मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद
ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मान्यता पावलेल्या औरंगाबादमध्ये येण्यासाठी रस्ता, रेल्वे, विमान यापैकी कुठलाही मार्ग सोयीचा नाही. रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याने कार्पोरेट क्षेत्रातील मंडळी, पर्यटक औरंगाबादला दुय्यम पसंती देत आहेत. त्यामुळे शहराचे दुहेरी नुकसान होत आहे.
औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, नांदेड, हैदराबाद, चेन्नई आदी प्रमुख शहरांसाठीच रेल्वे उपलब्ध आहे. याचा शहराच्या विकासाला मोठा फटका बसला आहे. वेरूळ, अजिंठा लेण्यांमुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर औरंगाबादची ओळख आहे. पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमधून मुंबई, दिल्लीसाठी बोटावर मोजण्याइतक्या रेल्वे उपलब्ध असल्याने पर्यटकांची अडचण होते. साहजिकच सर्किट ट्रीपमध्ये औरंगाबादला वगळले जाते. त्याऐवजी पुणे, नाशिकला पसंती दिली जाते. उद्योगक्षेत्राचे मोठे जाळे विणले गेले आहे. दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त बेंगलुरू, चेन्नई, नोएडा, अहमदाबाद, सुरत, इंदूर, भोपाळ सारख्या शहरांशी दैनंदिन संबंध येतो. मात्र, या गावांना पोहचण्यासाठी औरंगाबादहून मनमाड किंवा भुसावळ गाठावे लागते आणि तिथून दुसरी रेल्वे पकडावी लागते. हा त्रास दरवेळी परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे खासगी गाडीने इंदूर, भोपाळ गाठण्यावर भर दिला जातो. पर्यटकांना राजस्थान, पश्चिम बंगाल किंवा दक्षिणेकडे आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ जाण्यासाठी रेल्वेची सुविधा औरंगाबादमधून मिळत नाही. त्यामुळे पर्यटनाच्या प्लॅनमधून औरंगाबाद आपसूकच गळून जाते. मराठवाड्याकडे सातत्याने होणारे दुर्लक्षच याला प्रामुख्याने जबाबदार आहे. महसूल वाढ, दूरगामी परिणामाचा अभ्यास न करता औरंगाबादमधून दरवर्षी वेगळ्याच रेल्वेमार्गांची मागणी केली जाते. ती रेटण्यासाठी राजकीय मंडळी कमी पडतात. रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी औरंगाबाद दुर्लक्षित राहण्यासाठी सर्वात मोठे दुसरे कारण म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे. या विभागाचा सगळ्यात शेवटचा भाग औरंगाबाद आहे. रेल्वेच्या महसुलात औरंगाबाद विभागाकडून मोठी मदत केली जाते, पण त्या प्रमाणात सुविधा पुरविल्या जात नाहीत. नांदेडपासून पुढच्या भागासाठीच नवीन रेल्वेचा विचार आजवरच्या सरकारमध्ये झाला आहे. याविरोधात आवाज उठविण्यात लोकप्रतिनिधी कमी पडतात आणि कनेक्टिव्हिटीचा मुद्दा मागे पडतो. त्यात नुकसान औरंगाबादचेच होत आहे, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.
तातडीने काय होऊ शकते
नांदेड - बेंगलुरू गाडी औरंगाबादपर्यंत आणावी.
नांदेड - हावडा गाडी औरंगाबादहून सोडावी.
नांदेड - उना गाडीला औरंगाबादहून विशेष कोटा हवा.
नांदेड - पाटणा गाडीचा औरंगाबादपर्यंत विस्तार.
काय होणे अपेक्षित?
औरंगाबाद जम्मू (व्हाया दिल्ली) एक गाडी हवी.
औरंगाबाद-चंदीगड गाडी हवी.
मुंबईसाठी आणखी एक शताब्दी एक्स्प्रेस.
आयटी सिटी बेंगलुरू आणि चेन्नईसाठी गाडी असावी.
जयपूर, जोधपूर या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे असावी.
रात्री औरंगाबाद - मुंबई गाडी.
अहमदाबाद, सुरत, बडोदा, भोपाळ, इंदूरसाठी थेट कनेक्टिव्हिटी.
औरंगाबाद - गोवा रेल्वे.
औरंगाबाद-नागपूरला स्वतंत्र रेल्वे.
कोल्हापूर - धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेसमध्ये औरंगाबादहून विशेष कोटा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट