म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुलीच्या आढावा बैठकीतून महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना बाहेर काढले. झनझन यांच्याकडे कर वसुलीचा पदभारच नाही. त्यामुळे त्यांनी बैठकीत पूर्णवेळ थांबू नये आणि मालमत्ता कर वसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकही घेऊ नये, अशी सूचना केली.
महापौरांनी सकाळी अकराच्या सुमारास मालमत्ताकर वसुलीसाठी घेतलेल्या बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, गजानन बारवाल, भगवान घडमोडे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, सर्व वॉर्ड अधिकारी यांच्यासह शिवाजी झनझन उपस्थित होते.
झनझन यांच्याकडे असलेला करमूल्य निर्धारक व संकलक पदाचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश महापौरांनी २० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले होते. त्यानुसार प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी झनझन यांच्याकडचा कार्यभार तत्काळ काढला. याला आयुक्त प्रकाश महाजन यांचा विरोध होता. झनझन यांच्याकडचा कार्यभार उपायुक्त अय्युब खान यांच्याकडे देण्यात आला. महाजन यांनी अय्युब खान यांच्याकडचा करमूल्य निर्धारक व संकलकपदाचा कार्यभार काढून घेतला व हा विभाग स्वतःकडेच ठेवला. गुरुवारी आयुक्त बाहेरगावी गेले होते.
तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत झनझन यांनी कर वसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीचे पडसाद आज महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकीत उमटले. त्यातच करमूल्य निर्धारक व संकलक पदाची सूत्रे नसताना झनझन बैठकीला येऊन बसले. त्यामुळे महापौरांसह सर्वच पदाधिकारी संतापले.
महापौर झनझन यांना उद्देशून म्हणाले, 'कर वसुलीचा कार्यभार तुमच्याकडे दोन दिवसांपूर्वी होता. तो पर्यंतच्या काळात किती कर वसुली झाली याची माहिती द्या आणि बैठकीतून निघून जा.' राजेंद्र जंजाळ आणि राजू वैद्य यांनी 'मालमत्ता करासंबंधी किती तक्रारींवर सुनावणी बाकी आहे,' असा प्रश्न विचारला. तेव्हा 'सर्व तक्रारी निकाली काढल्या,' असे झनझन यांनी सांगितले. वॉर्ड अधिकाऱ्यांनी मात्र 'तक्रारी निकाली काढणे बाकी आहे,' असा खुलासा केला. त्यानंतर महापालिकेकडे नोंद असलेल्या शहरातील मालमत्ता व नोंद नसलेल्या मालमत्ता यावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा मध्येच थांबवत महापौरांनी झनझन यांना बैठक सोडून जाण्यास भाग पाडले.
झनझन यांना उद्देशून ते म्हणाले, 'झनझन तुम्ही आता बाहेर जा. आम्ही वॉर्ड अधिकाऱ्यांशी बोलतो. आम्ही बोलल्यावर तुम्ही त्यांच्याशी स्वतंत्र बोलू नका, त्यांची बैठक घेऊ नका.' महापौरांच्या या निवेदनानंतर झनझन बैठकीतून उठून बाहेर गेले.
निर्णयाची अंमलबजावणी करा
मालमत्ता करावर २४ ट्क्के व्याज आकारण्याचा निर्णय प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक नागरिकांना मालमत्ताकराच्या नोटीस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे व्याज आकारणीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, असा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. तसे आदेश प्रशासनाला दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करा, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर विधीसल्लागार ओ. सी. शिरसाट यांनी कायद्यानुसार व्याज आाकरणी केली जात आहे असा खुलासा केला. 'व्याज आकारणीचा कायदा केव्हा झाला,' असा प्रश्न राजू वैद्य यांनी विचारला. तेव्हा २०१२ यावर्षीपासून हा कायदा झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले. २०१२ पासून कायदा झालेला असताना प्रशासनाने आतापर्यंत व्याज आकारणी का केली नाही, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला.
सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. ही अंमलबजावणी करणे शक्य नसेल तर शासनाला कळवा. शासनाला कळवताना २०१२ पासून व्याज आकारणी केली नाही आणि अद्याप मालमत्ताकराच्या नोटीसांचे वाटप झालेले नाही असेही शासनाला कळवा.
- त्र्यंबक तुपे, महापौर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट