मराठवाडा विशेषतः औरंगाबादच्या विकासप्रश्नांसंदर्भात डॉ. रफिक झकेरिया यांनी कधीही तडजोड केली नाही. मंत्रिमंडळात ते नेहमीच आग्रही भूमिका घेत असत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी औरंगाबादच्या विकासाचा ध्यास कायम ठेवला होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अँड अॅडव्हान्स रिसर्च; तसेच डॉ. रफिक झकेरिया स्मृती ग्रंथालयाचे शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा झकेरिया, विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, डॉ. ए. जी. खान, प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, '१९६३मध्ये झकेरिया यांनी मौलाना आझाद कॉलेजच्या रुपाने शैक्षणिक क्षेत्रात एक छोटेसे रोपटे लावले होते. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. झकेरियांचा शिक्षणाबाबत जो दृष्टिकोन होता, तो हा कँपस पाहताना जागोजागी दिसून येत आहे. या संस्थेच्या नावलौकिक केवळ देशातच नव्हे तर विदेशातही पोहचला आहे. शिक्षणामुळेच परिवर्तन घडू शकते. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. रिसर्च सेंटर आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध झाले आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.'
झकेरिया यांच्यासमवेत काम करण्याच्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, '१९७२मध्ये मंत्रिमंडळात असताना मराठवाड्यातील खास करून औरंगाबादच्या विकास कामांबाबत ते खूपच आग्रही असत. शैक्षणिक, औद्योगिक प्रगतीविषयी ते जागरूक होते. औरंगाबादच्या विकासाला दिशा देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. १९५८मध्ये मी विद्यार्थी असताना एनसीसी कँपच्या निमित्ताने सर्वप्रथम औरंगाबादला आलो होतो. कँपमुळे १५ दिवसांचा मुक्काम होता. त्यावेळचे औरंगाबाद आणि आताचे औरंगाबाद यात जमीन-आसमानाइतका फरक आहे. युथ काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. त्यावेळी झकेरिया यांना औरंगाबादेतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगण्यात आले होते. गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवायची म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. औरंगाबादला विकासाच्या मार्गावर आणण्याकरिता झकेरियांना विजयी करा, असे आवाहन यशवंतराव चव्हाणांनी केले होते आणि त्याला औरंगाबादकरांनी प्रतिसाद दिला. झकेरिया यांनी अखेरच्या श्वासापर्यंत औरंगाबाद शहराच्या विकासाचा ध्यास घेतला होता.'
या प्रसंगी फातेमा झकेरिया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर, शायर बशर नवाज, सुधाकर सोनवणे, विंग कमांडर अनिल सावे, कमाल फारुकी, चंद्रकांत दानवे, अभिजीत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पवारांचे बसून भाषण
राजकारणाच्या फडात सभा शरद पवार यांनी अनेक सभा गाजविल्या आहेत. त्याशिवाय अनेक संस्था, संघटनांच्या कार्यक्रमांतही त्यांची भाषणे गाजली आहेत. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत शरद पवार यांनी प्रथमच बसून भाषण केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट