म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील रस्त्यांवर ठाण मांडून बसलेली अतिक्रमणे हटविण्याचा धडाका सुरू केला. त्याचबरोबर जड वाहनांना दिवसा शहरात बंदी घालण्यात आली, तरीही शहरातील विविध चौकांना अद्याप रिक्षाचालकांचा विळखा कायम आहे. त्यामुळे चौकाचौकांत वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून जावे लागत आहे.
वाहतूक शाखेच्या वतीने सध्या शहरात वाहनधारकांना शिस्त लावण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला रिक्षाचालक खो घालण्याचे काम करीत आहेत. शहरातील प्रमुख चौक काही दिवसांपूर्वी अतिक्रमणमुक्त झाले होते. त्याचबरोबर चौकांच्या कोपऱ्यांवर थांबणाऱ्या रिक्षांनाही हटविण्यात आले होते. पोलिसांची पाठ फिरताच चौकांचा रिक्षांनी पुन्हा ताबा घेतला आहे.
रिक्षावाल्यांनी थांबे घुडकावले
वाहतूक शाखेने शहरातील रिक्षाचालकांसाठी थांबे निश्चित केले आहेत, मात्र ते नावाला असल्याचे चित्र प्रमुख चौकात दिसून येते. रिक्षाचालकांनी मनमानी कारभार करीत चौकात रिक्षा उभ्या करून स्वतःच थांबे ठरविल्याचे चित्र आहे. शहरातील बाबा पेट्रोल पंप, पंचवटी चौक, रेल्वे स्टेशन, क्रांतिचौक, आकाशवाणी, रामगिरी हॉटेल, अण्णाभाऊ साठे चौक, टाउन हॉल, टीव्ही सेंटर, जळगाव टी पॉइंट, एपीआय कॉर्नर, हडको कॉर्नर, हर्सूल टी पॉइंट या सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती आहे.
अरेरावी, भांडणे नेहमीचीच
अतिक्रमण करणाऱ्या रिक्षाचालकाला एखाद्या वाहनधारकाने रिक्षा हटविण्यास सांगितल्यास तेथे वाद हमखास ठरलेलाच. त्यातून वाहनधारकाला मारहाण करण्याचे प्रकार घडतात. प्रवासी बसविण्यावरून तर रिक्षाचालकांच्या आपसात अनेकवेळा हाणामाऱ्याही होतात.
वाहतुकीचा खेळखंडोबा
शहरातील रहदारीचे प्रमुख मार्ग या चौकातून जातात. मध्यभागी उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होते. तेथून जाणारी वाहने व उभ्या असलेल्या रिक्षामुळे चौकात कोंडी निर्माण होते. चौकात वाहतूक पोलिस असल्यास कोंडी तात्काळ सुटते अन्यथा वाहनधारकाला बराच काळ अडकून पडावे लागते.
वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यानी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रमुख चौकात अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चौकातून गायब झाल्या होत्या, परंतु आता पुन्हा या रिक्षांनी चौक बळकाविण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूक शाखाने चौकात उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाइमुळे शहरात बेकायदा वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षा ग्रामीण भागात गेल्या आहेत.
- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट