मुधलवाडी टँकर भरणा केंद्राची क्षमता न वाढवल्याने तालुक्यातील ३३ गावांना ढोरकीन येथील भरणा केंद्रावरून दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे या ३३ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या तालुक्यातील १०१ गावांना १२९ टँकरद्वारे २५६ फेऱ्या करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुधलवाडी, फारोळा व ढोरकीन या प्रमुख तीन भरणा केंद्रावरून अनुक्रमे ४१ गावे, २७ गावे व ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी ढोरकीन येथील भरणा केंद्रावरील पाणी दूषित असल्याचे पाण्याची तपासणी केल्यावर समोर आले आहे, अशी माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागप्रमुख सुधाकर काकडे यांनी दिली. ढोककीन येथे पाणी शुद्धीकरण केंद्र नाही. त्यामुळे येथे जायकवाडीतून येणारे प्रक्रिया न केले पाणी ३३ गावांना पुरवले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुधलवाडी येथे एमआयडीसीचे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे. तेथून होणारा पाणीपुरवठा शुद्ध पाण्याचा आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावांना मुधलवाडी येथील भरणा केंद्रावरून टँकर भरावेत, असे पंचायत समितीचे प्रयत्न आहेत. परंतु, तेथे सध्या ५० हॉर्स पॉवरचा विद्युत पंप आहे. येथे १०० हॉर्स पॉवरचा पंप बसवल्यास मुधलवाडी भरणा केंद्राची क्षमता वाढेल व ढोरकीन येथील केंद्रावरून दूषित पाणीपुरवठा करण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती काकडे यांनी दिली.
एमआयडीसीचे दुर्लक्ष
मुधलवाडी भरणा केंद्रावर १०० हॉर्स पॉवरचा पंप बसविण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना १८ व २२ मे रोजी पत्र लिहून कळवले आहे. परंतु, त्याला एमआयडीसीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
एमआयडीसीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ढोरकीनच्या भरणा केंद्रावरून ३३ गावांना दूषित पाणीपुरवठा करावा लागत आहे.
- उल्हास सोमवंशी, गटविकास अधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट