म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल दोन दिवसांपासून म्हणजेच शनिवारी (९ मे) रात्रीपासून ते सोमवारी (११ मे) रात्रीपर्यंत म्हणजेच वृत्त लिहिण्याच्या वेळेपर्यंत कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जालना रोडवरील कंडी टॉवरपासून ते श्रीनिकेतन कॉलनी, बंजारा कॉलनी, गांधीनगर मार्गे दोन किलोमीटरचा वळसा घालून चक्क नाल्यामध्ये हे शुद्ध पाणी मिसळत असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मागच्या दोन महिन्यांत किमान चार ते पाच वेळा याच पद्धतीने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची तुळतुळ व संताप परिसरातील नागरिकांनी 'मटा'कडे व्यक्त केला.
श्रीनिकेतन कॉलनीतील रहिवासी प्रशांत नागर यांनी या प्रतिनिधीला मोबाइलवरून कळविले आणि स्वतःच्या डोळ्याने पाण्याची नासाडी पाहण्याची वेळ आली. कंडी टॉवरसमोर (औरंगाबाद पान सेंटर) मोठी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटली आणि काही क्षणातच प्रचंड प्रमाणातील पाणी संपूर्ण जालना रस्त्यावरून वाहण्यास सुरुवात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिथून वाहणारे पाणी अमरप्रीत हॉटेलजवळून थेट श्रीनिकेतन कॉलनीत घुसले आणि संपूर्ण उतारावरून बंजारा कॉलनी, गांधीनगर मार्गे नाल्यात जात आहे. शनिवारी रात्रीपासून वाहणारे पाणी सोमवारी रात्री आठच्या सुमारासदेखील वाहत असल्याचे सांगण्यात आले. या दोन दिवसांत अधून-मधून काही तास पाणी वाहणे बंद होते, पण पुन्हा पाणी वाहणे सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे शनिवारी प्रचंड दाबाने पाणी वाहात होते आणि तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. एकीकडे शहरातील असंख्य नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसताना, असंख्य शहरवासियांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असताना, चांगल्या पाण्याची नासाडी बघवत नसल्याची भावनाही नागरिकांनी व्यक्त केली. असे प्रकार झाल्यानंतर वाहतूक बंद करण्यात येते आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रारही अनेकांनी बोलून दाखविली.
मागच्या दोन महिन्यांत किमान चार ते पाच वेळा हा प्रकार झाला आणि संबंधितांना तक्रारी करूनही पाण्याची नासाडी काही केल्या थांबत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आम्हाला अर्धा-पाऊण तास पाणी येते, पण आमच्या समोरून लाखो लिटर पाणी चक्क वाया जात असल्याचे दुःख होते.
- प्रशांत नागर, रहिवासी
तब्बल दोन दिवसांपासून दोन किलोमीटरपर्यंत दिवस-रात्र ही पाण्याची गंगा वाहत आहे. जालना रोडवरून ५० ते ६० टन वजनाची वाहने जातात. त्यामुळे पाइपलाइन अजून खालून पाहिजे आणि मुख्य म्हणजे निकृष्ठ दर्जाच्या पाइनलाइनमुळेच वारंवार पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडत आहेत.
- यादव पटेल, रहिवासी
जालना रोडवरून शनिवारी रात्री नदीसारखे पाणी प्रचंड दाबाने वाहात होते. हे पाणी दुकानांमध्ये शिरते की काय, अशी भीती आम्हाला वाटत होती. तसे झाले असते तर भयंकर नुकसान झाले असते. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे आमच्या व्यवसायावरही प्रतिकुल परिणाम होत आहे.
- अब्दुल सत्तार, रहिवासी
पाण्याच्या नासाडीबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणालाही काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. आम्हाला मात्र, आमच्या डोळ्यांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी बघावी लागते. सध्या औरंगाबादमध्ये पाण्याची प्रचंड कमतरता आहे. अशा परिस्थितीतही पाण्याची नासाडी सुरू आहे.
- गिरीश पटेल, रहिवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट