म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या धोरणांविरोधात संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत आगपाखड केली. पंधरा वर्षापासून कायम विनाअनुदानित तत्तवार काम केल्यानंतर आणखी किती दिवस फुकट काम करायचे असा सवाल करत, नवी धोरणांसह केंद्रीय भरती प्रक्रियेला विरोध केला. मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी आधी आपली पदवी तपासून पाहा, असा घणाघातही यावेळी संस्थाचालकांनी केला.
औरंगाबादमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे शैक्षणिक प्रश्नांवर संस्थाचालक, विविध संघटनांची देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आमदार विक्रम काळे, डॉ. गफ्फार कादरी, उद्धव भवलकर, सुशिला मोराळे, मिलिंद पाटील, द्वारकादास पाथ्रीकर, वसंत पाटील, डॉ. प्रकाश भांडवलदार यांची उपस्थिती होती.
शिक्षण मंत्री तावडेंनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर आरोप करण्यापेक्षा आपली पदवी तपासून पाहावी, असे टोमणे अनेकांनी आपल्या भाषणात मारले. मंत्रिमंडळ बैठकीवर महामोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीला डॉ. अविनाश येळीकर, कृष्णा डोणगावकर, किरण पाटील, सलीम मिर्झा, अजमल खान, प्रा. सुनील मगरे, मारोती खेडेकर, रावसाहेब आवारी, रवींद्र तौर, सुजाता पवार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एस. पी. जवळकर यांनी केले. वाल्मिक सुरासे यांनी सूत्रसंचालन तर, आभार मनोज पाटील यांनी मानले.
भाषणात गोंधळ
सर्जेराव ठोंबरे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी शासनाची सकारात्मक बाजू मांडतो असे सांगताच उपस्थितांनी संताप व्यक्त केला. 'संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून बोला, सरकारचे नको. तावडेंच्या आठमुठे धोरणाचे समर्थन करू नका,' असे सांगत अनेकजण उभे राहिले. अधिकाऱ्यांनी जुजबी त्रुटी काढून आमच्याकडून लाखो रुपये घेतले असा आरोपही काही जणांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट