सातारा भागात साफसफाईची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे येत्या काळात या भागात खासगीकरणातून साफसफाईचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी 'मटा' शी बोलताना दिली.
सातारा परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या भागातील साफसफाईच्या संदर्भात कालच आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. त्यानुसार बुधवारी (२० मे) सकाळी काही अधिकाऱ्यांसह सातारा परिसराची पाहणी केली, अशी माहितीही त्यांनी दिली. सातारा परिसरात साफसफाईची कोणतीही यंत्रणा नव्हती. तीन ते चार कर्मचारी तेथे कार्यरत होते. कचरा गोळा करून तो जाळून टाकण्याचेच काम केले जात होते. आता महापालिकेला तसे करता येणार नाही. कचरा गोळाकरून तो कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकला पाहिजे त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे, असा उल्लेख करून डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, खासगीकरणाच्या माध्यमातूनच हे काम करावे लागणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर निविदा काढून काम सुरू केले जाईल. कचऱ्याचे 'डोअर टू डोअर कलेक्शन' हा फार महत्वाचा भाग आहे आहे. त्याची संपूर्ण यंत्रणा सोमवारपर्यंत उभी करून सातारा भागात स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. फवारणीच्या कामाचेही नियोजन काही दिवसात केले जाईल. आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता फवारणीचे काम युध्दपातळीवर करावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा परिसरातील आरोग्य केंद्र बंद पडेल आहे, हे केंद्र सुरू करण्यालाही प्राधान्य द्यावे लागेल. या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट