मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीला छावणी पोलिसांनी अटक न करता फिर्यादीवरच गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला कोठडीत डांबण्याची धमकी देत बळजबरी पाच हजार रूपये घेतल्याचा आरोप करीत विजय खुडे या तरुणाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार करीत दाद मागितली आहे.
भावसिंगपुरा येथील खुडे यांनी ८ जानेवारी आणि २ मार्च रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची भिती व्यक्त करत निवेदन सादर केले होते. त्याचप्रमाणे ११ मे रोजी छावणी पोलिस ठाण्यात आशा मोरे, विनोद जाधव, शुभम शेजवळ, मनिषा शेजवळ अशा चौघांविरुद्ध तक्रार दिली होती. यावेळी छावणी पोलिसांनी अदखलपात्र (एन.सी.) गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांची हिंमत वाढली. त्यांनी १३ मे रोजी खुडे यांच्या घरात शिरून त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर खुडे यांनी आपल्या जिवितास धोका असल्याचे सांगत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी पोलिसांना वारंवार विनंती केली. मात्र, निरीक्षक गौतम फसले यांनी उलट खुडेलाच दमदाटी करत पिटाळून लावले. तसेच आपल्याला कोठडीत डांबण्याची धमकी देत निरीक्षक फसले व उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी बळजबरी पाच हजार रुपये घेतल्याचे त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले.
कारमधून पंचवीस हजार लंपास
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कारमधून पंचवीस हजार रूपये पळविल्याप्रकरणी एका संशयित आरोपीविरूद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजता अर्चना अपार्टमेंट येथे हा प्रकार घडला. संजय कौल रा. अर्चना अपार्टमेंट, उस्मानपुरा यांनी शुक्रवारी रात्री त्यांची कार अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी केली होती. कारच्या मागच्या सीटवर कॅरीबॅगमध्ये त्यांचे पंचवीस हजार रूपये ठेवलेले होते. दहा ते पंधरा मिनिटानंतर त्यांना पार्कींगमधून आरडाओरड झाल्याचा आवाज आला. त्यांनी खाली जाऊन बघितले. यावेळी त्यांच्या अपार्टमेंटमधीलच प्रशांत अमृतकर याने त्यांच्या कारच्या पुढची व मागची काच फोडून पैसे पळवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट