म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सोमवारी (२० जुलै) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राकाज् लाइफ स्टाइल क्लबचा विषय नगरसेवक उपस्थित करणार आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठ्यातील अनियमितपणा, शहरातील साफसफाईची समस्या आणि दिवाबत्तीचा प्रश्न मांडण्याच्या तयारीत आहेत. 'मटा'शी बोलताना काही नगरसेवकांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
महापालिकेने ज्योतीनगर भागात 'बीओटी' तत्त्वावर जलतरण तलाव विकसित केला आहे. या तलावाच्या परिसरात कंत्राटदाराने बेकायदा बांधकाम करून हुक्का पार्लर, मसाज सेंटर, पूल टेबल आदी सुरू केल्याचे उघड झाले होते. हा प्रश्न सर्वसाधारण सभेत नगरसेवक उपस्थित करणार आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगवान घडमोडे यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेत राकाज् लाइफ स्टाइल क्लबचा विषय उपस्थित करण्याचा विचार आहे. त्यातप्रमाणे डीव्हीआरमधील हार्डडिस्क देखील गायब झालेली आहे. या सर्व प्रकरणात संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
पाणीप्रश्न तर महत्वाचा आहेच पण त्याच बरोबर गुंठेवारी भागात विकास कामे झाली पाहीजेत असा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. गुंठेवारी भागात प्रामुख्याने ड्रेनेज लाइनचे काम झाले पाहिजे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करणार आहे. दिवाबत्तीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पथदिवे बंद आहेत, याकडे महापौरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू, असे शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी सांगितले.
महापालिकेची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने महापालिकेला विशेष निधी दिला पाहिजे. त्यासाठी सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करण्याचा आमचा आग्रह असेल, असे एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांनी सांगितले. भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल मी काही प्रश्न प्रशासनाला विचारले आहेत. डीआय आणि एचडीपीआय पाइपचा प्रस्ताव ऐनवेळी कसा घुसविला. या प्रस्तावातून फायदा कुणाला मिळणार आहे, असे प्रश्न विचारले आहेत. याशिवाय वॉर्डाचा साफसफाईच्या कामाचा प्रश्न मांडणार आहे.
पथदिव्यांचा प्रश्न गंभीर आहे. सिडको एन-२ भागात बहुतेक पथदिवे बंद आहेत. याविषयी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारणार आहे. त्याशिवाय साथीचे आजार व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे शिवसेनेचे कमलाकर जगताप यांनी सांगितले. मिसारवाडी भागात आरोग्य केंद्र, शाळा नाही. हे दोन्ही मुद्दे सर्वसाधारण सभेत मांडण्याचा माझा विचार आहे. गेल्या दहा वर्षांत महापालिकेने मिसारवाडी भागाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, असे एमआयएमच्या संगीता वाहुळे यांनी सांगितले.
मोफत अंत्यसंस्कार योजना महापालिकेच्या प्रशासनाने एकतर्फी बंद केली आहे. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेली योजना प्रशासनाला बंद करता येत नाही. या योजनेबद्दल सर्वसाधारण सभेत जाब विचारणार असल्याचे भाजपच्या माधुरी अदवंत यांनी सांगितले.
शिवसेनेच्या मीना गायके यांनी सांगितले की, पुंडलिकनगर, हनुमाननगर, स्पंदननगरात पाण्याची समस्या गंभीर आहे. अवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडणार आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. प्रशासनाने त्यात लक्ष घातले पाहिजे व दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी करणार आहे.
राकाज् लाइफ स्टाइल प्रकरणात कोर्टाने सांगूनही महापालिकेने संबंधितांवर अद्याप कायदेशीर कारवाई केलेली नाही. हा प्रश्न सर्वसाधारणसभेत उपस्थित करणार आहे.
- भगवान घडमोडे,
गटनेते, भाजप.
शहरात साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने काय उपाययोजना केली, या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी, असा माझा प्रयत्न आहे.
- कमलाकर जगताप, शिवसेना.
आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. त्याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करावा.
- जमीर कादरी, एमआयएम
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट