जुलै व ऑगस्टमधील पावसाच्या तुटीचा फटका पिकांसह तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना बसला आहे. दोन महिन्यात प्रमुख प्रकल्पांसह तालुक्यातील लघु प्रकल्प व तलाव कोरडे पडले आहेत. शहराला अंबाडी धरणातील मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरावर टंचाईचे संकट घोंगावत आहे.
तालुक्यातील शिवना, अंबाडी, पूर्णा, अंजना, गांधारी या नद्यांना जूनमधील अतिवृष्टीमुळे थोड्या प्रमाणात पाणी आले होते. त्यानंतर जोरदार व पुरेसा पाऊस न पडल्याने नद्या व नाले कोरडे ठाक पडले आहेत. कन्नड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या अंबाडी प्रकल्प मृतसाठ्यात असून कन्नड शहराला पाणी टंचाईच्या सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. कन्नड शहराला सध्या सहा दिवसांतून एका पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ५४ गावांसाठी पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती तांत्रिक अधिकारी एम. एम. देवकर यांनी दिली. देवगाव (र.), चांभारवाडी, माटेगाव, कानडगाव (क.), औराळी, जवळी (खुर्द), जवळी (बुद्रुक), गव्हाळीतांडा, गौरपिंप्री, माटेगाव, दिगाव, खेडी, भांबरवाडी, लंगडातांडा, आंबातांडा, नादरपूर, दहिगाव, धामणी (खुर्द), शिरोडी या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे.
यंदा जून महिन्यात पहिल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची आतापर्यंत सरासरी तूट २० टक्के आहे. सध्या जेमतेम पावसावर पिके काही प्रमाणात तग धरून आहेत. यंदा मुग व उडीद या पिकांनी हात न दिल्याने सर्व भिस्त मका व कापूस पिकावर असून मका तुऱ्यात असून कापूस कैऱ्या लगडण्याच्या स्थितीत आहे. या पिकांना पाण्याची गरज असून पाणी नाही मिळाले, तर खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.
प्रकल्पांनी गाठला तळ
कन्नड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या अंबाडी प्रकल्प मृत साठ्यात आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २.१३० द.ल.घ.मी.आहे यातून कन्नड शहरासाठी ३० लाख लिटर पाण्याच्या उपसा होतो. शिवना-टाकळी प्रकल्पाचा जलसाठा ८.५ टक्के असून यात ३.१ द.ल.घ.मी. पाणी आहे. पूर्णा-नेवपूर प्रकल्पात ३० टक्के, तर अंजना-पळशी प्रकल्पात ३३ टक्के जलसाठा आहे. अंजना-पळशी प्रकल्पातून १० गावांना टँकद्वारे पाणीपुरवठा करण्यत येत आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळे पाणी चोरी होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट