Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोठ्या प्रमाणात बंडखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याची कबुली शिवसेनेचे नेते व पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. बंडखोरांसंदर्भात युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी रामदास कदम आज शहरात आले. समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'दोन वॉर्डातून उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. युतीच्या नेत्यांची बैठक घेऊन बंडखोरांबाबत निर्णय घेतला जाईल. आपण एकमेकांविरोधात लढलो तर लाभ दुसऱ्यांच होईल, हे बंडखोरांनी लक्षात घेतले पाहिजे. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा आपले कोण ते ओळखा, असे आवाहन मी बंडखोरांना करतो.' युतीची लढाई एमआयएमबरोबरच आहे, असे कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. समांतर जलवाहिनीसंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना रद्द झाली असती तर, त्यासाठी शासनाकडून आलेला निधीही परत गेला असता. शिवसेनेच्या दृष्टीने या शहराचे पाणी आणि योजना हे दोन्ही आवश्यक आहे. 'समांतर'च्या आडून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कदम यांनी केला.
राणेंनी ग्रामपंचायत लढवावी : रामदास कदम

नारायण राणे यांच्या पराभवासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले, 'राणेंनी आता नगर पालिका, ग्रामपंचायतीचा एखादा वॉर्ड शोधून तेथे निवडणूक लढवावी. राणे यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थपणे सांभाळली आहे. तासगावमध्ये शिवसेनेने आर. आर. पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. वांद्र्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांनी राणेंच्या रुपाने उमेदवार दिला. शरद पवारही त्यात सहभागी झाले. पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना धडा शिकविला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राणेंनी ग्रामपंचायत लढवावी : रामदास कदम

$
0
0

नारायण राणे यांच्या पराभवासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले, 'राणेंनी आता नगर पालिका, ग्रामपंचायतीचा एखादा वॉर्ड शोधून तेथे निवडणूक लढवावी. राणे यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थपणे सांभाळली आहे. तासगावमध्ये शिवसेनेने आर. आर. पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. वांद्र्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांनी राणेंच्या रुपाने उमेदवार दिला. शरद पवारही त्यात सहभागी झाले. पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना धडा शिकविला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घृष्णेश्वर कारखान्याची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना उद्योजक सतीश घाटगे यांच्या उमंग शुगर इंडस्ट्रीजने विकत घेतला आहे. मशिनरी दुरुस्ती व गाळपासाठी नियोजन करण्यात येत असून यंदा कारखान्याचे बॉयलर पेटण्याची चिन्हे आहेत. राज्य सहकारी बँकेकडून ताबा मिळाल्यावर कारखाना सुरू करण्याच्या कामाला वेग येणार आहे.

माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांनी घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन केला आहे. परंतु, हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. पर्यायाने कारखान्यावर राज्य बँकेसह इतरही बँकांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्जवसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने ४२ कोटी रुपयांच्या किंमतीत कारखाना लिलावात काढला. याअगोदरच्या लिलावात संपूर्ण पैसे न भरल्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. दुसऱ्या लिलावात उमंग शुगर इंडस्ट्रीजने घृष्णेश्वर कारखाना विकत घेतला. उमंग शुगरला राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातून कारखाना ताब्यात घेऊन मशिनरी दुरुस्ती, अधिकारी, कर्मचारी भरती, वाहतूक व्यवस्था, ऊसतोडणी कामगारांचा करार आदी कामे करावे लागणार आहेत.

उमंग शुगरने कारखाना विकत घेतला आहे. त्यांच्याकडून पैसे आल्यानंतर ताबा दिला जाईल. काही अटींवर कारखान्यात कामे करण्यासाठी परवानगी दिली आहे.

- एस. एम. म्हात्रे, व्यवस्थापक, राज्य सहकारी बँक

थोडक्यात इतिहास

१९८० मध्ये स्थापनेसाठी जुळवाजुळव

२७ मार्च १९८२ रोजी बँकेत खाते उघडले

१९ मे १९८९ ला इरादा पत्रासाठी प्रस्ताव

२२ मार्च १९९४ रोजी ओद्योगिक परवाना पत्र

१६ मे १९९४ ला साखर आयुक्ताकडे नोंदणी

२० डिसेंबर १९९४ राजी जागा निश्चिती

२० सप्टेंबर १९९५ रोजी भूमिपूजन

विक्रम प्रोजेक्टसला २ कोटी ९९ लाख ९८ हजार अदा

विक्रम प्रोजेक्टस या कंपनीसोबत यंत्रसामुग्रीबद्दल करार

विक्रम प्रोजेक्टस दिवाळखोरीत निघाल्याने काम रखडले

उत्तम इंजिनिअरिंगसोबत यंत्रसामुग्रीबद्दल नवा करार

१६ मे २००२ पासून यंत्रसामुग्री येण्यास सुरुवात

उत्तम इंजिनीअरिंगला १३ कोटी ५१ लाख रुपये अदा

विक्रम प्रोजेक्टविरुद्ध सहकार न्यायालयात दावा

दिलेली रक्कम व ८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या कवडीमोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पालेभाज्या कवडीमोल विकल्या जात आहेत, तर फळभाज्यांच्या किंमतीही उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे.

औरंगपुरा, पीरबाजार, टी. व्ही. सेंटर आणि शिवाजीनगर या भागातील भाजी मंडईत असलेले भाज्यांचे दर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या भाज्यांचे दर यातही फारशी तफावत नाही. कारण उत्पन्न, आवक आणि विक्री यांचा ताळमेळ सध्या व्यवस्थित बसत असल्याचे मत भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केले. औरंगाबाद जिल्हा, नगर आणि नाशिक भागातून शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होत आहे. सुमारे ८० ते १२० क्विंटल भाज्या गेल्या चार दिवसांत शहरात आल्या आहेत.

कोथिंबीरचे दर चढेच

कोथिंबीरचे दर अजूनही चढेच आहेत. १० ते १५ रुपयाला एक जुडी विकली जात आहे. पालक ३ ते ५, मेथी २ ते ४ तर चुकाही ५ रुपये जुडी विकला जात आहे. भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामन्यांनाही दिलासा मिळाला आहे. हे दर पुढील आठवडयापर्यंत कायम असतील, असा अंदाजही भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला.

भाज्यांचे किलोमागचे दर

वांगी २० ते ३० रु. (४० ते ५० रु.)

शेवगा २० ते ३० रु. (५० ते ६० रु.)

भेंडी ३० ते ४० रु. (६० ते ७० रु.)

गवार २० ते ३० रु. (५० ते ५० रु.)

पत्ताकोबी ५ ते २० रु. (४० ते ५० रु.)

फुलकोबी २० ते ३० रु. (४० ते ५० रु.)

दिलपसंद ४० ते ५० रु. (६० ते ८० रु.)

टमाटे १० ते २० रु. (३० ते ४० रु.)

(कंसात आठवड्यापूर्वीचे दर)

गारपीट व अवकाळीचा परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्या कवडीमोल दराने विकाव्या लागल्या. त्याचा पालेभाज्यांवर जास्त परिणाम झाला आहे.

- शशीकला खोबरे, भाजी विक्रेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना- भाजप वाढीला MIM मुळे मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष राज्यात धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठी दाखल झाला आहे. मुस्लिमांच्या एकत्रिकरणाची भाषा करीत हा पक्ष भाजप- शिवसेनेच्या जागा वाढवण्यास मदत करीत आहे,' असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसीम आझमी यांनी केला.

समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार महापालिका निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आमदार अबु आझमी शहरात आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकार परिषदेत एमआयएमच्या वाढत्या प्रभावाबद्दल मत मांडले. 'एमआयएमच्या राज्यातील प्रवेशापासून शिवसेना, भाजपच्या विजयाचे प्रमाण वाढले आहे. एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होते. त्याचा शिवसेना, भाजपला फायदा मिळत आहे,' असे आमदार आझमी म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी वांद्रे विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने उमेदवार दिला नाही. एमआयएमने मात्र येथे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी केली, असा आरोप त्यांनी केला. या पक्षाबद्दल सर्वसामान्य जनतेते काळजी घ्यावी, असा सल्ला आमदार आझमी यांनी दिला.

अपयश लपवण्यासाठी वाद

शिवेसना- भाजप युतीने महापालिकेत सत्ता भोगून २५ वर्षात शहराचा विकास केला नाही. हे अपयश लपवण्यासाठी सतत 'औरंगाबाद की संभाजीनगर' असा प्रचार केला जातो. औरंगाबादचे नाव बदलू शकत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे जैन बिनविरोध

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वेदांतनगरमधून (वॉर्ड क्रमांक १०३) काँग्रेसचे उमेदवार माणिकचंद आसाराम महतोले यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी अवैध ठरविला होता. त्याला महतोले यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. ही याचिका त्यांनी मागे घेतल्याने शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन हे वेदांतनगरमधून बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे २ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांचे भवितव्य या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून होते. या वॉर्डात जैन यांचाच उमेदवारी अर्ज शिल्लक होता. महतोले यांनी याचिका मागे घेतल्याने जैन यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. वेदांतनगर वॉर्ड हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही पाचवी वेळ आहे. ठाकूर यांना सविस्तर शपथपत्र सदर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले होते. या आदेशानुसार ठाकूर या शपथपत्र सादर केले. महतोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अपत्यासंदर्भातील शपथपत्र दाखल केले नव्हते, असे निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांनी शपथपत्रात म्हटले. या याचिकेची सुनावणी सुरू होताच महतोले यांचे वकील अश्विन साकोळकर यांनी माघार घेत असल्याचे शपथपत्र दाखल केले. निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके, जैन यांच्यातर्फे श्रीकांत अदवंत तर, पालिकेतर्फे अतुल कराड यांनी बाजू मांडली.

सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने माझी बिनविरोध निवड झाली, याचा मला आनंद झाला आहे. महतोले यांनी त्यांच्या अर्जासोबत शपथपत्र दाखल केले नव्हते म्हणूनच आक्षेप दाखल केला होता. तो मंजूर झाला. त्यांनी माघार घेतली आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे. माझ्या कामाची ही पावती आहे.

- विकास जैन, माजी महापौर

आता प्रचार करण्यास केवळ पाच दिवस उरले आहेत. एवढ्या कमी दिवसांत प्रचार करणे अवघड होते. त्यामुळे माघारीशिवाय पर्याय नव्हता.

- माणिकचंद महतोले, काँग्रेस उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कुचे यांना ‘स्वाइन फ्लू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना 'स्वाइन फ्लू' झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर शहरातील दंडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार कुचे यांच्यासह सात रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये 'स्वाइन फ्लू'चे उपचार सुरू आहेत. वातावरण बदलाने पुन्हा एकदा आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

एसआरएल लॅबच्या रिपोर्टनुसार आमदार कुचे यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय एकलहरा (ता. अंबड, जि. जालना) येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णावर शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. रहाटघन (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील ३० वर्षीय पुरुष रुग्णावर शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचा एसआरएल लॅबने दिलेल्या रिपोर्टनुसार स्वाइन फ्लूचे निदान झाले. या रुग्णांशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डात तीन संशयित रुग्ण व एक पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविली आहे. यापैकी एका गर्भवती महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचेही समजते.

दोन दिवसांत 'स्वाइन फ्लू'चे रुग्ण काहीसे वाढल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे असे रुग्ण वाढू शकतात. अर्थात, ही रुग्णांची वाढ खूप जास्त नाही.

- डॉ. मंगला बोरकर, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून ‘टाइम्स ऑटो कार्निव्हल’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वतीने औरंगाबादकरांसाठी १७ व १८ एप्रिल २०१५ रोजी दोन दिवसीय 'टाइम्स ऑटो कार्निव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये चारचाकी वाहनांच्या खरेदीवर आकर्षक सूट मिळणार आहे. शिवाय जुन्या वाहनांच्या एक्स्चेंजवर उत्तम किंमत मिळणार आहे. या कार्निव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वतीने वाचकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या 'टाइम्स ऑटो कार्निव्हल'मध्ये 'धूत हुंदाई' आणि 'फोक्सवॅगन- औरंगाबाद' सक्सेस पार्टनर म्हणून सहभागी आहेत. या कार्निव्हलमध्ये नव्या वाहनाच्या खरेदीवर अत्यंत आकर्षक ऑफर्स तर मिळणार आहेच, शिवाय आपल्याकडील जुन्या वाहनाच्या एक्स्चेंजसाठी उत्तम किंमत मिळू शकेल. नव्या वाहनाच्या स्पॉट बुकिंगवर यावेळी भरीव सूट देण्यात येणार आहे. यावेळी 'धूत हुंदाई' आणि 'फोक्सवॅगन - औरंगाबाद' वाहनांची टेस्ट ड्राइव्हची व्यवस्था करण्यात आली आहे.

'मटा' कार्यालयात आयोजन

टाइम्स ऑटो कार्निव्हलचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, साई स्क्वेअर, उस्मानपुरा येथे करण्यात आले असून, इच्छुकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोरांची सुरमा गँग जेरबंद

$
0
0

पकडण्यात आलेले कुख्यात सुरमा गँगच्या सहा दरोडेखोर.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोडेखोरांच्या कुख्यात सुरमा गँगच्या सहा दरोडेखोरांना गुन्हे शाखा व सातारा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली. बुधवारी रात्री नाथ व्हॅली शाळेजवळील परिसरात असलेल्या डोंगराच्या पायथ्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या आरोपीकडून दोन चाकू, लाकडी दांडे आदी साहित्य जप्त करण्यात आले.

सातारा परिसरात नेवासा येथील कुख्यात गुन्हेगार राहुल अशोक खंडागळे हा साथीदारांसह आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून सातारा पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी पोलिसांना सहा आरोपी आढळून आले.

आरोपी राहुल अशोक खंडागळे (रा. नेवासा), गौतम लक्ष्मणराव त्रिभुवन, योगीराज भास्कर सुर्वे, गजानन रमेश घोरपडे, दिनेश भीमराव भालेराव सय्यद नबी लाला (सर्व रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दोन चाकू, लाकडी दांडे, दोन दुचाकी, मिरची पूड आदी साहित्य आढळून आले. आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश खाडे, विलास वाघ, अशोक नागरगोजे, देविदास इंदोरे, अप्पासाहेब खिल्लारे, फिरोज पठाण, सुरेश कुसाळे, प्रमोद देवकाते, भागवत सुरवाडे, सातारा पोलिस ठाण्याचे राजेंद्र साळुंके, सतीश हंबर्डे, देशराज मोरे यांनी केली.

डोळ्यात अंजन घालून गुन्हे

या टोळीतील सदस्य कोणताही गुन्हा करण्यापूर्वी डोळ्यात अंजन घालत असत. त्यामुळे सुरमा गँग नावाने ही टोळी प्रसिद्ध आहे. यातील राहुल खंडागळे, गौतम त्रिभुवन व दिनेश भालेराव यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खून व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युतीच्या सत्तेसाठी एमआयएम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना-भाजपने शहराला ५० वर्षे मागे नेण्याचे काम केले, तर एमआयएमचे आगमनच युतीला सत्ता मिळवून देण्यासाठीच झाले आहे,'अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) रोशनगेट येथे आयोजित प्रचार सभेत केली.

'युतीने शहरासाठी काय केले, शहराच्या विकासासाठी कुठला निर्णय घेतला, याचा विचार नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी केंद्रात आणि राज्यातही 'अच्छे दिन' नव्हे 'बुरे दिन'ची सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यासाठी एमआयएम आहे, याचेही भान मतदारांनी ठेवावे, असे ते म्हणाले. शहरामध्ये मागच्या कित्येक वर्षांत कुठलाच सकारात्मक बदल झालेला नाही. त्याउलट काँग्रेसने बोलल्याप्रमाणे शहरामध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभे केले, हज हाऊस-वंदेमातरम सभागृहाचे काम मार्गी लावले. मुस्लिम बांधवांसाठी शहरातून हज यात्रेला जाण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता नागरिकांनीच प्रगती हवी की अधोगती, याचा विचार करावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. माजी अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान म्हणाले, युतीने कुठल्याच मूलभूत सोयी-सुविधा दिल्या नाही. एकीकडे पंतप्रधान मोदींनी 'अच्छे दिन'च्या नावाखाली देश व देशवासियांची दिशाभूल केली. विदेश दौरे सुरू असताना देशातले शेतकरी मरत आहे, याचेही मोदींना काही देणे घेणे राहिलेले नाही, तर 'एमआयएम'कडून 'आरएसएस' व भाजपची दलाली सुरू आहे. या वेळी आमदार आसिफ खान, माजी आमदार एम. एम. शेख, कदीर मौलाना आदी उपस्थित होते.

आता म्हणतात साध्वींना सोडून द्या

मालेगाव स्फोटात अनेक मुस्लिम मारले गेले आणि त्याला जबाबदार असल्याचे साध्वी व इतरांनी मान्य केले. मात्र आता त्यांना शिवसेनेचे आमदार सोडून द्या, असे म्हणत आहे, असे आमदार आसिफ खान म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुचाकीवरून फिरा; हाल कळतील’

$
0
0

खासदार ओवेसींचा युतीच्या नेत्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रचारासाठी येणाऱ्या शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या रस्त्यांवरून दुचाकी किंवा तिचाकीतून फिरावे, म्हणजे त्यांना रस्त्याची अवस्था समजेल,' असा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. राजकीय गुलाम करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवूच. त्यासोबत इतर पक्षाशीही मुकाबला करणार आहे,' असे उद्गारही त्यांनी काढले.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी त्यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) आमखास मैदानात सभा घेतली. यावेळी मंचावर एमआयएमच्या ५४ उमेदवारांसह आमदार इम्तियाज जलील, महेफुजर रहेमान, हैदराबादचे आमदार जफर हुसैन यांची उपस्थिती होती.

खासदार आवेसी यांनी निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या भाजप- शिवसेना नेते व मुख्यमंत्र्यांना शहरातील रस्त्यांवर दुचाकी किंवा तीन चाकी वाहनांवर फिरावे, असे आवाहन केले. शहरातील रस्त्यांचे हाल झाले असून त्यावरून फिरणे सुद्धा शक्य नसल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात दलितांसाठी कमी निधी दिल्याचा आरोप त्यांनी केला. 'जातीयवादी पक्ष म्हणून मजलीसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत भाजपा आणि शिवसेनेची भीती दाखवून मते घेऊन सोयीचे राजकारण केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सामना करूच पण शिवसेना, भाजपशीही मुकाबला करण्यासाठी तयार आहोत,' असे खासदार ओवेसी म्हणाले.

नाराजीला मी जबाबदार

तिकीट वाटपात गोंधळ झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी सभेत कुराण व मुलाच्या डोक्यावर हाथ ठेवून निरपराध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ओवेसी यांनी कुरेशी यांना रोखले. पक्षप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असे सांगून ओवेसींनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागद निर्मितीत ऑटोमेशन

$
0
0

>> मकरंद कुलकर्णी

वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय तेवढ्याच क्षमतेने पुढे नेण्याची किमया साधणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. अमेरिकेतून एमबीएची पदवी मिळवून आल्यानंतर त्यांनी कंपनीत लक्ष देणे सुरू केले. १२ वर्षांत कंपनीचा विस्तार झाला. उत्पादनाची मागणी वाढली. नवीन तंत्रज्ञानाची कास धरत सुरू असलेली अक्षय राठी यांची वाटचाल आजच्या कार्पोरेट विश्वमध्ये.

कॉमर्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रकाश राठी यांनी एका पेपर मिलमध्ये काम केल्यानंतर स्वतःची कंपनी सुरू करण्याचे ठरविले. मित्रमंडळी, नातेवाईक; तसेच या व्यवसायातील तज्ज्ञांशी बोलून १९९२मध्ये औरंगाबाद-पुणे रस्त्यावर कायगाव टोका (ता. गंगापूर) येथे कायगाव पेपर मिल सुरू केली.

टाकाऊ कागदावर प्रक्रिया करून त्यापासून क्राफ्ट पेपर बनविला जातो. कोरोगेटेड बॉक्सेस बनविणाऱ्या कंपन्यांना या कागदाचा पुरवठा केला जातो. प्रकाश राठी यांचे चिरंजीव अक्षय यांनी २००३मध्ये शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळणे सुरू केले आणि बारा वर्षांत आमूलाग्र बदल केले आहेत. अक्षय यांनी केंद्रीय विद्यालयातून दहावी व बारावी पूर्ण केल्यानंतर २०००मध्ये जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून (जेएनइसी) प्रॉडक्शन विषयात इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर अक्षय एमबीए (फायनान्स) करण्यासाठी अमेरिकेत गेले. २००३मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर प्रकाश राठी यांनी अक्षय यांच्यावर कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविली. कंपनीचे संचालक म्हणून काम सांभाळताना अक्षय यांनी मार्केटचा अभ्यास केला. क्राफ्ट पेपर पुरविणाऱ्या कंपन्यांची संख्या निवडक होती. दररोज १५० टन पेपरचे उत्पादन होते. औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्याबाहेर इंदूर, हैदराबाद, गोवा आणि वापी याठिकाणच्या कंपन्यांना सप्लाय होतो. उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अक्षय यांनी नवनवीन संकल्पना समोर आणल्या. पूर्वी कंपनीत महिनाभरात २००० टन पेपर बनविला जात होता. आता हे प्रमाण ३५०० टनांपर्यंत पोचले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राठी यांनी परदेशातून यंत्रसामग्री मागविली आणि त्याचा फायदा दिसून आला. पूर्वी कंपनीत क्राफ्टमधील दोन तीन प्रकारचाच पेपर बनविला जात होता. आता यात व्हरायटी आणली आहे. हे सगळे अक्षय राठी यांच्या पुढाकाराने घडून आले. मार्केट वाढले, गरजा वाढल्या आणि मागणीही वाढू लागली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऊर्जा संवर्धनाचे कामही कायगाव पेपर मिलमध्ये केले जाते. अॅटोमेशनचा वापर वाढला आहे. खास ब्रिटनमधील कंपनीतून हे तंत्रज्ञान मागविण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांत झालेल्या झालेल्या प्रगतीचे श्रेय आई-वडिलांना देताना अक्षय सांगतात की, वडील प्रकाश आणि आई मंगल राठी यांनी कायम प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. पत्नी मेघा, कृती आणि सुदिती या कन्यांची साथही सदैव मोलाची आहे. कंपनीच्या कामातून वेळ मिळाला की अक्षय कुटुंबीयांमध्ये रमतात.

कायगाव पेपर मिलने मिळविलेले यश आणखी वृद्धिंगत व्हावे यासाठी अक्षय कंपनीचा विस्तार करत आहेत. परदेशी तंत्रज्ञान आणून उत्पादन केले जाणार आहे. सेटअप बसविल्यानंतर कंपनीत दर महिन्याची उत्पादन क्षमता ६००० टनाच्या पुढे जाऊ शकेल. एकूणच अक्षय राठी यांची भावी वाटचाल आणखी यशस्वी होईल, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसींना हैदराबादला परत पाठवणारचः कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हैदराबादहून आलेले ओवेसी बंधू मतांसाठी मतदारांचे माथे भडकविण्याचे काम करत आहे. त्यांना हैदराबादला पाठविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही,' असा पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) नागेश्वरवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणारच असा दावाही त्यांनी केला.

पालकमंत्री कदम यांनी या सभेत बोलताना एमआयएम आणि ओवेसी बंधूंवर चौफेर हल्ला चढवला. ओवेसी बंधू प्रचारासाठी २२ एप्रिलपर्यंत थांबण्याच्या गोष्टी करत असेल. तर आपणही निकाल लागेपर्यंत म्हणजे २३ एप्रिलपर्यंत शहरात ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. समांतर जलवाहिनीबाबत मतदारांनी विश्वास ठेवू नये. शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्री कदम यांचे भाषण रंगले असतानाच ध्वनीक्षेपक यंत्रात बिघाड झाला. कदम यांनी ध्वनीक्षेपक यंत्र बाजूला सारत आपले भाषण सुरू केले. या सभेला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, नागेश्वरवाडी-भोईवाडा वॉर्डाचे उमेदवार विनायक देशमुख, खडकेश्वरचे उमेदवार सुगंधकुमार गडवे, समर्थनगरचे उमेदवार ऋषीकेश खैरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात आता केंद्रीय प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने करणार आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता दूर होईल, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या पदव्युत्तर कॉलेजांना चाप बसणार आहे.

विद्यापीठांसह अंतर्गत सर्व कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास क्रेडिट व ग्रेडिंग पद्धत लागू करण्याची सक्ती यूजीसीने केली आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या अंतर्गत सर्व कॉलेजांमध्ये ही सिस्टीम यंदापासून लागू करणार आहे. याबाबत अभ्यास मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. अशा प्रकारची सिस्टीम राबविताना, प्रवेश प्रक्रियेत, अभ्यासक्रमात सुसत्रता येणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठ आपल्या अंतर्गत सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकाच छताखाली राबविणार आहे. ऑनलाइन राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन विषयनिहाय कॉलेज, विषयाचे ऑप्शन भरावे लागेल. प्रवेश अर्ज आल्यानंतर विषयनिहाय गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जातील. यानंतर प्रवेश दिले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट सिस्टीमवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्न कॉलेजच्या प्राचार्यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) 'क्रेडिट व ग्रेडिंग'चे धडे गिरविले. विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम' लागू करणार आहे. पात्र प्राध्यापक व प्राचार्य नसलेल्या कॉलेजमध्ये ही पद्धत लागू होणार का या प्रश्नावर प्रशासनाने मौन बाळगले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेनुसार क्रेडिट व ग्रेडिंग सिस्टीम लागू केली जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी विद्यापीठाने विभागप्रमुख, प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत गुणप्रणालीपासून ते प्रवेशाचे निकष, उत्तीर्णतेचे मानांकन याची माहिती देण्यात आली. 'चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीम'ची उपयुक्तता, त्यातील अभ्यासक्रमाची रचना कशी असेल, त्याची उद्दिष्टे काय, गुणप्रणाली कशी असेल, प्रवेशाचे निकष कसे असतील, मानांकन कसे द्यायचे याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता येणर असून विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा होईल, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला दीडशे जणांची उपस्थिती होती. परंतु, अनेक प्राचार्यांनी दांडी मारली.

त्या कॉलेजांचे काय?

विद्यापीठशी संलग्न अनेक कॉलेजमध्ये पात्र प्राध्यापक नाहीत, २१० पेक्षा अधिक कॉलेजांना पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. या कॉलेजमध्ये ही पद्धत लागू कशी करणार?, असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला. पात्र शिक्षक नसणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येईल, त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र ही पद्धती कशी लागू करणार याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व कॉलेजातील शिक्षकांनी नवीन पद्धत समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला ती यशस्वी होवू शकते. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समांतर प्रकल्पाची CBI चौकशी करा

$
0
0

राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडीच्या केंद्र व राज्य सरकारने समांतर जलवाहिनीसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केले. दोन वर्षे उलटून गेले तरी त्याचे काम सुरू झालेले नाही. पालिकेत २० वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यांनी या योजनेसाठी काहीच हालचाल केली नाही. उलट विकासक नेमण्यापासून सगळी योजनाच संशयाच्या भोवऱ्यात आहे. समांतर जलवाहिनीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ विखे गुरुवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेत युतीची सत्ता आहे. आपण सगळ्या कालावधीचा हिशेब मागण्याऐवजी गेल्या पाच वर्षांत त्यांनी विकासाची काय कामे केले, हे सांगावे. शहरात एक रस्ता व्यवस्थित नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन व औद्योगिक शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे, पण युतीने शहराची दुरवस्था केली आहे. केंद्र व राज्यात आमचे सरकार असताना सर्व प्रकारच्या नागरी सुविधांसाठी निधी दिला, पण त्याचा उपयोग स्थानिक सत्ताधाऱ्यांनी योग्य पद्धतीने केला नाही. केवळ भावनिक प्रश्न निर्माण करून मतदारांना भुलविले जाते. यामुळे शहर तर भकास झाले आहेच. पण इथे राहणाऱ्या सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. 'पालिकेने केलेला विकास दाखवा आणि बक्षीस मिळवा,' असे म्हणण्याची पाळी आली आहे.' 'समांतर जलवाहिनीची योजना शहरवासीयांसाठी फायद्याची होती, पण युतीने ही योजना योग्यप्रकारे राबविली नाही. विकसक नेमताना पारदर्शकता असायला हवी होती. केंद्र व राज्याकडून मिळालेला निधी कुठे व कसा खर्च केला, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आजही शहरात पाणी मिळेल की नाही, याची खात्री नाही. समांतरच्या गैरव्यवहाराची 'सीबीआय' चौकशी झाली पाहिजे. सतारूढ पक्षांनी महापालिकेला अधोगतीकडे नेले आहे. जनता या महापालिकेत त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

माजीमंत्री नसीम खान म्हणाले, की युतीने शहराचा विकास केला नाही आणि विधानसभा निवडणुकीत येऊन एमआयएमने जातीय तेढ वाढविली. यावेळी हे हैदराबादचे पार्सल परत जाईल. नागरिक दबावतंत्राला बळी पडणार नाहीत. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, इब्राहिम पठाण उपस्थित होते.

राणेंच्या पराभवाचे दुःख

वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राणेंचा झालेला पराभव दुःखदायक आहे, असे विखे पाटील म्हणाले. राणे सक्षम उमेदवार आहेत. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याचे धाडस त्यांनी दाखविले. या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढले आहे. जय पराजय होत असतो. मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखविल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेसमोर युतीधर्माचा पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या परंपरागत उल्कानगरी वॉर्डात भाजपने स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून दिलीप थोरात यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डातील राजकीय समीकरणांचा विचार झाला नसल्यामुळे पक्षातील बंडखोरांची संख्या वाढली आहे तर, राजकीय युती झुगारून शिवसेनेचे सुशील खेडकर यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे ही लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच रंगणार आहे.

भाजपच्या परंपरागत वॉर्डात उल्कानगरी असून, विद्यमान नगरसेवक उपमहापौर संजय जोशी या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करतात. या निवडणुकीत उल्कानगरी वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपसाठी वॉर्ड 'सुरक्षित' असून, विजय सोपा असल्याचे लक्षात आल्यानंतर इच्छुकांची संख्या अमाप वाढली होती. प्रचंड रस्सीखेच झाल्यानंतर अखेर दिलीप थोरात यांना उमेदवारी मिळाली. परिणामी, पक्षातील इतर इच्छुक प्रचंड नाराज आहेत. शिवाय उल्कानगरीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून उमेदवारी दिल्यामुळे इच्छुकांनी बंड पुकारले आहे. काही जणांनी माघार घेतली असली तरी, काही रिंगणात आहेत. गारखेडा-मेहेरनगर वॉर्ड भाजपला सुटल्यामुळे शिवसेनेचे सुशील खेडकर यांनी उल्कानगरी वॉर्डातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

शिवसेना-भाजप युती झुगारून खेडकर निवडणूक लढवित असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अरूण दाभाडे (काँग्रेस), सुनील राठोड (अपक्ष), बाबासाहेब बरांडे (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश चव्हाण (अपक्ष), अंजन पाटील (अपक्ष), सुशील खेडकर (अपक्ष), ज्ञानेश्वर संत्रे (अपक्ष) आणि प्रवीण पाटील (अपक्ष) यांचा समावेश आहे. मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या उल्कानगरी वॉर्डात हनुमाननगरच्या काही गल्ल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टी वसाहत आणि उच्चभ्रू वसाहत अशी सरमिसळ झालेल्या मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस परंपरागत मतदारांना आवाहन करीत आहे. भाजपने प्रचाराचा जोर वाढवला आहे. उच्चभ्रू वसाहत असली तरी अनेक नागरी समस्या आहेत. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार समस्यांचा पाढा वाचून दाखवत आहेत. भाजपला वारंवार विजयी करूनही समस्या कायम असल्यामुळे मतदारांमध्ये रोष आहे. या परिस्थितीत मतदारांना ठोस आश्वासन देऊन कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.

राजकीय डावपेच

उल्कानगरीत शिवसेना (बंडखोर), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चार मुख्य पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या बंडखोराला मदत करणार की युतीचा धर्म निभावणार, असा पेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे. या वॉर्डात तुल्यबळ बंडखोर उमेदवार उभा करून शिवसेनेने भाजपलाच आव्हान दिले आहे. अंतिम चार दिवसांत दोन्ही पक्षातील चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकाचौकांत पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, दंगा काबू पथकाचा सराव करण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. शहरात केंद्रीय शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल झाली आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. याकाळात समाजकंटकांकडून वातावरण बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. शहागंज, टीव्ही सेंटर, रोशनगेट आदी संवेदनशिल भागात दंबा काबू पथकाचे प्रात्याक्षिक करण्यात आले आहे. पालिका हद्दीतील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या विशेष मोहिमेत आतापर्यंत ८० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाच्या चौकात २२ एप्रिलपर्यंत दररोज नाकाबंदी करण्यात येत आहे. शीघ्र कृती दलाची एक तुकडी दाखल झाली असून आणखी एक तुकडी दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. महत्वाचे चौक व संवेदनशील परिसरात राहुटी उभारून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आचारसंहिता कक्षातर्फे ११ लाखांचा दंड वसूल

निवडणूक कामांबद्दल महापालिकेच्या कारभाराबद्दल टीका होत असली, तरी अचारसंहिता कक्ष मात्र सक्रिय झाला आहे. या विभागाने साठ गुन्हे दाखल केले असून अकरा लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. पालिकेच्या आचारसंहिता कक्ष प्रमुखपदी नोंदणी उप महानिरीक्षक बी. एम. कांबळे यांना नियुक्त करण्यात आले असून प्राणीसंग्रहालय अधीक्षक डॉ. बी. एस. नाईकवाडे सहकार्य करीत आहेत. या कक्षातर्फे करण्यात आलेल्या कारवाईची कांबळे यांनी माहिती दिली. दारूबंदी कायद्यान्वये साठ गुन्हे दाखल करून ११ लाख ६० हजार १२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात १०२३ शस्त्रपरवाने असून १३७ जणांनी अद्याप शस्त्र जमा केले नाही. शस्त्र जमा करण्यातून २९९ जणांना सूट देण्यात आली आहे, २३ जणांकडे परवाने आहेत, पण शस्त्र नाहीत. तीन जणांकडे विनापरवाना शस्त्र आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. कक्षाने आतापर्यंत १२३१ झेंडे, १०३१ बॅनर्स, १६५ होर्डिंग जप्त केले आहेत. १९८, असे चिन्ह आणि फलक आहेत की ज्यावर कारवाई करता येत नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंची प्रचाराकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचलेली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

महापालिकेत आपलाचा महापौर असावा, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी 'मिशन सिक्स्टी प्लस'चे टार्गेट कार्यकर्त्यांना देत भाजपच मोठा भाऊ असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, परंतु जागा वाटपावरून काथ्याकूट झाल्यानंतर ११३ पैकी ६४ जागा देऊन शिवसेनेने आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. भाजपला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले.

जागा वाटपापासून भाजपच्या उमेदवारांची निवड करण्यापर्यंत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रत्येक गोष्टीत खास लक्ष देऊन होते. तिकीट वाटपात निष्ठावंताना न्याय मिळाली नाही, आजी माजी पदाधिकारी व त्यांच्या नातेवाइकांची जास्त वर्णी लागली, अशी दबक्या आवाजात ओरडही झाली. भाजपच्या अनेक वॉर्डांत शिवसेनेच्या बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. हे बंड दानवे शमवतील अशी आशा भाजप उमेदवारांना होती. परंतु दानवे यांनी शहराकडे पाठ दाखवल्यामुळे उमेदवार नाउमेद झाले आहेत. महायुतीची संयुक्त प्रचारफेरी काढून बंडखोरांवर कारवाई करण्याची घोषणा दानवे यांनी राणा भीमदेवी थाटात केली होती, परंतु त्यानंतर ते शहरात फिरकलेच नाहीत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे पालवे शनिवारी (१८ एप्रिल) शहरात दाखल होत असताना मात्र दानवे यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ वर्षांत काय केले?

$
0
0

'मटा' डिबेट कार्यक्रमात औरंगाबादकरांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पाणी, रस्ते, वीज, कचरा याच समस्या भेडसावत असताना महापालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेना - भाजप युतीने २५ वर्षांत काय केले, असा संतप्त सवाल नागरिकांनी युतीच्या आमदारांना विचारला. 'मटा डिबेट' च्या कार्यक्रमात गुरुवारी नागरिकांनी विकासाच्या मुद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी महाविद्यालयाच्या हिरवळीवर गुरुवारी महाराष्ट्र टाइम्स तर्फे 'मटा डिबेट' चे आयोजन करण्यात आले. त्यात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भाजपचे आमदार अतुल सावे, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भारिप-बहुजन महासंघाचे गौतम लांडगे आणि रिपाइं आठवले गटाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम सहभागी झाले. प्रारंभी नेत्यांनी पक्षाची भूमिका मांडली. नागरिकांनी आमदारांसाठी प्रश्न लिहून दिले. यापैकी निवडक प्रश्न नेत्यांना विचारण्यात आले. बहुतांश प्रश्न युतीच्या आमदारांना उद्देशून होते. रस्त्यांच्या अवस्थेबद्दल नागरिकांनी जाब विचारला. पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता २५ वर्षांपासून आहे. आता खड्ड्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याला जबाबदार कोण ? शहरात तिसऱ्या दिवशी पाणी मिळते, पण पाणीपट्टी पूर्ण वसूल का केली जाते? नागरिकांचे हीत न जपणारी 'समांतर' योजना तयार का केली? घनकचरा व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा, बंद पडलेले पथदिवे, बससेवा अशा अनेक विषयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मटा' चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी केले. सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

आता केंद्रात आणि राज्यात आता युतीचे सरकार आहे. पालकमंत्र्यांनी विकासासाठी निधी देणे सुरू केले आहे. प्रगतीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. त्यात तुमचा हातभार राहू द्या.

- संजय शिरसाट, शिवसेना.

महापालिकेला काँग्रेसची राजवट असलेल्या केंद्र व राज्य सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली. आता आमचे सरकार आले आहे, आम्ही या शहराचा विकास करू.

- अतुल सावे, भाजप.

महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बीओटीचा बाजार मांडला, सिटीबसचा प्रकल्प, घनकचऱ्यासंबंधीचा रॅमकीचा प्रकल्प बंद पडला. एकही योजना पूर्णत्वास न नेणारी महापालिका असा या महापालिकेचा लौकिक आहे.

- सतीश चव्हाण, राष्ट्रवादी.

जाती धर्माच्या नावावर जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा विकासाचे मुद्दे मागे पडतात. त्यामुळे चांगल्या उमेदवारांना निवडून द्या.

- इम्तियाज जलील, एमआयएम

विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात दुजाभाव झाला. पुढच्या काळात सर्व आमदारांनी ठरवले तर आपले शहर पुढे जाईल.

- बाबुराव कदम, रिपाइं.

निवडणुकीसाठी आम्ही शहर बचाव मोर्चाची स्थापना केली आहे. ५३ उमेदवार उभे केले आहेत. मतदारांना जो उमेदवार सक्षम वाटतो त्याला मतदारांनी निवडून द्यावे.

- गौतम लांडगे, भारिप.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images