पोलिस आयुक्तांनी इशारा देऊनही शहरातील रिक्षाचालकांनी जादा सीट बसविणे बंद केलेले नाही. शहराच्या रस्त्यावरून सर्रास जादा सिट भरून रिक्षा धावत आहेत. दरम्यान काळी-पिवळी टॅक्सीवरील कारवाईबद्दल अभिनंदन करण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालक-मालक संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी,'रिक्षात चारपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यास कारवाई केली जाईल,' असा इशारा दिला आहे.
पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी पहिल्यांदा काळी-पिवळीला शहराबाहेर काढले आहे. त्यामुळे रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची गुरुवारी (७ मे) भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी आयुक्तांनी हा इशारा दिला. संघनटेतर्फे कंपनीच्या बसमधून प्रवासी वाहतूक केली जाते व स्क्रॅप रिक्षा मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात, अशी माहिती पोलिस आयुक्तांना दिली. त्यावर आयुक्तांनी 'तुम्ही मीटर का वापरत नाही, शेअरिंग रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी का बसवता, अशी विचारणा केली. तुम्ही कंपन्यांच्या बसचा विषय मांडला. कंपनीचे नाव संबंधित बसवर असलेच पाहिजे. याशिवाय जर या बसमधून प्रवाशी वाहतूक केली जात असेल, तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. रिक्षाचालकांनी चारपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास कारवाई करण्यात इशारा त्यांनी दिला. दरम्यान, न्यू आझाद हिंद संघटनेचे भरतसिंह चौहान व पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन काळी-पिवळी टॅक्सीबद्दलच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट