राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला दहा हजार रुपयांचा चेक देण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिक व दलालास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड द्वितीय सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी सोमवारी (१३ जुलै) ठोठावला.
भिन्दोन तांडा (ता. जि. औरंगाबाद) येथील ज्ञानेश्वर नंदू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानेश्वर यांचे मोठे भाऊ रामनाथ चव्हाण यांचे २८ नोव्हेंबर २००६ रोजी देवळाई चौकात झालेल्या अपघातात निधन झाले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दारिद्र्यरेषेखालील रामनाथ चव्हाण यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत दहा हजारांचा मदतनिधी मंजूर झाला. या मदत निधीचा चेक घेण्यासाठी फिर्यादी तहसिल कार्यालयातील (संजय गांधी निराधार योजना) लिपिक सुभाष इरबा माने याच्याकडे गेला असता, फिर्यादीला चहा पिण्याच्या निमित्ताने बाहेर बोलावून, माने याने चेक देण्यासाठी १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. १५०० रुपये न दिल्यास चेकसाठी चकरा मारत बस, असेही त्याने फिर्यादीला सुनावले. यावेळी दलाल दिलीप सखाराम देहाडे हा तिथे उपस्थित होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता येतो, असे सांगून फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यावरून सापळा रचून लाच स्वीकारताना माने व देहाडे यांना पकडण्यात आले. तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक पी. डी. जाधव यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीवेळी चार साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त लोकअभियोक्ता अॅड. राजेंद्र मुगदिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर द्वितीय सत्र न्यायाधीश तेलगावकर यांनी दोघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद सुनावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट