आपल्या परंपरागत उल्कानगरी वॉर्डात भाजपने स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून दिलीप थोरात यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डातील राजकीय समीकरणांचा विचार झाला नसल्यामुळे पक्षातील बंडखोरांची संख्या वाढली आहे तर, राजकीय युती झुगारून शिवसेनेचे सुशील खेडकर यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे ही लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच रंगणार आहे.
भाजपच्या परंपरागत वॉर्डात उल्कानगरी असून, विद्यमान नगरसेवक उपमहापौर संजय जोशी या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करतात. या निवडणुकीत उल्कानगरी वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपसाठी वॉर्ड 'सुरक्षित' असून, विजय सोपा असल्याचे लक्षात आल्यानंतर इच्छुकांची संख्या अमाप वाढली होती. प्रचंड रस्सीखेच झाल्यानंतर अखेर दिलीप थोरात यांना उमेदवारी मिळाली. परिणामी, पक्षातील इतर इच्छुक प्रचंड नाराज आहेत. शिवाय उल्कानगरीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून उमेदवारी दिल्यामुळे इच्छुकांनी बंड पुकारले आहे. काही जणांनी माघार घेतली असली तरी, काही रिंगणात आहेत. गारखेडा-मेहेरनगर वॉर्ड भाजपला सुटल्यामुळे शिवसेनेचे सुशील खेडकर यांनी उल्कानगरी वॉर्डातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
शिवसेना-भाजप युती झुगारून खेडकर निवडणूक लढवित असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अरूण दाभाडे (काँग्रेस), सुनील राठोड (अपक्ष), बाबासाहेब बरांडे (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश चव्हाण (अपक्ष), अंजन पाटील (अपक्ष), सुशील खेडकर (अपक्ष), ज्ञानेश्वर संत्रे (अपक्ष) आणि प्रवीण पाटील (अपक्ष) यांचा समावेश आहे. मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या उल्कानगरी वॉर्डात हनुमाननगरच्या काही गल्ल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टी वसाहत आणि उच्चभ्रू वसाहत अशी सरमिसळ झालेल्या मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस परंपरागत मतदारांना आवाहन करीत आहे. भाजपने प्रचाराचा जोर वाढवला आहे. उच्चभ्रू वसाहत असली तरी अनेक नागरी समस्या आहेत. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार समस्यांचा पाढा वाचून दाखवत आहेत. भाजपला वारंवार विजयी करूनही समस्या कायम असल्यामुळे मतदारांमध्ये रोष आहे. या परिस्थितीत मतदारांना ठोस आश्वासन देऊन कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.
राजकीय डावपेच
उल्कानगरीत शिवसेना (बंडखोर), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चार मुख्य पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या बंडखोराला मदत करणार की युतीचा धर्म निभावणार, असा पेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे. या वॉर्डात तुल्यबळ बंडखोर उमेदवार उभा करून शिवसेनेने भाजपलाच आव्हान दिले आहे. अंतिम चार दिवसांत दोन्ही पक्षातील चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट