सकाळी साडेदहाच्या सुमारास चौधरी जिल्हा परिषदेत आले. तेव्हा तीन जण बांधकाम विभागातून बाहेर जाताना दिसले. चौधरींनी कार्यालयात न जाता बांधकाम विभागाकडे कूच केले. कार्यकारी अभियंता भारतकुमार बावीस्कर आलेले नव्हते. कार्यालयात बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते. रजा आणि सुट्या किती जणांच्या आहेत याची चौकशी चौधरींनी केली. एका वरिष्ठ कर्मचाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्या हातात मस्टर देण्यात आले. कार्यालयात उपस्थित असणाऱ्या संख्येपेक्षा अधिक जणांनी स्वाक्षऱ्या केल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. हे कर्मचारी गेले कुठे याची चौकशी त्यांनी केली, पण समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दरम्यान आपल्या कार्यालयात सीइओ गेल्याची वार्ता कळताच बाहेर फिरणारे तीन कर्मचारी कार्यालयाकडे परतले. मात्र, सीइओ तिथेच असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण झाली. सीइओंनी तत्काळ कारवाईचे आदेश देत वरिष्ठ सहायक कैलास जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जाधव आणि कनिष्ठ सहायक भाले या तीन कर्मचाऱ्यांची संपूर्ण दिवसाची रजा नोंदविली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट