म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यावर्षी लाचखोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात ५४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातही पोलिसांकडूनच लाचखोरी जास्त प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद विभाग राज्यात तक्रारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहा परिक्षेत्र आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागांचा समावेश आहे. या वर्षभरात सहा विभागांमध्ये पुणे येथे लाचखोराविरुद्ध जास्त तक्रारी आल्या. त्यापाठोपाठ औरंगाबाद विभागाचा क्रमांक आहे. नऊ महिन्यात पुणे विभागात १६८ तक्रारी तर औरंगाबाद विभागात १३६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिस उपअधिक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
अवघड सापळा
लाचखोरांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सर्व सापळ्यामध्ये वेतन पडताळणी विभागामध्ये लावण्यात आलेला सापळा अवघड होता. येथील लेखाधिकारी थेट लाचेची रक्कम घेत नव्हता. त्यासाठी त्याने एजंटची नेमणूक केली होती. त्याला पोलिसांनी तक्रारदाराच्या मदतीने युक्तीने जाळ्यात अडकविले.
तक्रारी वाढल्या
येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने गेल्या वर्षभरात ५४ जणांना सापळा रचून अटक केली आहे. लाचखोरीमध्ये पोलिस दलाचा प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर महसूल, आरोग्य व मनपाचा क्रमांक आहे. विविध विभागातील लाचखोरांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
पोलिस - १३, महसूल - ६, मनपा - ५, आरोग्य - ५, एमएसईबी - २, पंचायत समिती - २, महामंडळ - २, होमगार्ड - १, नगरपरिषद - १, कारागृह - १, महिला बाल कल्याण - १, नगररचनाकार विभाग - १, क्रीडा अधिकारी - १, शिक्षण - १, एमएसईडी - १, बीअँडसी - १, वनविभाग - १, सिडको - १, कोषागार - १, म्हाडा - १, छावणी बोर्ड - १ तसेच यांच्यासोबत लाच घेण्यासाठी मदत करणाऱ्या पाच खासगी दलालांचा यामध्ये समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट