September 23, 2015, 11:43 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा रफिक झकेरिया यांच्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास करावा व एका महिन्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी दिले आहेत.
मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा अध्यापक महाविद्यालयामध्ये अपात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यामध्ये २४ जुलै २०१५ रोजी दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे पोलिस आयुक्तांकडे २८ ऑगस्ट रोजी तक्रार देण्यात आली. त्यावरही कारवाई करण्यात आली नाही म्हणून कोर्टात धाव घेतली होती.
या प्रकरणामध्ये कोर्टाने फातेमा झकेरिया यांच्यासह माजी बीसीयूडी संचालक डॉ. ए. जी. खान, मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दोस्त मोहम्मद खान, उच्च शिक्षण विभागाचे निवृत्त सहसंचालक डॉ. आर. व्ही. किर्दक, निवृत्त सहसंचालक डॉ. आर. बी. कान्हेरे, निवृत्त सहसंचालक डॉ. मोहम्मद फैय्याज, माजी सहसंचालक डॉ. बळीराम पंढरीनाथ लहाने, याच विभागाचा वरिष्ठ लिपिक सय्यद फहिमुद्दिन व लिपिक व्ही. जी. बल्लाळ यांच्याविरुद्ध १५६ (३) कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अशोक गोवर्धन गिते यांनी फिर्याद दाखल केली आहे.
१ कोटी १९ लाखांचा गैरव्यवहार
मराठवाडा अध्यापक महाविद्यालयामध्ये तीन अपात्र प्राध्यापक उमेदवारांना अवैधरित्या नियुक्ती देण्यात वरील सर्व आरोपी जबाबदार असून, या नियुक्तीमध्ये सुमारे १ कोटी १९ लाख ६६ हजार २४० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट करीत क्रांतिचौक पोलिस ठाण्याला चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 12:17 pm
म. टा. प्रतिनिधी, पैठण
परभणी येथील वनविभागाने परवानगी न घेता जायकवाडी धरणात मगर सोडली आहे. शिवाय त्यांनी मगर सोडल्याचे कळविण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. दरम्यान, ही आठ फुटांची मगर धरणाच्या किनाऱ्यावर येत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे ६ सप्टेंबररोजी आठ फूट लांब मगर सापडली. ही मगर परभणीच्या वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ सोडल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिली. 'जायकवाडी धरणात मगर सोडत असल्याची कोणतीही माहिती अथवा परवानगी परभणीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही,' असे जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाच्या दक्षिण भागातील कऱ्हेटाकळी भागात मार्क क्रोकोडाईल जातीची पूर्ण वाढ झालेली मगर असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. ही मगर सहजासहजी नजरेस पडत नाही. आतापर्यंत या मगरीने जनावरांवर व माणसावर हल्ला केल्याची नोंद नाही. मात्र, १० सप्टेंबरपासून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याजवळ व औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदण्यात आलेल्या अप्रोच कॅनॉल परिसरात दररोज दहा फुटी मगर नागरिकांच्या नजरेस पडत आहे. यामुळे याभागातील गुराखी, मच्छिमार, शेतकरी व औरंगाबाद पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:27 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाने तडफडणाऱ्या जिल्ह्याची तहान गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात भागली. ३ मध्यम आणि २० लघु प्रकल्प गेल्या अनेक वर्षांनतर पहिल्यांदा भरले. मात्र, यातल्या अनेक प्रकल्पांना गळती लागली आहे. त्यामुळे 'देव आला द्यायला, पदर नाही घ्यायला' अशी अवस्था झाली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नेहमीच कोरडेठाक राहिलेल्या अनेक प्रकल्प तुडूंब भरले. जिल्ह्यात असलेल्या १६ मध्यम प्रकल्पांपैकी ३ तर २० लघुप्रकल्प हे शंभर टक्के भरले. मात्र, यातील अनेक प्रकल्पांना लागलेली गळती थांबवायची कशी, हे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाने या प्रकल्पांची पाहणी केली असून दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रकल्प भरल्याने या भागातल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. त्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी जलसंपदा विभागाकडून किती पाणी देण्यात येणार याचे नियोजन शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे.
दोन ते तीन मध्यम प्रकल्पांची गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सांजूळ प्रकल्पाला आजच भेट देऊन पाहणी केली. मात्र, काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. ज्यांची दुरुस्ती शक्य आहे, ती लवकर करू. प्रकल्पांच्या गळतीसंदर्भात अंदाज पत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.
- डी. आर. शिंगाडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:38 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना जमा केलेली रक्कम यावर्षी कॉलेज आणि विद्यापीठाचीच तिजोरी भरणार आहे. दुष्काळामुळे स्पर्धा, महोत्सव रद्द करण्यात आले, मात्र त्यासाठी विद्यार्थ्याकडून प्रवेशा घेतानाच शुल्क वसूल करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुमारे अडीच कोटी रुपये कॉलेजांच्या खिशात गेले आहेत.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांत सुमारे २ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकतात. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये शुल्क वसूल करण्यात आले आहे. मराठवाड्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने युवक महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. कॉलेजांनाही स्नेहसंमेलने न घेण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थी संसद निवडणूक प्रक्रियाही थांबविण्यात आली. दुष्काळाच्या नावाखाली घेण्यात आलेला हा निर्णय कॉलेजांचाच गल्ला भरणारा ठरला आहे.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून युवक महोत्सव, अाविष्कार, इंद्रधनुष्य, विद्यार्थी कल्याण निधी, अश्वमेध अशा विविध १३ कारणांसाठी शुल्क आकारले जाते. अनेक कॉलेजांत विद्यापीठाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला सुमारे २०० रुपये भरावे लागतात. विद्यापीठअतंर्गत २ लाख ८५ हजार विद्यार्थी पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतात. त्यांच्याकडून वसूल केलेले हे शुल्क विद्यार्थ्यांना परत करणार की मुख्यमंत्री मदत निधीला देणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
परीक्षा शुल्काबाबतही गंभीरता नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळाच्या नावाखाली स्पर्धा, महोत्सव रद्द केले, पण विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणी सुरू आहे. यामुळे शासनाची शुल्कमाफीची घोषणा केवळ कागदावर उरली आहे.
युवक महोत्सव रद्द करण्याचा निर्णयाबाबत कॉलेजांना सूचनाही दिलेल्या आहेत. विद्यार्थी संसदेबाबत शासनाचेच आदेश होते. विविध तेरा हेडखाली शुल्क आकारण्यात येते.
- डॉ. सुहास मोराळे, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ.
विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे शुल्क
शीर्षक शुल्क
युवक महोत्सव २५
क्रीडा शुल्क २५
अविष्कार ४
ई-सुविधा ५०
आपत्कालीन निधी १०
इंद्रधनुष्य ४
एनएसएस १०
विद्यार्थी कल्याण निधी १०
अश्वमेध ४
आव्हान ४
अभियान ४
विद्यापीठ ४
(सर्व शुल्क रुपयांत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:37 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन गुणपत्रिका देण्याचा प्रकार समोर आला आहे. 'एटीकेटी'चे नियम बदलल्याचीच खबरबात प्रशासनाला नसल्याने हा गोंधळ झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर, प्रवेशास पात्र नसल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठात निदर्शने केली. प्रशासनाने पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्याची मागणी केली.
विद्यापीठाने जूनमध्ये औषधनिर्माणशास्त्र परीक्षा घेतल्या. त्याचा निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होईपर्यंत उत्तीर्णतेचे निकष बदलले. त्याची खबरबात परीक्षा विभागालाच नव्हती. 'एटीकेटी'चे नियम बदलल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका परत घेतल्या. त्यानंतर त्यांना दुसऱ्या गुणपत्रिका दिल्या गेल्या. पूर्वी चार विषयांसाठी 'एटीकेटी' होती. नव्या नियमानुसार दोन विषयांसाठीच 'एटीकेटी' ठेवण्यात आली. तोपर्यंत 'एटीकेटी'ची गुणपत्रिका आल्याने विद्यार्थ्यांनी पुढील वर्षाला प्रवेश घेतला. नव्या नियमानुसार प्रवेश रद्द होत असल्याचे लक्षात येताच विद्यार्थी चिडले. त्यांनी बुधवारी विद्यापीठात धाव घेतला. 'एटीकेटी पूर्ववत चालू ठेवा, इंजिनीअरिंगप्रमाणे कॅरिऑन द्या,' अशा मागणी करत मुख्य इमारतीसमोर निदर्शने व प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवक क्रांती दलाचे पंडित तुपे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. अनिल तिवारी, अनिकेत चव्हाण, अजय येवले आदींची उपस्थिती होती.
निर्णय पूर्ववत ठेवण्याच्या हालचाली
विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांकडून निकालाचा आढावा घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या शैक्षणिक वर्षापुरता 'एटीकेटी'चा निर्णय पूर्ववत ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे. विद्यापीठाच्या नव्या नियमानुसार ३२२ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 24, 2015, 11:50 am
औरंगाबाद टाइम्स टीम
सर्वांच्या लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सवाच्या साधारण आठवडाभर आधी गणपतीच्या स्वागताची तयारी घरोघरी आणि मंडळांमध्ये सुरू झाली होती, पण हा आनंदी उत्सव आठवणीत राहावा यासाठी घरात किंवा घरातील व्यक्तींसाठी ननवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो. याच पार्श्वभूमीवर अनेक ऑनलाइन कंपन्यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने विशेष ऑफर्सही दिल्या.
गणपती बाप्पापासून ते आपल्या घरासाठी अशा सर्वच वस्तू खरेदी करण्याचा आनंद यावेळी नेटीझन्सनी घेतला. अगदी प्रसादापासून बाप्पाच्या सजावटीचे साहित्य उपलब्ध होते. तसेच गणेशोत्सवानिमित्त विविध अॅक्सेसरीज, घरगुती सजावटीच्या वस्तू यावरही डिस्काऊंट देण्याचा प्रयत्न केला गेला. ऑनलाइन शॉपिंगची वाढत चाललेली क्रेझ लक्षात घेत ऑनलाईन कंपन्यांनी ग्राहकांना घरबसल्या गणपतीसाठीचे अनेक पर्याय यावेळी उपलब्ध करून दिले.
अॅक्सेसरीज
सण असला की पारंपरिक पेहरावाला महत्त्व दिले जाते. यासाठी पारंपरिक पेहराव तसेच अक्सेसरीजवर विशेष ऑफर गणेश चतुर्थीच्या दिवशी देण्यात आली होती. सोवळं, चुडीदार, पायजमा, कुर्ता, उपरणे यावर पन्नास ते साठ टक्के सूट देण्यात आली होती. लहानांपासून मोठ्यांच्या वस्तूंवर यावेळी विशेष सवलती देण्यात आल्या होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:34 pm
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थानच्या लौकिकास बाधा पोहोचविणाऱ्या पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी देवस्थानला नुकसानभरपाई म्हणून दहा कोटी रुपये द्यावेत. त्याचप्रमाणे देवस्थानची व भाविकांची वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून जाहीर माफी मागावी, त्याशिवाय नोटिसीचा खर्च म्हणून २५ हजार रुपये आठ दिवसांत द्यावेत, अशी मागणी करणारी कायदेशीर नोटीस तुळजाभवानी देवस्थानच्यावतीने व्यवस्थापक तथा तहसीलदार सुजीत नरहरे यांनी अॅड. विश्वास डोईफोडे यांच्यामार्फत गंगणे यांना बजावली आहे. मात्र, याचवेळी देवस्थानातील बहुचर्चित कारभाराचा खुलासा देण्याचे टाळले आहे.
महसूल प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी देवस्थानचा कारभार पारदर्शक असताना येथे विविध प्रकारे भ्रष्टाचार आहे, असे भासवून देवस्थान समितीची किशोर गंगणे हे हेतूत: बदनामी करीत आहेत, असा आरोप देवस्थान समितीच्यावतीने व्यवस्थापक सुजीत नरहरी यांनी केला आहे. तुळजाभवानी देवस्थानातील विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय शिवाय उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. यातील काही बाबींची सीआयडी मार्फत चौकशी चालू आहे. मात्र राजकीय दबावापोटी चौकशीची गतीही संथ आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे खासगी मालकीचे असून, त्यांच्यावर पुजाऱ्यांचा अधिकार होता. १९०९मध्ये या मंदिरातील सोळा आणे पुजारी व पालेकर पुजारी यांच्या वादामुळे तत्कालिन निजाम सरकारने हे मंदिर देखभालीसाठी म्हणून तहसीलदारांकडे स्वाधीन केले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून किशोर गंगणे यांनी येथील मौल्यवान वस्तूसंदर्भातील भ्रष्टाचाराला वाचा फोडली. तेव्हापासून येथील दुर्मिळ कागदपत्र नष्ट करण्याचे काम येथील व्यवस्थापकीय मंडळाने चालविले असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे अशातच चोरी गेलेल्या ऐतिहासिक भांड्यांची देवस्थानकडे कसलीही नोंद नसल्याचे येथील व्यवस्थापक सुजीत नरहरे यांचे म्हणणे आहे.
मंदिरातील भ्रष्टाचाराबरोबरच या संस्थेशी संलग्न असलेल्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शिवाय सैनिकी प्रशाला आणि वृद्धाश्रम या संस्थेचा गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये आणि अशाप्रकारच्या अपप्रवृत्तीला आळा बसावा म्हणूनच देवस्थान समितीने गंगणे यांना पायबंद घालण्याचा मार्ग पत्करला असल्याची चर्चा आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये चौदा जणांचा समावेश असताना या मंदिराचा कारभार हा पाच जणांच्या मर्जीनुसार चालत असून, यामध्ये तुळजापूरचे आमदार व नगराध्यक्ष हे दोन सदस्य नामधारी असल्याचा व त्यातून ते स्वार्थ साधत असल्याची पुजारी मंडळातून चर्चा आहे.
चोरीची माफी मागण्यापेक्षा मरण पत्करेन. परंतु, माफी मागणार नाही. सत्यता पडताळून संबंधिताविरोधात कारवाई करण्याऐवजी विश्वस्त मंडळ धमकीची भाषा बोलत आहे. देवस्थानचे व्यवस्थापक सुजीत नरहरे हे येथे रूजू झाल्यापासून येथील भ्रष्टाचार फोफावला आहे. पुराव्याशिवाय मी काहीच बोलत नाही.
- किशोर गंगणे, अध्यक्ष, पुजारी मंडळ, तुळजापूर
किशोर गंगणे हे बिनबुडाचे व कोणताही सबळ पुरावा नसताना आरोप करून भाविकांची दिशाभूल करीत आहेत. शिवाय देवस्थानच्या लौकिकास बाधा पोहचावित आहेत. वैयक्तिक स्वार्थापोटी ते हे कृत्य करीत असून, या कृत्यास येथील पुजाऱ्यांची संमतीही नाही. यापूर्वीही त्यांच्यावर देवस्थान समितीने शिस्तभंगाची कारवाई केली होती.
- सुजीत नरहरे, तहसीलदार, तुळजापूर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:35 pm
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
'प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. म्हणून भारतीय घटनेबाबत सविस्तर माहिती देतांना राष्ट्रध्वजाच्या कायद्यांविषयी माहिती व भारतीय नागरीकांच्या अकरा कर्तव्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. असे मत न्या. ए. आर. कुरेशी यांनी व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात एडीआरची कार्य व त्याचे फायदे तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याविषयावरील कायदे विषयक शिबिराप्रसंगी ते बोलत होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तत्पुर्वी न्या. एन. एस. सराफ यांनी एडीआरबाबत माहिती देतांना छोटया-छोटया गोष्टींसाठी झालेल्या वादाचे रूपांतर मोठया भांडणात होऊन ते वर्षानूवर्षे कोर्टकचेरीच्या फेऱ्या मारत आपले आयुष्य भांडणातच घालत असतात. अशा प्रकरणांमुळे त्या पक्षकारांचा पैसा, वेळ वाया जातोच पण कोर्टाचा वेळ सुद्धा वाया जातो. अशा प्रकरणांमुळे कोर्टातील प्रलंबीत प्रकरणे वाढत जातात. पक्षकारांनी आपसातील वाद वाढवत न जाता तडजोडीने लोकअदालत किंवा मध्यस्थी केंद्रामार्फत आपले वाद मिटविण्यासाठी असणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा.
यावेळी अॅड. गोणारकर यांनी भारतीय संविधानाचे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्यास सांगितले. संविधानाचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. संविधान हे भारतीय नागरिकांना एकात्मतेच्या बंधनात बाधणारा एक महत्वाचा घटक आहे. संविधान जाणून घ्या, त्याचा आदर करणे कर्तव्य आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा सन्मान करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे, एकता, बंधुत्व व स्त्रीयांचा सन्मान करणे हे नागरीकांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या पाटील यांनी विद्यार्थ्यांची आणि विद्यालयाची कर्तव्य सांगतांना कर्तव्य पहिले करा, नंतर हक्क ही सुरूवात आपल्या स्वतःपासून करा, असे सांगितले. अॅड. गजानन पिंपरखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन अॅड. सय्यद मुजाहिद यांनी केले. विधी महाविद्यालयाचे प्रा. मीर बशारत अली यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थी, प्राध्यापक व तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेले प्राधिकरणाचे अधिक्षक खरात, डी. जे. जाधव, वायगावकर, रणजित कदम, दिगंबर हिवरे यांचे आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:36 pm
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
एखादी ऑडर देऊन बाकी पैसे द्या तुम्हाला ५० हजाराचे बंडल आणून देतो असे सांगून दोन जणांची जवळपास ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नुतन सराफ यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या बाबत माहिती अशी की, प्रल्हाद मदनलाल जांगीड यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २७ डिसेंबर २०१४ रोजी एक जण त्यांच्या विश्वकर्मा ट्रेडिंग कंपनी या दुकानात आला. त्यांनी मला शौचालयाचा सेट पाहिजे असे सांगून त्याचे अंदाजपत्रक बनवायला लावले. ते अंदाजपत्रक ३६ हजार ५०० रुपयांचे झाले. ते सोबत घेऊन ती उज्वल इंटरप्राइजेस येथे गेला. तेथे त्याने १३ हजार ५०० रुपये दिल्यास ५० हजार रुपयांचे बंडल देतो असे सांगून १३ हजार ५०० रुपये घेऊन गेला. यावेळी तो दुसऱ्याच दाराने पळून गेला. या प्रमाणे त्याने १३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली होती. विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एका महाविद्यालयातील प्राध्यापिकेसोबत अशीच फर्निचर खरेदीत फसवणूक झाली. त्यात ८ हजार १०० रुपये घेऊन ५० हजाराचे बंडल देतो अशी भूल आरोपीने दिली होती.
विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी शेख बाबू शेख छोटूमियां (वय ३२ रा.नईआबादी, भोकर) यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पठारे आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक सूर्यतळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासानंतर न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात या खटल्यात सहा साक्षीदार तपासले होते. उपलब्ध पुरावा आधारे शेख बाबूने दोन जणांची २१ हजार ६०० रुपयांना फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार न्या. नुतन सराफ यांनी शेख बाबूला फसवणुकीसाठी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पकडला गेला तेव्हा पासून बाबू तुरुंगात आहे. ते दिवस त्याच्या शिक्षेतून कमी होणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 24, 2015, 12:37 pm
थकबाकी भरल्याने तीन वर्षानंतर वीजपुरवठा सुरळीत
म. टा. प्रतिनिधी, जालना
तीन वर्षांपासून अंधारात असलेल्या जालना शहरातील नागरीकांना गुरुवारची रात्र पथदिव्यांच्या उजेडात उगवलेली पहावयास मिळाली. जालना शहरातील अंधारासंदर्भात 'मटा'मधून वृत्त प्रकाशित होताच पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी त्याची दखल घेत वीज वितरण कंपनी व जालना पालिका यांना एकत्र बसवून यशस्वी तोडगा काढला.
जालना पालिकेने पंधरा वर्षाहून अधिक काळ वीजेचे देयके देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात अजित पवार हे उर्जामंत्री असताना त्यांनी जालना पालिकेच्या पथदिव्यांची थकबाकी पाहून कनेक्शन तोडले होते. जालना पालिका त्यावेळेस काँग्रेसच्या ताब्यात होती. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेसच्या नगराध्यक्षा पद्मादेवी भरतिया यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, प्रत्यक्षात अजित पवार व टोपे यांनी उपोषणाची किंचितही दखल घेतली नाही. आधी सगळी बाकी भरा असे म्हणत पवार यांनी तर नगराध्यक्षा भरतिया यांना मंत्रालयात भेटायला नकार दिला होता.
जालन्यातील स्थानिक व्यापारी व नागरीकांनी पथदिवे भविष्यात कधीच सुरू होणार नाही याची समजूत करून घेतली होती. या प्रकरणी गणपती उत्सवाच्या निमित्ताने सोमवारी दुपारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रस्त्यावरील अंधाराची चर्चा झाली होती. 'मटा'ने याबाबत वृत्त प्रकाशित करून पुन्हा एकदा हा विषय लावून धरला.
गुरुवारी सकाळी जालना पालिकेच्यावतीने पन्नास लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीच्या हवाली करण्यात आला. त्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर लगेचच गुरुवारच्या सायंकाळी तीन वर्षानंतर पथदिवे उजळले.
पालकमंत्री लोणीकर यांची मध्यस्थी
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात तातडीने मुंबई येथे मंगळवारी दुपारी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरण कंपनीचे अधिकारी व जालन्याच्या नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या संयुक्त बैठकीत या विषयावर मध्यस्थी केली. पालिकेच्या वीज देयकात जवळपास निम्म्यावर घसघशीत सूट मिळवून दिली. त्यानंतर उर्वरित रकमेचे हप्ते पाडून घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:38 pm
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
कुटुंबातील नातेवाईकांनी त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरच मुलाने आत्महत्या केली असल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा प्रकार जागेच्या भूसंपादनानंतर सुरु झालेल्या वादातून झाला आहे.
याप्रकरणी मालती सुंदरसिंह तेहरा यांनी २२ संप्टेबर २०१५ रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची कौटुंबिक जमीन जिल्हाधिकारी निवासस्थाना मागे आहे. त्या जमिनीतून तो रस्ता मोठा करण्यासाठी सरकारने जागा संपादित केली. त्याचा मोबदला सुंदरसिंह तेहरा यांना मिळणार होता. त्यावर कुटुंबातील त्यांचे बंधू आणि त्यांच्या मुलांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. त्याबाबत अनेक खटले नांदेड न्यायालयात आणि उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सुरू आहेत. १६ एप्रिल २०१३ रोजी पहिला वाद त्यांच्या नातलगांनी घातला होता त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पण तेव्हा काहीच झाले नाही, पुढे हा त्रास वाढतच गेला. त्यांचा मुलगा हरिशसिंह हा भालकी (ता. नांदेड) येथील शेतीचे कामकाज पाहत होता. १४ मे २०१५ रोजी घरात सर्वजण टीव्ही पाहत असताना रात्री ११ वाजता सुरेशसिंह तेहरा, सत्यनारायणसिंह तेहरा, कन्हैयासिंह तेहरा, भगवानसिंह तेहरा, विश्वराज तेहरा, सुजितसिंह तेहरा, सुधीरसिंह तेहरा, सत्येंद्रसिंह तेहरा हे सर्व जण आले आणि सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगा हरिशसिंह झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. १५ मे २०१५ रोजी सकाळी त्याचा मृतदेह छताला लटकलेला होता. या आठ लोकांनी दिलेल्या धमकीनेच त्याने आत्महत्या केली आहे. प्रथम खबरी अहवालातील माहितीनुसार तेव्हा अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. तपासानंतर तेहरा कुटुंबियांतील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:39 pm
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्यात उस्मानाबादसह बीड आणि लातूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पिण्याचे पाणी व जनावरासाठीच्या चाऱ्यामुळे शेतकरी व पशुपालकसह सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आदी नैसर्गिक कारणामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूरांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय ही संस्थासुद्धा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली आहे.
मानव कल्याणासाठी सतत झटणारी ही संस्था उस्मानाबादसह बीड व लातूर जिल्ह्यात मानवतेवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांना दिलासा देत सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावली असल्याची माहिती माऊंट अबू (राजस्थान) येथील या प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या प्रसार माध्यम विभागाचे प्रमुख ब्रम्हकुमार करुणामहिजी यांनी दिली. यावेळी ब्रम्हकुमारी सुरेखा बहनजी तसेच उस्मानाबाद सेंटरचे प्रमुख कार्यवाहक नंदकिशोर भन्साळी, जगदाळे यांची उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्ह्यातील किमान पाच हजार गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते याशिवाय शैक्षणिक सहाय्य किंवा आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपबल्ध करून देण्याचा या संस्थेचा मानस आहे. यासाठी त्यांनी एन साई साखर करखान्याचे सर्वेसर्वा बी. बी. ठोंबरे यांचीही साथ लाभणार आहे. शिवाय याकाळी ते जिल्हा प्रशासनाचेही सहकार्य घेत आहेत.
अध्यात्मिकतेच्या माध्यमातून आधार
गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळामुळे या जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर हा आर्थिकदृष्ट्या नागावला गेला असून तो मानसिक तणावामुळे खचला आहे. त्यासाठी नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अध्यात्मिकतेच्या माध्यमातून मानसिक आधार देत त्यांचा मानसिकस्तर उंचावण्यासाठी ही संस्था प्रयत्न करणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:40 pm
म. टा. प्रतिनिधी, लातूर
यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील बहुसंख्य गणेश मंडळानी दुष्काळी परिस्थितीचे भान कायम ठेवत सामाजिक उपक्रम राबविण्यावरच भर दिला आहे. मोजक्याच मंडळानी देखावे आणि विद्युत रोषणाई केली आहे.
लातूर जिल्ह्यात एकूण ६७३ गणेश मंडळानी श्री ची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील ५८१ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. बुधवारी रात्रीपर्यंत उदगीर आणि जळकोट शहरातील सात दिवसांच्या सार्वजनिक गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. विर्सजन उत्साही वातावरण करण्यात आले असले तरी वेळेचे नियम पाळण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणुका विसर्जनाच्या ठिकाणी पोहचल्या होत्या. जळकोट येथे यंदा विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळण करण्यात आली.
लातूरच्या नंदी गणेश मंडळाने सजावटीला फाटा देऊन मंडळ परिसरातील बंद पडलेली विंधन विहीर (बोअर) दुरुस्त करुन दिली. या विंधन विहिरीला पाणी लागल्याचा आनंद कार्यकर्ते आणि नागरिकांनी बप्पाचा जयघोष करून घेतला. देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमर गणेश मंडळाने सजावटीला फाटा देऊन यंदा मंडळ परिसरातील सार्वजनिक विंधन विहिरीचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची महिती बसवंत भरडे यांनी दिली.
श्री केशवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व खर्च टाळून एक विद्यार्थी एक पेंडी असा उपक्रम राबविला आहे. केशवराज विद्यालयाने विवेकानंद सार्ध शताब्दी वर्षात विवेकग्राम म्हणून विकसित करण्यास सुरू केलेल्या कासारगावातील शेतकऱ्यांच्या जनावारासाठी चारा उपलब्ध करून दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 24, 2015, 12:41 pm
म. टा. प्रतिनिधी, जालना
महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष पाहणी दौरा झाला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात दोन पेक्षाही जास्त वेळेस दुष्काळी भागाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. केंद्र सरकारला आता नजरआणेवारी सादरीकरणात किंवा टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे असा अहवाल पाठविण्यात राज्य सरकार वेळ दवडणार नाही. त्यामुळे आता थेट राज्यातील चौदा जिल्ह्यात दुष्काळ आहे. अशास्वरुपाचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात दिली.
मराठवाड्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्याप्रमाणे पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाने सलग ४० ते ५२ दिवसाचा खंड दिला. त्यानंतर दोन दिवस पाऊस झाला आणि परत एक १५ दिवसाचा खंड पडला. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष परिणाम मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील खरीप हंगाम यंदा वायाच गेला आहे, असे लोणीकर यांनी स्पष्ट केले. खरीपातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या निदर्शनास हीच नेमकी बाब लक्षात आणून देत आहोत. यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मी स्वता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा एकत्रितपणे आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा हा राज्य सरकारचा अहवाल केंद्र सरकार समोर मांडण्याचा निर्णय घेणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत नेहमी केंद्र सरकार समोर मराठवाड्यात टंचाई निर्माण झाला असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यामुळेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम येण्यासाठी खूपच उशिर झाला होता.
टंचाईच्या समस्येवर राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात असे केंद्र सरकारकडून सांगितले जाते. त्यामुळे महायुतीचे सरकार मागील सरकारने केलेली चूक पुन्हा करणार नाही असे लोणीकर म्हणाले.
पडझडीची पंचनाम्याला सुरुवातनुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील विविध गावात घरांच्या पडझडी झाल्या आहेत. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांना खरीपातील झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:42 pm
म.टा. प्रतिनिधी, खुलताबाद
वेरूळ येथील येळगंगा नदीवरील वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करा, अशी मागणी होत आहे. अवघ्या दीड वर्षापूर्वी बांधलेला बंधारा पावसात वाहून गेला आहे.
येळगंगा नदीवर जिल्हा परिषद सिंचन विभागाने मार्च २०१३मध्ये हा बंधारा बांधला होता. राज्याच्या जलसंधारण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चार महिन्यांपूर्वी २ मे २०१५ रोजी याच बंधाऱ्यावर उभे राहून येळगंगा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली होती. जिल्हा परिषद जलसंधारण समितीने सन २०१२-२०१३ मध्ये सिमेंट बंधारा मंजूर करून त्यासाठी ९ लाख ८० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार हा बंधारा २५ ते ३० वर्ष टिकायला पाहिजे होता. बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन अडीच वर्षे होत नाही तोच १३ व १४ सप्टेंबरला झालेल्या जोरदार पावसामध्ये हा बंधारा वाहून गेला आहे. नदीचे पाणी ओसरल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
दशक्रियेसाठी टॅँकरचे पाणी
येळगंगा नदीवर दशक्रिया विधीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. बंधारा वाहून गेल्याने नदीचे साचलेले पाणीही वाहून गेले आहे. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्या लोकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. याठिकाणी नवीन सिमेंट बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
२०१२-१३ येळगंगा बंधारा कामास मंजुरी.
९ लाख ८० हजारांचा निधी झेडपीकडून मंजूर.
२५ ते ३० वर्ष बंधाऱ्याचे काम टिकणे होते अपेक्षित.
येळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने जोरदार पावसामुळे सिमेंट बंधारा, दशक्रिया घाटाच्या पायऱ्या वाहून गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पावसामुळे नुकसान झालेल्या सिमेंट बंधाऱ्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याबाबत ठरले आहे. तांत्रिकदृष्ट्या सिमेंट बंधाऱ्याची पाहणी करून बंधारा पुन्हा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- शैलेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य
बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी.
- कुसुमबाई मिसाळ, पंचायत समिती सदस्य
निसर्गापुढे कोणाचे चालत नाही. २४ तासांत ११६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तसेच लोकसहभागातून गाळ उपसा मोठ्याप्रमाणावर केला. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी साचल्याने सिमेंट बंधारा पाणी थोपवू शकला नाही.
- राजेंद्र अमृतकर, शाखा अभियंता,
सिंचन उपविभाग
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:43 pm
म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शेतातील कपाशीचे उभे पिक सुकून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हा पिकावर मर रोगाची लक्षणे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार यांनी ताजनापूर, सुलतानपूर, देवळाणा, भडजी, सराई, खुलताबाद येथे भेट देऊन कपाशीची पाहणी केली.
'पाण्याचा ताण बसल्याने आणि जमिनीत पाणी साचून राहिल्यास कपाशीवर अनिष्ठ परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाचे पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो आणि पाने पिवळी पडतात,' असे डॉ. पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेऊन पाणी काढून द्यावे यासह शेतकऱ्यांना उपाययोजना सांगण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी कीड नियंत्रक व्ही. के. पवार, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक आहेर, कृषी सहाय्यक अनिता बनकर आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:44 pm
विजय चौधरी, खुलताबाद
भद्रा मारुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद येथील बाजारगल्लीत गणपतीचे अत्यंत जागृत देवस्थान आहे. भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारे दैवत म्हणून या देवस्थानची ख्याती आहे.
गणेशोत्सवात येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती हा ओकांर ब्रह्मस्वरुप आहे. सर्व भक्तांना तो पावतो. त्यांची संकटे दूर करतो, अशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये श्रद्धा आहे. खुलताबाद येथील बाजारगल्लीत असणाऱ्या या मंदिरातील गणरायाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. येथे विठ्ठल-रुख्मिणी, दत्तात्रय यांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर केव्हा व कोणी बांधले याचा निश्चित उल्लेख सापडत नाही. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. खुलताबाद येथे जाण्यासाठी एसटी बसगाड्या व्यतिरिक्त खासगी वाहने
भरपूर आहेत.
शमीपत्रे का वाहतात
पुराणात याबाबत दोन कथा आढळतात. एकदा एक व्याध राक्षसाच्या भीतीमुळे एका शमीवृक्षावर जाऊन बसला. त्यावेळी त्याच्या धक्क्याने शमीची काही पाने खाली असलेल्या गणेशमूर्तीवर पडली. त्या पुण्याने व्याध मुक्त झाला. तेव्हापासूनच शमीची पाने गणेशाला वाहतात.
दुसरी कथा अशी सांगितली जाते की, और्य ॠषिकन्या शमी आणि धौम्य ॠषींचा पूत्र मंदार याचा विवाह झाला. एकदा भृशुंडी ॠषी त्यांच्या आश्रमात आले असता त्यांची हत्तीसारखी सोंड पाहून शमी व मंदार यांना हसू फुटले. तो अपमान वाटून भृशुंडी ॠषींनी त्यांना तुम्ही दोघेही वृक्षकुळात जन्म घ्याल असा शाप दिला. त्याबरोबर दोघांचेही रुपांतर वृक्षात झाले. पुढे मंदारचा पूत्र शौनकने त्या दोघांना शापमुक्त करण्यासाठी गणेशाची घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने गणराय प्रसन्न झाला. तेव्हा शौनकाने शमी व मंदार यांना पुन्हा मानव रुप मिळावे म्हणून प्रार्थना केली. तेव्हा गणराय म्हणाले, 'भृशुंडी गणेशभक्त असल्याने त्याचा शाप खोटा होणार नाही. मात्र, तुझ्या उपासनेवर प्रसन्न होऊन मी हवे तर मंद्र वृक्षाच्या मुळाशी राहतो व शमीला माझ्या पूजेत स्थान देतो. तेव्हापासून गणेशाला शमीपत्रे वाहण्याची प्रथा पडली.
लाल फुले का वाहावीत?
यासंदर्भात एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. सिंदुरासूर नावाचा एक उन्मत्त दैत्य होता. त्याने सर्व देवांना पकडून बंदीत घातले. मात्र, श्री गणेशाने त्यांच्याशी युद्ध करून त्याचा वध केला व देवांची मुक्तता केली. त्याप्रसंगी सिंदुरासुराच्या विनंतीवरून गणेशाने त्याचे रक्त आपल्या अंगाला फासून घेतले. तो रक्तवर्ण त्याला फारच आवडला. तेव्हापासून शेंदूर तसेच लाल फुले गणेशाला वाहण्याची प्रथा पडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 24, 2015, 12:45 pm
म. टा. प्रतिनिधी, पैठण
सिहंस्थानिमित्त पवित्र स्नान पर्वणी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत शहरातील मुस्लिमांनी कुर्बानीची प्रथा एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस ठाणे प्रांगणात गुरुवारी आयोजित बैठकीत मुस्लिम बांधवांनी ही घोषणा केली. या निर्णयाचे टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. या घोषणेमुळे शहरातील जातीय सलोखा राखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
पैठण येथे २५ सप्टेंबरला कुंभमेळ्याचे तिसरे व अंतिम पवित्र स्नान होणार आहे. यापूर्वी २९ ऑगस्टला पहिले व १३ सप्टेंबरला दुसरे पवित्र स्नान संपन्न झाले. या दोन्ही शाही स्नानाच्या दिवशी शहरात मांस विक्री बंद ठेवण्यात आली होती. २५ सप्टेंबरला तिसरा पवित्र स्नान होणार आहे. व याच दिवशी बकरी ईद आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजातील नागरिक कुर्बानीची प्रथा पूर्ण करतात. हिंदू समाजात महत्व असलेले पवित्र स्नान ब बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने शहरातील मुस्लिम समाजाने हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत या वर्षी कुर्बानीची प्रथा एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत काझी अताल्लाह, शहर ए काझी फजलुल्ला, काझी कालीमुल्ला, हमीद खान यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. या बैठकीत उपस्थित असलेले ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनीही, एका समाजाच्या भावनांचा आदर करत कुर्बानीची प्रथा एक दिवस पुढे ढकलण्याचा शहरातील मुस्लिम समाजाच्या निर्णयाचे स्वागत केले. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मंडळानी व गणेश भक्तांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन यावेळी रेड्डी यांनी केले. पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस ठाणे प्रांगणात आयोजित केलेल्या या बैठकीला, माजी मंत्री अनिल पटेल, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंग, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक काकडे, दत्ता गोर्डे व मोठ्या संख्येने शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:47 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विभागातील ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी जुनाट बसचा वापर केला जात आहे. एकट्या औरंगाबाद विभागात २०० बस जुन्या झाल्या असून, यापैकी १५० गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. औरंगाबाद विभागाला एकही नवीन बस न मिळाल्याने प्रवाशांच्या वाट्याला खिळखिळ्या बसचा प्रवास आला आहे.
मध्यवर्ती बस स्थानकातून औरंगाबाद ते निजामाबाद आणि औरंगाबाद ते बऱ्हाणपुरला जाणाऱ्या बसची अवस्था वाईट बनली आहे. साध्या लाल बस खिळखिळ्या झालेल्या आहेत. अशी परिस्थिती पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड आगारातही निर्माण झाली आहे. मागील वर्षभरात या विभागाला एकही नवीन बस न मिळाल्यामुळे जुन्या बसचाच वापर सुरू आहे. मध्यवर्ती बस स्थानकात काही महिन्यांपूर्वी ३२ निमआराम नवीन बस देण्यात आल्या. नवीन निमआराम बस आल्याने, पूर्वीच्या निमआराम बसचे रुपांतर साध्या बसमध्ये करण्यात आले. या बस औरंगाबादच्या विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. नवीन निमआरामशिवाय एकही नवीन बस औरंगाबाद विभागाला मिळालेली नाही. साध्या बसची निर्मिती सध्या रोखली गेल्याने महामंडळाने निश्चित केलेल्या तीन लाख किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास या बसने कापला अाहे.
कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या दोनशे विशेष बस पहिल्या दोन पर्वणीनंतर औरंगाबाद विभागासह अन्य शहरांना देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दोन पर्वणीनंतरही या गाड्या नाशिक विभागातच असून, त्यांचा वापर लांबपल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे. एकीकडे औरंगाबाद विभागात जुनाट गाड्यांतून प्रवासी वाहतूक होत असून, दुसरीकडे नवीन बस देण्याचा किंवा कुंभमेळयासाठी तयार करण्यात आलेल्या गाड्यांच्या वाटपाचा प्रश्न सोडविण्यात आला नसल्याने त्रासदायक प्रवासाचा फटका मराठवाडयातील प्रवाशांना बसत आहे.
जुन्याच बसचा वापर
महामंडळाने निमआराम किंवा एक्सप्रेस बसचे तीन लाख किलोमीटरनंतर साध्या बसमध्ये रुपांतर करण्याचे ठरवले हाेते. आठ लाख किलोमीटर चाललेली साधी बस भंगारात टाकली जात होती. या नियमात दोन वर्षांपूर्वी बदल करण्यात आला. मध्यंतरी चेसीस खरेदी बंद झाल्याने अनेक जुन्या बस दुरुस्त करून वाहतुकीलायक करण्यात आल्या.
विभागातील अनेक गाड्या जुनाट झालेल्या आहेत. याबाबत महामंडळाकडे पाठपुरावा करीत आहोत. कुंभमेळा संपल्यानंतर काही नव्या बस विभागाला मिळतील अशी अपेक्षा आहे.
- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 24, 2015, 12:48 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दीर्घ प्रतिक्षेनंतर कोसळलेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिल्लोड, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. आठ दिवसानंतरही पाण्याचा निचरा झाला नसल्याने कपाशीची झाडे सुकली आहेत. कृषी विभागाने ठिकठिकाणी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना काही उपाययोजना सूचवल्या आहेत.
दोन महिन्यांच्या खंडानंतर १७ व १८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला आहे. काही भागात शेतजमीन वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. ओढे व नदीपात्रांनी मार्ग बदलल्याने पिके वाहून गेल्याचे प्रकार सिल्लोड तालुक्यात घडले. मक्याचे आगार असलेल्या सिल्लोड तालुक्यातील बहुतांश गावात पिके जोमदार आहेत.
मात्र, अतिवृष्टीने मका पिवळी पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने ताटे आडवी झाली आहेत. मागील आठ दिवसांपासून पाण्याचा निचरा नसल्याने कपाशी पिवळी पडली आहे. झाडाला बोंडे असल्यामुळे अन्नद्रव्याची गरज आहे. मात्र, पाणी तुंबल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अन्नद्रव्य घेण्यापासून पिके वंचित आहेत.
सध्या एकरी सुकलेल्या झाडांची संख्या कमी आहे. मात्र, परिस्थिती कायम राहिल्यास कपाशीचे पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसाने भिजले आहे. निल्लोड परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून उन्हात वाळत घातले आहे. किमान काही प्रमाणात उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाने दौरा हाती घेतला आहे.
सध्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश उगले, शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव यांच्या पथकाने गावांना भेट देऊन पाहणी केली. कपाशीची झाडे वाचवण्यासाठी तातडीने बुंध्याजवळ आळे तयार करून समप्रमाणातील खतांचे मिश्रण टाकण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. रब्बी हंगाम जोमदार राहण्याची शक्यता असली तरी खरिपाचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧