औरंगाबाद टाइम्स टीम
शहरात मुलींवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देवगिरी कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहाच्या वतीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी मुक्तसंवाद आज (गुरुवार) घेण्यात आला.
'महिला सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाने घ्यावयाची भूमिका' यावर सहाशेहून अधिक मुलींचे म्हणणे वसतीगृहाने पोलिस आयुक्तांना सुपूर्द केले होते. त्याचबरोबर देवगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींनी इतर महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींशीही संवाद साधला. त्यामुळे या कार्यक्रमाला खाजगी व सरकारी वसतीगृहातही राहणाऱ्या मुलींनी हजेरी लावली होती. देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. बाहेर प्रोजेक्टर लावण्यात आले होते. सुरुवातीला युवतींचे संघटन या संकल्पेनवर आधारित दुर्गानृत्य स्वाती गोर्डे व तिच्या मैत्रिणींनी सादर केले. पंडितराव हर्षे अण्णा कार्येक्रमाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर डॉ. अविनाश येळीकर, प्राचार्य डॉ. माणिकराव जाधव, वसतीगृह अधीक्षिका लता जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी कराटेंचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पोलिस आयुक्तालयातर्फे महाविद्यालयीन तरुणींमध्ये जनजागृती मोहिमेची अनौपचारिक सुरुवातही या कार्यक्रमानेच झाली असल्याने काही मुलींनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले. यामध्ये दामिनी पथक, गुन्हेगाराचे वय, गुन्हा नोंदवताना येणाऱ्या अडचणी, पोलिसांच्या वर्तनापासून ते थेट पोलिसांच्या ड्युटीच्या तासांपर्यंत प्रश्न विचारले. आयुक्तांनीही सायबर क्राईम, तरुणी व महिलांची छेडछाड, त्या संदर्भात दाखल करता येणारे गुन्हे, सोशल मीडियाबाबात घ्यावयाची दक्षता आदींबाबात मार्गदर्शन केले. 'शहरात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुलींनीही सर्तक होण्याची गरज असून पोलिस, महिला सहाय्य कक्ष यांचे नंबर स्वतःजवळ बाळगा. रात्रीच्या वेळी रिक्षातून परतत असाल तर, ऑटोचा नंबर घरच्या सदस्यांना पाठवा', असा दक्षतेचा इशाराही केला.
प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविक केले तर हर्षे अण्णा यांनी अध्यक्षीय समारोप केला. वसतीगृह अधीक्षिका लता जाधव यांनी आभार मानले. सुजाता मुंडे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता पूजा भानुशाली, अश्विनी इंगळे, मनिषा गणपुरे, गीता बोबडे, लक्ष्मी शेळके आदी विद्यार्थीनींनी काम पाहिले.
महिलांनी दक्ष होणे गरजेचे
शहर सुरक्षित होण्याकरता पोलिस खाते सज्ज आहे, पण मुली व महिलांनी दक्ष व सतर्क होणे गरजेचे आहे. आताच्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहे. सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तक्रार देणे टाळू नका. शहरात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसविणार असून, अतिसंवेदनशील भागातही सीसीटीव्हींची बसवता येतील का याबाबतही विचार सुरू आहे. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आल्यावर पुरुष अधिकारी असल्यामुळे महिला संकोच करतात व बरेचदा पोलिस खातेही टीकेचे धनी होते. म्हणूनच महिला-मुलींची तक्रार महिला पोलिसांनी नोंदवून घ्यावी याबाबत प्रयत्नशील आहोत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
स्वतःला घडवा
मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी होतो. अभ्यास करणारे, प्रश्न विचारणारे, चर्चेत सहभागी होणारे विद्यार्थी पाहून मला नवल वाटायचे व आम्हीही त्यांना चिडवायचो, पण आता समजले की ते विद्यार्थीच योग्य होते. आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात शिस्त, सुव्यवस्था याबाबत विद्यार्थ्यांनीच आत्मपरीक्षण करावे. मोबाइलवर वेळ खर्च करण्यापेक्षा अभ्यास, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन सारख्या सवयी लावा. सोशल मीडियाचा वापर जपून करा यात वाहत जाऊ नका. स्वतःला घडवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी कॉलेजियन्सना दिला. मुलांशीही साधला संवाद
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे वलय व तरुणाईमध्ये असणारी लोकप्रियता याचा प्रत्यय या कार्यक्रमातही आला. मुळात हा कार्यक्रम मुलींनी मुलींकरता घेतला होता, पण त्यापूर्वी अमितेशकुमार यांना मुलांशी संवाद साधावा लागला. महाविद्यालयाच्या आवारातच झालेल्या या संवादात आयुक्तांनी मुलांना मार्गदर्शन केले. शहराची शिस्त, सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून प्रत्येक वाईट घटनांची नोंद घ्या व पोलिसांना कळवा. वाहतूक असो की, कॉलेजचा परिसर स्वतःही नियमांचे पालन करा व इतरांनाही सांगा असेही आवाहन त्यांनी केले. हा संवाद शेकडो विद्यार्थ्यांचे मोबाइल रेकॉर्ड करत होते. तरुणांमध्ये त्यांची किती क्रेझ आहे, हे यावेळी दिसून आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट