म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संसदेचे पावसाळी अधिवेशन चालवू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपने रविवारी क्रांतिचौकात काँग्रेस विरोधात धरणे आंदोलन केले. केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने हे पहिलेच आंदोलन होते.
'संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है,' आदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. अकराची वेळ असताना प्रत्यक्षात आंदोलन तासभर उशिराने सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आमदार अतुल सावे, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भगवान घडमोडे, एकनाथ जाधव, अनिल मकरिये, राजू बागडे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, आशा पाटील, जयश्री किवळेकर, दयाराम बसैये, राम बुधवंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. घोषणाबाजीनंतर दानवे यांनी उपस्थितांसमोर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर पत्रकारांशी दानवे म्हणाले,'हिवाळी अधिवेशन तीन आठवडे चालले, पण काँग्रेसच्या गोंधळी भूमिकेमुळे कामकाज होऊ शकले नाही. सुरुवातीला त्यांनी भू संपादन विधेयकाला मान्यता देण्याचे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी संसदेची परंपरा मोडली. ४४ खासदारांनी संसद बंद पाडली असे म्हणणे चुकीचे आहे. नियम तोडून त्यांनी काम केले. आम्ही शांत राहिलो. बहुमत असल्यामुळे गोंधळात विधेयके मंजूर करून घेता येणे शक्य होते, पण संसदेच्या परंपरेला धरू नव्हते. म्हणून शिस्त पाळली.'
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील आरोपाबाबत विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले, 'सुषमा स्वराज यांनी ललित मोदींच्या पत्नीच्या उपचारासाठी केलेली मदत माणुसकीच्या दृष्टीकोनातून होती. देशाचे नुकसान करणाऱ्या क्वात्रोचीला तर काँग्रेसने स्वतः देशाबाहेर नेऊन सोडले. काँग्रेसकडे अधिवेशनात मुद्दे नसल्याने त्यांनी गोंधळ घातला,' असा दावा त्यांनी केला. एका मासिकाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाचा दानवे यांनी निषेध केला. ते म्हणाले, 'बाळासाहेब महान नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात वाटचाल केली आणि तोच वारसा पुढे सुरू आहे. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख सहन केला जाणार नाही. '
पूर्वीच व्हायला हवे होते
राज्यातील दुष्काळाबद्दल राज्य सरकारची भूमिका काय असे विचारले असता दानवे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसमवेत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री व आमदार पुढील आठवड्यात आपापल्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जाईल. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज आहे. शरद पवारांनी मराठवाड्याचा दौरा केला. पवार साहेब राज्याचे नेते आहेत. दुष्काळ उपाययोजना मागच्या सरकारच्या काळातच व्हायला हव्या होत्या. त्या झाल्या असत्या तर पवार साहेबांना आंदोलन करण्याची गरज भासली नसती'.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट