पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याची कबुली शिवसेनेचे नेते व पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. बंडखोरांसंदर्भात युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या प्रचारासाठी रामदास कदम आज शहरात आले. समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'दोन वॉर्डातून उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. युतीच्या नेत्यांची बैठक घेऊन बंडखोरांबाबत निर्णय घेतला जाईल. आपण एकमेकांविरोधात लढलो तर लाभ दुसऱ्यांच होईल, हे बंडखोरांनी लक्षात घेतले पाहिजे. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा आपले कोण ते ओळखा, असे आवाहन मी बंडखोरांना करतो.' युतीची लढाई एमआयएमबरोबरच आहे, असे कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. समांतर जलवाहिनीसंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना रद्द झाली असती तर, त्यासाठी शासनाकडून आलेला निधीही परत गेला असता. शिवसेनेच्या दृष्टीने या शहराचे पाणी आणि योजना हे दोन्ही आवश्यक आहे. 'समांतर'च्या आडून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कदम यांनी केला.
राणेंनी ग्रामपंचायत लढवावी : रामदास कदम
नारायण राणे यांच्या पराभवासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले, 'राणेंनी आता नगर पालिका, ग्रामपंचायतीचा एखादा वॉर्ड शोधून तेथे निवडणूक लढवावी. राणे यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनाप्रमुखांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थपणे सांभाळली आहे. तासगावमध्ये शिवसेनेने आर. आर. पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. वांद्र्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांनी राणेंच्या रुपाने उमेदवार दिला. शरद पवारही त्यात सहभागी झाले. पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना धडा शिकविला.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट