकाळी पावसाने जोरदार वादळी वाऱ्यांसह १० ते १५ मिनिटे तडाखा दिला. मालेगाव तालुक्यात दुपारी अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर, सांगली, कराड शहरासह पाटण तालुक्याला शनिवारी दुपारी वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारपीठ व अवकाळी पावसाने झोडपून काढले.
मराठवाड्याला पावसाचा तडाखा
अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर झाड पडल्याने १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्याने झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
वीज पडल्याने एकाचा मृत्यू
बीड जिल्ह्यात शनिवारी दुपारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी दुपारी तासभराहून अधिक काळ दमदार पाऊस झाला. चिंचोटी (ता. वडवणी) येथील श्रीराम सोपानपाटणकर (वय ५०) या शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला. या पावसाने बीड वडवणी कुप्पा परिसरात रस्त्यावर मोठे झाड पडल्याने बीड-परळी मार्ग बंद झाला होता. हे झाड बाजूला करून रास्ता सुरळीत करण्याचे काम सुरू होते. झाड पडल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना हिवारसिंग येथे घडली. गावातील मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू होता. त्यावेळी जेवायला बसलेल्या नागरिकाच्या अंगावर झाड पडल्याने भिंत कोसळल्याने १२ जण जखमी झाले.
नांदेडमध्ये वादळी पाऊस
नांदेड जिल्ह्याला सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला. शनिवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात ९६ मिली मीटर पाऊस झाला आहे.
लातूरमध्ये हजेरी
लातूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लातूरात १५ मिनिटेच जोरदार पाउस झाला. अहमदपूर आणि चाकुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाउस झाला. रेणापूरात ही पाउस सुरु असल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबादमध्ये रिमझिम
उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. भूम, परंडा तालुक्यातील काही भागात वाळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात पाऊस झाला.
झाड उन्मळून पडले
अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याची व काही प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तालूक्यातील गणोरी, बाबरा, वडोदबाजार परीसरात सर्वञ पाऊस झाला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावर आळंद परीसरात झाड उन्मळून पडले होते.
वैजापूरकरांना दिलासा
वैजापूर शहर व परिसरात शनिवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांची सुटका झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरु होता. त्यामुळे तापमानात घट होऊन उन्हाच्या काहिलीपासुन नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
सिल्लोडमध्ये गारपीट
सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील बऱ्याच गावात गारपीट झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कांदा बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वडाळा येथे जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट