दुष्काळप्रश्नी शरद पवार यांचा सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ सप्टेंबरपासून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उस्मानाबाद येथे दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून पवार यांनी आंदोलन केले.
'उस्मानाबादसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यंदाही दुष्काळाने ग्रासले आहे. अशा प्रसंगी राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी, रब्बीसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये, चारा छावणी या प्रामुख्याने दुष्काळग्रस्तांच्या मागण्या आहेत,' असे सांगून 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत,' असे भावनात्मक आवाहन पवार यांनी या वेळी केले.
'देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत येऊन मुखदर्शन द्यायला तयार नाहीत. चर्चा तर सोडा; परंतु साधा संदेशही त्यांच्याकडून येत नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. परंतु, त्यांना याची चिंता नाही. यामुळे दुष्काळी भागांतील जनतेचे जगणे असह्य होत चालले आहे,' अशी टीका पवार यांनी केली.
प्रसंगी राजकीय संघर्ष
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. उस्मानाबाद जिल्हा तीन वर्षांपासून सलग दुष्काळाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा पवार यांनी दिला. 'दुष्काळप्रश्नी वेळीच उपाययोजना न झाल्यास शेती उद्वस्त होईल व पशुधनावर विपरिणाम होतील. मदतीबाबतचे राज्य सरकारने धोरण अद्यापही स्पष्ट नाही. मराठवाड्यातील हवामान पर्जन्यमानास अनुकूल नाही, असा अहवाल मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्षही वेधले होते. परंतु, सरकारचे धोरण नकारात्मकच आहे. दुष्काळी भागाची पाहणी करून मुख्यमंत्री व पंतप्रधानांना स्वतंत्र अहवाल देऊन दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीसाठी विनंती करणार आहे', असे पवार म्हणाले.
मोदींनी हस्तक्षेप करायला हवा होता
ललित मोदी प्रकरणी संसदेच्या २० दिवसांच्या कामकाजाचा खेळखंडोबा झाला. पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विरोधी पक्षनेत्यांबरोबर चर्चा केली असती तर, त्यातून मार्ग निघाला असता, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. देशात तिसरी आघाडी निर्माण व्हावी, ही आपली इच्छा आहे. बिहारची निवडणूक महत्त्वाची असल्याने विरोधकांनी ती एकत्रितपणे लढवावी, असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळेच १२ ऑगस्टला दिल्लीत काही नेत्यांना चहापानासाठी निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
आवरते भाषण
उस्मानाबाद येथे शरद पवार यांच्या भाषणातून घणाघाती टीका होईल म्हणून या धडक मोर्चाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु, पवार यांनी त्यांचे भाषण केवळ दहा मिनिटांतच आवरते घेतले. पवार यांनी मोदींना लक्ष्य करताना, 'उद्या तुम्हाला भाईयों और बहनों... ऐकू येईल. पण आपल्या भावा-बहिणींकडे पाहायला त्यांच्याकडे वेळ नाही,' अशी टीका केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट