उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने त्यांच्याकडे विमा कंपनीद्वारे प्राप्त झालेली १५५ कोटी १३ लाखांची रक्कम विना विलंब तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. ही रक्कम शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने रोख स्वरुपात द्यावी. अन्यथा या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेत विधानसभेसमोर अधिवेशनावेळी उपोषण करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी 'मटा'शी बोलताना दिला. याबाबतची कल्पना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१४-१५मध्ये दुष्काळी स्थितीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांची मोठी हानी झाली. यावेळी पीकसंरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई म्हणून १५७ कोटी ५ लाख ३४ हजार मंजूर केले. यापैकी १५५ कोटी १३ लाख रुपये उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेत जमा झाले.
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने ही रक्कम जिल्ह्यातील पीक संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने दिलेल्या यादीनुसार जमा करणे अपेक्षित होते. मात्र, बँकेसंदर्भातील सीआरआरचा नियम दर्शवित बँकेने १५५ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद येथील मुख्य शाखेत अल्प मुदतीसाठी ठेवून त्याच्यावर करोडो रुपये व्याज कमविण्याचा उद्योग आरंभिला आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या आर्थिक लाभांपासून वंचित राहू लागले. शिवाय त्यांना गरजेच्या वेळी ही रक्कम मिळणे दुरापास्त झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे आलेले हे १५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जापोटी जमा करण्याचा या बँकेच्या संचालक मंडळाचा डाव होता. परंतु, काँग्रेस नेते मधुकर चव्हाण तसेच शेतकरी मंडळी यांच्या तसेच भारतीय जनता पक्षाचे अँड मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर यांच्या प्रयत्नामुळे उस्मानाबाद जिल्हा बँकेचा हा डाव उघडकीस आला.
कारवाईची तंबी
जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक अरुण कदम यांना याप्रकरणी सर्तकता बाळगत शेतकऱ्यांच्या हक्काचे पीकविम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर विनाविलंब जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्याथा बँकेच्या संबधित पदाधिकारी व व अधिकारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तंबी आमदार चव्हाण यांनी दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट