म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी निम्म्यापेक्षा जास्त संचालक इच्छुक होते. काहीजणांनी उपाध्यपद एक-एक वर्षासाठी द्यावे, अशी मागणी केली होती. परंतु, त्यास पॅनलप्रमुखांनी नकार दिल्याने अनेकजण नाराज झाले. आमदार संदीपान भुमरे तर निवडीनंतर ताबडतोब निघून गेले. दरम्यान, निवडीनंतर बोलताना रामकृष्ण बाबा पाटील यांनी बँकेच्या कारभारास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे जबाबदार राहतील, असे विधान केले आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड गुरुवारी करण्यात आली. अध्यक्षपदावर सुरेश पाटील यांची निवड अपेक्षित असल्याने उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेक संचालकांची धडपड होती. आमदार संदिपान भुमरे, बाबुराव पवार, किरण पाटील, रंगनाथ काळे, वर्षा जगन्नाथ काळे हे उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांनी हरिभाऊ बागडे, सुरेश पाटील यांच्याकडे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, बागडे यांच्या जवळचे दामोधर नवपुते यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे इच्छुकांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त झाली. निवडणुकीनंतर आमदार भुमरे हे सभागृहातून बाहेर पडले. तत्पूर्वी काही संचालकांनी उपाध्यक्षपद एक-एक वर्षासाठी वाटून मिळावे, अशी अपेक्षा बोलवून दाखवली. त्यास पॅनल प्रमुखाकडून नकार मिळाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यांनी ही नाराजी खासगीत बोलून दाखविली, पण कोणी उघडपणे भाष्य केले नाही. दरम्यान, कोणीही नाराज नसून सर्वांनुमतेच निवड झाली असून आमदार भुमरे हे अन्य एका महत्वाच्या बैठकीसाठी गेले, असा दावा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष दामोधर नवपुते यांचा संचालक आणि बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यास उत्तर देताना अध्यक्ष पाटील यांनी नोकरभरती प्रकरणात कारण नसताना भाजून निघालो, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. संचालक मंडळाला त्रास होईल, असे काम होणार नाही, अशी ग्वाही दिली. कर्जापासून बदल्यासाठी योग्य कामे सांगा, नियमबाह्य कामे होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बंद अवस्थेतील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसाठी शासनाकडून मदत मिळाल्यास बँकेचा व कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल, असे सांगून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती बागडे यांना केली.
यावेळी बोलताना बँकेचे संचालक व विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी उपसा जलसिंचन योजनेसह अन्य मोठ्या थकित कर्ज प्रकरणांचा हिशोब समोर ठेवण्यात यावा; हे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे सांगितले.
रामकृष्ण बाबांचा बागडेंना इशारा
बँकेचे संचालक व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी, यापुढे बँकेचा जो काही फायदा तोटा होईल, त्यास बँकेचे संचालक म्हणून हरिभाऊ बागडे जबाबदार राहतील, असे वक्तव्य केले. दादा (सुरेश पाटील) तुमचेच ऐकतील, असे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला. काही कारणास्तव रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना अडचणीत आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी नानांनी (बागडे) शासनामार्फत मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्वी सत्तार यांचे सरकार होते, असा टोलाही बाबांनी मारला. त्यावर बोलताना बागडे यांनी पत्रकार तुमचेच भाषण प्रामुख्याने छापतील, अशी कोपरखळी मारली. बागडेंच्या अनुभवाचा फायदा बँकेला होईल, असे मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट