म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'औरंगाबादमधील सर्व रस्ते वर्षभरात खड्डेमुक्त करू,' अशी ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी 'मटा'च्या टीमशी दिलखुलास चर्चा करताना गुरुवारी दिली. 'नाविन्यपूर्ण योजना राबवू, लोकांना हे शहर आणि महापालिका आपली वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न करू. विकासकामांसाठी पैसा कमी पडू देणार नाही. शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी मला फक्त एक वर्ष द्या. वर्षभरात शहर कचरामुक्तदेखील करून दाखवेन' असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी गुरुवारी 'मटा' कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहर विकासाच्या संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा केली. विकासाच्या संदर्भातील त्यांच्या कल्पनाही त्यांनी मांडल्या. रस्ते, तलावांचे सुशोभीकरण, कचरामुक्ती अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडली. यावेळी त्यांच्याबरोबर महापौर त्रिंबक तुपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थित होते.
कदम म्हणाले, 'एक वर्ष थांबा. शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकतो. विकासकामांसाठी पैशाची अडचण कधीच भासू देणार नाही. औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी होईलच, पण त्यापेक्षाही हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाले पाहिजे. देश - विदेशातील पर्यटक या शहरात आले पाहिजेत असा आपला प्रयत्न राहणार आहे. पर्यटन नगरीसाठी ३०० कोटी रुपये मी बाजूला काढून ठेवले आहेत. पर्यटननगरी कशी असावी, या संदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. मी जे बोलतो ते केल्याशिवाय रहात नाही. शहराच्या गुंठेवारी भागातील घरे नियमित करण्याच्या फाइलवर रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी घेतली. येत्या पंधरा दिवसात त्या संबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा निधी मिळाला आहे. हा प्रकल्प झाला नाही, तर निधी परत जाईल. निधी परत जाऊ नये म्हणून समांतर जलवाहिनीचे काम युध्दपातळीवर पूर्ण करून घेतले जाईल. हे काम पूर्ण झाले तरी नागरिकांवर आर्थिक बोजा पडू देणार नाही,' असे कदम यांनी स्पष्ट केले.
सिटीबसचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे मान्य करताना त्यांनी महापौर त्रिंबक तुपे यांना सूचना केली. 'सिटीबसच्या संदर्भात महापालिकेने तत्काळ प्रस्ताव तयार करून द्यावा. त्यानंतर लगेचच सिटीबस सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी परिवहन मंत्र्यांची मदत घेऊ,' असे पालकमंत्री म्हणाले. चौकांच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. दिल्ली गेट येथील तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
............
पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रम ते ए.एस.क्लब या रस्त्याच्या रुंदीकरणाची निकड लक्षात आणून देताच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक उद्या शुक्रवारीच घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीय सहायकास दिले. शहरातील सा.बां. विभागाच्या रस्त्यांची सविस्तर माहिती उद्याच सादर करावी, असे आदेश त्यांनी महापौर त्रिंबक तुपे यांना दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट