म. टा. प्रतिनिधी, अमरावती
राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यांत नांदगावपेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सस्टाइल पार्क) उभारण्यात येणार आहे. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असेल. शिवाय स्थानिक खाजगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली.
नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. कापूस पिकविणाऱ्या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजेत, हे शासनाचे धोरण अाहे. त्याची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, 'नांदगावपेठच्या धर्तीवर यवतमाळ, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांलाही वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल. कापसाचे अधिक उत्पादन असलेल्या भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, जलयुक्त शिवार अभियान हा त्याचाच एक भाग आहे. पाण्याचे विकेंद्रित साठे तयार झाले पाहिजेत. विहिरींची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार नाही. या जाणिवेतून शासनाने प्रक्रिया उद्योग व सिंचन या बाबींवर विशेष भर दिला आहे.'
एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारताना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी एका महिन्यात सर्व परवानग्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन राज्य शासन प्रोत्साहन म्हणून उद्योजकांना अर्थसहाय्य देत होते, परंतु आता खाजगी उद्योग व जे कोणी या स्वरूपाचे उद्योग सुरू करू इच्छितात, त्यांना प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
'अॅडव्हांटेज विदर्भ'च्या वेळी ज्या उद्योजकांनी सामंजस्य करार केला आहे. ते उद्योग विदर्भात सुरू झाले नसतील त्यांची अडचण समजून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाला केले.
वस्त्रोद्योग धोरण लवकरचः देसाई
उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी, जेथे कापूस पिकतो तिथे वस्त्रोद्योग उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानामध्ये उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आल्या आहेत. यापुढे देशात जेथे वस्त्रोद्योग उद्यान उभारले जाईल, त्यांच्यासाठी अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यान हे मॉडेल ठरेल. या वस्त्रोद्योग उद्यानामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाचे वस्त्रोद्योग धोरण लवकरच जाहीर करणार अाहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट