टीम मटा, औरंगाबाद
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. रविवारी बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारा पडल्याने फळबागा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
बीड जिल्ह्यात गारपीट
बीडः जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले. बीड शहरासह अनेक भागात वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे व विजेचे पोल कोसळण्याच्या घटना घडल्या. केज, बीड, धारुर तालुक्यात रविवारी गारांचा पाऊस झाला. धारुर तालुक्यातील आंबेवडगाव, पहाडी पारगाव, धुनकवड परिसरात गारपीट झाल्याने फळबागा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या परिसरात आंब्याच्या बागात कैऱ्याचा सडा पडला होता. बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथेही गारपीट व पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीटभट्याचे नुकसान झाले आहे.
कळंबमध्ये गारांचा पाऊस
उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. कळंब परिसरात सायंकाळच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झाडाला लागलेल्या आंब्याचा सडा पडला आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास गाराच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा लाभला. मात्र, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी पहिल्यांदाच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
नांदेडमध्ये वादळी वारे
नांदेडः नांदेड जिल्ळ्यात शनिवारी रात्री उशीरा विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाबरोबर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, नायेगावसह अनेक तालुक्याला बसला आहे. हिमायतनगर, किनवट, भोकर तालुक्याला या अवकाळी पावसाने हैराण करून सोडले आहे. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणीसह सरसम, पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी , वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी, पोटा, सिरंजनी या ग्रामीण भागात बसला आहे. त्यामुळे कापून ठेवलेला हरभरा, करडी, उभा गहू आडवा होवून, हाती आलेल्या संत्र्या -मोसंबी सह आंब्याची कार्याची फळे गळून पडली आहेत. तर तालुक्यातील अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली.
लातूर परिसरात अवकाळी पाऊस
लातूरः लातूर जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला. लातूर शहर व चाकूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी रात्री लातूर शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. फळबागा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट